तीन गावांचा पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:32 AM2021-03-19T04:32:12+5:302021-03-19T04:32:12+5:30
तेर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तब्बल एक कोटी ८६ लाख ५९ हजार रुपये वीज बिल थकल्यामुळे महावितरणने गुरुवारी तेरणा ...
तेर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तब्बल एक कोटी ८६ लाख ५९ हजार रुपये वीज बिल थकल्यामुळे महावितरणने गुरुवारी तेरणा धरणावरून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडले. परिणामी, उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी आणि तडवळे या तीन गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्पातून तेर, ढोकी व तडवळे या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी त्या-त्या गावातील ग्रामपंचायतीवर आहे. सध्या या तीन गावांकडे एकूण ७८ लाख २२ रुपये एवढी पाणीपट्टी थकली आहे, तर योजनेवर असलेल्या वीज कनेक्शनचे एक कोटी ८६ लाख ५९ हजार बाकी प्राधिकरणाकडे थकीत आहे. थकीत रक्कम भरणा करण्याबाबत वीज वितरण कंपनीने प्राधिकरणाला वारंवार लेखी कळविले होते. परंतु, थकीत वीज बिल न भरल्याने अखेर गुरुवारी वीज कनेक्शन तोडले. त्यामुळे तीन गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, येणाऱ्या काळात तीन गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.
कोट.......
सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामालाही मुहूर्त नाही
गेल्या अनेक वर्षांपासून सतत ही पाणीपुरवठा योजना थकीत वीज बिलामुळे अडचणीत येत आहे. ही योजना कायम सुरळीत चालण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पाणीपुरवठा योजनेसाठी तीन वर्षांसाठी सौरऊर्जा प्रकल्प मंजूर केला आहे. परंतु, पुढे यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे निधी उपलब्ध असतानाही नेमके घोडे कुठे अडले, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.