पुन्हा तांत्रिक घोळ, विमा कंपनीस सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:40 AM2021-09-10T04:40:21+5:302021-09-10T04:40:21+5:30
उस्मानाबाद : पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस ७२ तासांत देणे अनिवार्य आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणेच यंदाही वीज, इंटरनेट तसेच ...
उस्मानाबाद : पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस ७२ तासांत देणे अनिवार्य आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणेच यंदाही वीज, इंटरनेट तसेच सर्व्हर डाऊन अशा अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कंपनीस पत्र देऊन याबाबत सूचित केले आहे.
गतवर्षी अतिवृष्टीनंतर अनेक गावांत वीज नव्हती. इंटरनेटची समस्या निर्माण झाली. तसेच तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी कंपनीस ७२ तासात नुकसानीची माहिती देऊ शकले नाहीत. परिणामी ३ लाखांवर शेतकऱ्यांना पात्र असतानाही अद्याप विमा मिळू शकला नाही. दरम्यान, यावर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, अन्य ठिकाणीही सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, कंपनीच्या ॲपवर नुकसानीची माहिती देण्याचा काही शेतकऱ्यांनी प्रयत्न केला असता, तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना माहिती देता आली नाही. तसेच यावेळीही इंटरनेट, विजेची समस्या आहेच. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कंपनीस पत्र देऊन ही बाब अवगत केली आहे. हे पत्र पुढे नुकसान भरपाईच्या मागणीवेळी मोलाची भूमिका बजावू शकते. शिवाय, त्यांनी शेतकऱ्यांनाही नुकसानीची माहिती ७२ तासात विमा कंपनी, कृषी विभागास देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवावा, असे आवाहनही केले आहे.