दोंडाईचात अपंगांना मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:07 PM2019-12-27T22:07:18+5:302019-12-27T22:07:48+5:30
ंरोटरी क्लबचा उपक्रम : आतापर्यंत २५००जणांना बसविले पाय
दोंडाईचा : विविध आजारात, अपघातात अपंगत्व आलेल्यांना जयपूर फूट व रोटरी क्लबच्या सामाजीक उपयुक्त प्रकल्पामुळे आशेचा किरण गवसला आहे. निराधार, अपंगत्व आलेल्यांनी जगण्याची उमेद सोडली असतांनाच जयपूर फुटच्या माध्यमातून त्यांना दोंडाईचातच मोफत पाय बसवून मिळाल्याने अपंगाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. गेल्या पंधरा वर्षात जयपूर फुटचा माध्यमाने सुमारे २५०० जणांना मोफत पाय बसविण्यात आलेत.
यातील अकाली अपंगत्व आलेले व दोन्ही पाय गमावून बसलेले चक्क मोटरसायकल चालवितात, तर राजस्थानचा एकजण ट्रक चालवीत आहे. कृत्रिम पाय बसविला असल्याचे त्यांच्या चालण्यातून लक्षातही येत नाही हे विशेष.
नुकतेच रोटरी हॉलला सुमारे २५ जणांना रोटरी क्लब सिनियर्स व मुंबईच्या ओसवाल मित्र मंडळाच्यावतीने पाय बसविण्यात आले. अध्यक्षस्थानी सरकारसाहेब रावल होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे ओसवाल ट्रस्टचे सी.एल. जैन, डॉ.प्रकाश बोरा, अजित कूचेरिया म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक राजेश मुनोत यांनी केले. या वेळी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष डॉ.सचिन पारख, सचिव चेतन सिसोदिया, डॉ.अनिल सोहोनी, डॉ.मुकुंद सोहोनी, हुसेनभाई विरदेलवाला आदी उपस्थित होते.
मुंबईला न जाता दोंडाईचात आता कृत्रिम पाय बसवण्याची सोय झाल्याने अपंगत्व आलेल्यांचे आर्थिक व शारीरिक श्रम वाचत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून रोटरी भुवन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जयपूर फूट पाय बसविण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान येथील अपंग येथे पाय बसविण्यासाठी येतात. आतापर्यंत २५०० जणांना मोफत पाय बसविण्यात आलेत. दोन्ही पाय गमावून बसलेले यांना पाय मिळाल्याने सहज मोटरसायकल चालवितात.
अपंगांना पाय बसविण्याचे काम दीपक ठाकूर करीत असून नंतर दुरुस्तीचे कामही करून देतात, अशी माहिती आयोजकांनी दिली. सदर कार्यक्रमात सरकारसाहेब रावल, सी.एल. जैन, हुसेन विरदेलवाला, डॉ.प्रकाश बोरा आदींनी मनोगत व्यक्त केले.