मराठा आंदोलकांची धाराशिवमध्ये बसेसवर दगडफेक
By बाबुराव चव्हाण | Updated: February 14, 2024 16:26 IST2024-02-14T16:25:46+5:302024-02-14T16:26:25+5:30
मनोज जरांगे यांनी अन्न, तसेच पाण्याचा त्याग केला आहे. असे असतानाही राज्य सरकार दखल घेत नसल्याचा आंदोलकांचा आराेप

मराठा आंदोलकांची धाराशिवमध्ये बसेसवर दगडफेक
धाराशिव : मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असतानाही आंदाेलनाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप करीत मराठाबांधवांनी बुधवारी दुपारी सव्वादाेन वाजता बसेसवर दगडफेक केली. ही घटना शहरातील आयुर्वेदिक काॅलेजसमाेर घडली.
जरांगे पाटील यांनी अन्न, तसेच पाण्याचा त्याग केला आहे. असे असतानाही राज्य सरकार दखल घेत नसल्याचा आराेप करीत बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यानंतर आंदाेलकांनी थेट आमदारांची निवासस्थाने गाठून ठिय्या दिला. कळंबमध्ये, भूम तालुक्यातील आंबी भागात टायरची जाळपाेळ करण्यात आली. असे असतानाच दुपारी सव्वादाेन वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरातील आयुर्वेदिक काॅलेज चाैकात संतप्त मराठाबांधवांनी तुळजापूर-धाराशिव बसवर दगडफेक केली.
कळंबमध्ये टायर जाळले; रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प
मनोज जरंगे यांची प्रकृती खालावली आहे. असे असतानाही सरकार याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या कळंब येथील सकल मराठा समाजाने बीड धाराशीव जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. विदर्भ , मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र यांचा कनेक्टिंग पॉईंट असलेल्या पुलावरील रास्ता रोकोमूळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत . आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण आहे .