लेख: कॅनडाची नरमाई, भारत आपल्या भूमिकेवर ठाम! प्रचलित मार्ग सोडून कठोर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:41 AM2024-10-24T10:41:45+5:302024-10-24T10:42:30+5:30

१९८५ च्या कनिष्क दुर्घटनेपासून कॅनडाबद्दल भारताचा दृष्टिकोन मवाळ होता. आता मात्र नरेंद्र मोदी यांनी या देशाला शिंगावर घ्यायचे ठरवलेले दिसते.

Article: Canada's mildness, India insists on its position! A strict stance, leaving the conventional path | लेख: कॅनडाची नरमाई, भारत आपल्या भूमिकेवर ठाम! प्रचलित मार्ग सोडून कठोर भूमिका

लेख: कॅनडाची नरमाई, भारत आपल्या भूमिकेवर ठाम! प्रचलित मार्ग सोडून कठोर भूमिका

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

अमेरिकन भूमीवर गुरुपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट भारताने रचल्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकेला समजाविण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रचलित मार्ग सोडून काही खासरीतीने प्रयत्न करीत असताना खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या ब्रिटिश कोलंबियात गतवर्षी झालेल्या हत्येबद्दल कॅनडा करीत असलेल्या आरोपांवर मात्र त्यांनी कठोर भूमिका स्वीकारली आहे. कनिष्क विमान १९८५ साली बॉम्बने उडवून देण्यात आले होते; तेव्हापासून कॅनडाबद्दलभारताचा दृष्टिकोन मवाळ राहिलेला आहे. परंतु, आता मोदी यांनी या देशाला शिंगावर घ्यायचे ठरवलेले दिसते. कॅनडा काही प्रमाणात एकटा पडल्याचे दिसते. अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या ‘फाइव्ह आय’ नामक संयुक्त प्रयत्नांमधून संवेदनशील विषयांवर गुप्तचरांनी मिळवलेली माहिती एकमेकांना दिली जाते.  केवळ गुप्तचरांनी पुरवलेल्या अशा माहितीच्या आधारे अन्य कोणतेही ठोस पुरावे नसताना भारतीय अधिकाऱ्यावर आरोप करून कॅनडाच्या पंतप्रधानांनी मर्यादा ओलांडली आहे. 

अमेरिकेसह इतर चार देश त्यांना भारताशी व्यापारी संबंध सांभाळायचे असल्यामुळे तोंडदेखले वागतात. कॅनडात भारतीय वंशाचे सुमारे अठरा कोटी लोक राहतात आणि ते सगळे काही जस्टिन ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाचे सदस्य नाहीत याची कल्पना कॅनडाला आहे. या  भारतीय समुदायात मोदी यांनी खोल शिरकाव केलेला आहे. 

आता कॅनडा सरकार भारताला मैत्रीचे संदेश पाठवत आहे. कारण भारतीय विद्यार्थ्यांशिवाय तेथील विद्यापीठांचा आर्थिक प्रपंच चालणे कठीण होऊन बसले आहे. देशातील बेकारीमुळे आधीच कॅनडाचे सरकार त्रासून गेले असून, भाववाढही छळते आहे. त्यात भारताबरोबरचा हा तणाव! दिल्लीत चाणक्यपुरीमध्ये कॅनडियन दूतावासाला दिलेले विशेष पोलिस संरक्षणही भारत सरकारने काढून घेतले. ‘तुम्ही तुमचे खासगी सुरक्षारक्षक नेमा’ असे त्यांना सांगण्यात आले आहे.

मुकाट्याने मोजलेली किंमत

देशातील सर्वोच्च  गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’चे सर्व सचिव सध्या मौन पाळून आहेत. ते कुठे दिसतही नाहीत. त्यांना  बक्षिसीही पडद्याआड मिळते आणि त्यांना काही त्रास वाट्याला आला तर तोही गुपचूप सहन करावा लागतो. आयपीएस अधिकाऱ्यांच्या १९८४ च्या पंजाब केडरमधले सामंत कुमार गोयल हे याआधीचे रॉचे प्रमुख होते. त्यांचे उदाहरण घ्या. पंजाबमधील दहशतवाद हाताळण्यात त्यांनी केलेली कामगिरी लक्षात घेऊन मोदी सरकारने गोयल यांना रॉच्या प्रमुखपदी नेमले. २०२३ मध्ये ते पायउतार झाले. रॉचे प्रमुख असताना त्यांनी प्रशंसनीय काम केले. विशेषत: भारताविरुद्ध पाकिस्तानात काम करत असलेले दहशतवादी हुडकून त्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. सरकारच्या पुढाकारानेच ही मोहीम राबवली गेली.

काँग्रेसच्या आधीच्या कार्यकाळात पाकिस्तानमधील खबऱ्यांचे जाळे पूर्णपणे नेस्तनाबूत झालेले होते. ते पुन्हा कार्यरत करण्यात गोयल यांनी मोठे काम केले. जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन निवृत्तीनंतरही गृह मंत्रालयाने त्यांना झेड श्रेणीची सुरक्षाव्यवस्था पुरवलेली आहे. अशी सुरक्षा मिळणारे ते कदाचित पहिलेच रॉ प्रमुख असतील. त्यांना तोलामोलाचे घटनात्मक पद देण्यात येणार होते असे मोदी सरकारमधील अंतस्थ सांगतात. परंतु, त्याच सुमारास ‘रॉ’शी संबंधित गुप्तचरांकडे बोट दाखविणारे अमेरिका आणि कॅनडातील हे प्रकरण उद्भवले. अद्याप कुठलाही ठोस पुरावा समोर आलेला नसला तरी गोयल यांना त्याचे फटके गुपचूप सोसावे लागले.

राज्यसभेत काँग्रेसची अग्निपरीक्षा

हरयाणात पानिपत झाल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीत यश मिळणे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. महाराष्ट्रात जर पीछेहाट झाली तर आधीच राज्यसभेत नाजूक असलेली  काँग्रेसची स्थिती आणखी अडचणीत सापडेल. 

काँग्रेसकडे तूर्तास २७ खासदार असून, विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी केवळ दोन खासदार जास्तीचे आहेत. जर महाराष्ट्रात पक्षाचा पराभव झाला तर महाराष्ट्रातील काही खासदार, इतकेच नव्हे तर कर्नाटकमधलेही काही पक्ष सोडतील अशी शक्यता दिसते. सोडून जाऊ शकतील असे राज्यसभेतले पाच खासदार पक्षाने ओळखले आहेत.

नितीश यांची अनुपस्थिती

हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या शपथग्रहण समारंभाला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  हा कार्यक्रम व्यवस्थित व्हावा यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः लक्ष घालत असताना अनुपस्थित राहिलेले एनडीएमधले ते एकमेव मुख्यमंत्री ठरले. हरयाणात लागोपाठ तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करणे भाजपसाठी राजकीय कलाटणी देणारे असताना नितीश यांची अनुपस्थिती एनडीएमध्ये अस्वस्थता निर्माण करून गेली, हे नक्की!

आता असे सांगण्यात येत आहे की नितीश यांनी व्यक्तिशः मोदी यांना फोन करून आपल्याला प्रवास शक्य नसल्यामुळे येऊ शकत नसल्याचे कळविले होते. मात्र दसऱ्याच्या दिवशी पाटण्यात रावणवधाच्या कार्यक्रमाला ते हजर होते. त्यामुळे ‘ते खरेच आजारी आहेत का’ याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले.  रावणवधाच्या ठिकाणी नितीशकुमार यांनी बाण मारून फटाक्यांची लड पेटवल्यावर रावण जळून खाक होणार होता. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हेही याप्रसंगी उपस्थित होते. बाण मारताना नितीशकुमार काहीसे गोंधळले. धनुष्य आणि बाण त्यांच्या हातातून खाली पडले. शेवटी नितीशकुमार यांच्या बाणाशिवायच रावणाच्या प्रतिमेने पेट घेतला; मग सगळ्याच पक्षात याविषयाची खमंग चर्चा सुरू झाली.

आता विरोधक म्हणत आहेत की बाण हे नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे निवडणूक चिन्ह असून, त्या बाणाला आजच लक्ष्यभेद करता आला नाही, तर २०२५ साली नितीश यांचे काय होईल?

Web Title: Article: Canada's mildness, India insists on its position! A strict stance, leaving the conventional path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.