‘एआय’ तरुणांना घाबरवणार, की पुढे घेऊन जाणार; ‘एआय’मुळे एवढं घाबरायला हवं का?  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 09:57 AM2024-06-29T09:57:14+5:302024-06-29T09:58:08+5:30

‘एआय’मुळे नोकऱ्या जातील किंवा रोजगार नष्ट होतील असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरेल; मात्र त्यावर हुकूमत गाजवण्याऐवजी दुर्लक्ष केलं तर फटका बसेलच.

Article on Should we really be so scared of AI Technology? | ‘एआय’ तरुणांना घाबरवणार, की पुढे घेऊन जाणार; ‘एआय’मुळे एवढं घाबरायला हवं का?  

‘एआय’ तरुणांना घाबरवणार, की पुढे घेऊन जाणार; ‘एआय’मुळे एवढं घाबरायला हवं का?  

अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक

सध्या सगळीकडे अत्यंत गाजत असलेला विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय). ज्यांचा तंत्रज्ञान क्षेत्राशी अगदी दुरूनही संबंध नाही अशा सगळ्या लोकांनासुद्धा ज्याविषयी ऐकून घ्यावंच लागतं असा हा विषय. ‘एआय’मुळे सध्या काय घडत आहे आणि भविष्यात काय घडू शकेल याविषयी असंख्य प्रकारचे तर्क-वितर्क लढवले जात असल्यामुळे सगळीकडे त्याविषयी बोललं जातंच. कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारचं काम आपण करीत असलो तरीही ‘एआय’चा त्यावर नक्कीच परिणाम होणार असल्याची भावना सगळ्यांनाच अस्वस्थ करून जाते. माणसानंच निर्माण केलेलं हे तंत्रज्ञान आपल्याच मुळाशी येणार का, ही भीती सर्वदूर पसरलेली आहे. खरोखरच आपण ‘एआय’मुळे एवढं घाबरायला हवं का? 

‘एआय’चं तंत्रज्ञान खरोखरच अत्यंत सनसनाटी आहे, यात शंका नाही. जी कामं अशक्यप्राय वाटायची किंवा जी कामं करायला प्रचंड वेळ लागायचा ती ‘एआय’मुळे अगदी चुटकीसरशी होऊ शकतात याविषयी कुणाच्याच मनात शंका असायचं कारण नाही. साहजिकच सध्या पारंपरिक प्रकारची आणि त्यातही तोचतोचपणा असलेली अनेक कामं एआय अधिक सहजपणे आणि क्षणार्धात करू शकतो, हे खरंच आहे; पण म्हणून एआयमुळे सगळ्याच नोकऱ्या संपुष्टात येतील किंवा रोजगार नष्ट होतील असं म्हणणं अतिशयोक्ती झाली. इंटरनेटचा किंवा त्यानंतर ई-कॉमर्सचा जन्म झाला त्याही वेळा अशाच प्रकारची भीती काही जणांनी व्यक्त केली होती. इतक्या टोकाच्या भाकितांमधला निष्फळपणा काही काळानंतर दिसून येतो; तो एआयच्या बाबतीतसुद्धा दिसून येईलच.

अर्थातच याच्या अगदी उलटा पवित्रा घेऊन एआयमुळे काहीच घडणार नाही किंवा माझा रोजगार सुरक्षित राहील असं मानून बिनधास्तपणे राहणं हा पर्यायच असू शकत नाही. एआयचं तंत्रज्ञान अद्भुत आहे, आजवर आपल्या कल्पनाशक्तीमध्ये सामावू शकेल अशा सगळ्यांपलीकडचं आहे. याचे परिणाम नक्कीच असंख्य क्षेत्रांवर निरनिराळ्या प्रमाणांमध्ये घडणार आहे. या तंत्रज्ञानामुळे नेमकं काय घडू शकतं आणि त्यातून तावून-सुलाखून आपण कसे बाहेर पडू शकू, अशा प्रकारचा यक्षप्रश्न अनेकांसमोर उभा ठाकणार आहे. वैयक्तिक पातळीवर हे किती जणांना जमू शकेल, किंबहुना त्याचं किमान आकलन तरी होईल हाच कळीचा मुद्दा असल्यामुळे याची जबाबदारी धोरण आखणाऱ्यांनी स्वत:वर घेणं क्रमप्राप्त आहे. लोकांना त्यांच्या नशिबावर सोडून देऊन चालणार नाही. ज्याप्रमाणे सरकारांना बेरोजगारीवर मात करणं, तरुणांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं यासाठी दूरगामी पावलं उचलावी लागतात तशा प्रकारचे प्रयत्न एआयच्या त्सुनामीशी लढण्यासाठी करावे लागणार आहेत.

पण, दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणे एआयचा फटका बसला नाही तरी सध्या शिक्षणाची जी परवड सुरू आहे, त्याचं काय? सरकारनं जणू शिक्षणाशी फारकत घेऊन खासगी महाविद्यालयं आणि विद्यापीठांवर सगळी जबाबदारी ढकलून दिल्याचे परिणाम पावलोपावली दिसतात. लाखो रुपये फी भरून विद्यार्थी ज्या प्रकारचं शिक्षण घेताना दिसतात त्यातून अत्यंत अनुपयोगी बेरोजगारांचे तांडे बाहेर पडण्याशिवाय दुसरं काय होणार? पदवीच काय; पण उच्च पदवी घेतल्यानंतरही अगदी किमान कौशल्यंही या विद्यार्थ्यांकडे नसतात, हा अनुभव आहे. यामुळे आपण आणखी मोठ्या संकटांना आमंत्रण देत आहोत.

एकीकडे शिक्षणक्षेत्राबाबत हताश होण्याची परिस्थिती असताना त्याच्या जोडीला एआयची भर पडल्यावर मात्र परिस्थिती नक्कीच गंभीर होणार, यात शंका नाही. एआयच्या धोक्यावर मात करण्याची क्षमता अशा वेळी कुठून येणार? जे लोक चाणाक्षपणे या सगळ्याकडे बघून मार्ग आखतात त्यांना यातून पुढे जात राहण्याचे मार्ग नक्कीच सापडत राहतील. आपल्याला दिशा दाखवणारं कुणीतरी भेटेल आणि त्यातून आपण आपला बचाव करू, असं मानणारे किंवा याचा विचारही न करणाऱ्यांना मात्र एआयचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे.     
akahate@gmail.com

Web Title: Article on Should we really be so scared of AI Technology?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.