वीज तोडणी थांबवा, अन्यथा आंदोलन करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:31 AM2021-03-20T04:31:10+5:302021-03-20T04:31:10+5:30
तेर : ग्राहकांनी थकित वीज बिलाचा भरणा न केल्याने महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडणी मोहीम हाती घेतली आहे. ही ...
तेर : ग्राहकांनी थकित वीज बिलाचा भरणा न केल्याने महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडणी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम ताबडतोब थांबवावी, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
अगोदरच मागील वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतीमालाला बाजारपेठ भाव नाही. शेतकरी, शेतमजूर, छोटा मोठा व्यावसायिक आर्थिक अडचणीत असताना महावितरण कंपनीने सध्या वीज बिलाची वसुली मोहीम हाती घेतली आहे. वास्तविक अधिवेशन काळात सरकारने वीज बिल थकीत ग्राहकांची वीज तोडणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या एक-दोन दिवसांपासून वीज कनेक्शन तोडणे सुरू केले आहे. यामुळे शेतात पाणी असताना देखील विजेअभावी ते पिकांना देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. शिवाय, विजेअभावी छोटे-मोठे व्यवसाय बंद पडत आहेत. त्यामुळे तोडलेले कनेक्शन पूर्ववत करून ही मोहीम थांबवावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर रा.स.पा उस्मानाबाद तालुकाध्यक्ष सचिन देवकते, बालाजी वगरे, धनजंय आंधळे, पवन माने, सोमनाथ धायगुडे, अभिजीत देशमाने, सुनील कानडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.