संदलचे ठिकाण अन् मिठाईचा पत्ता बदलेल का?

By यदू जोशी | Published: October 12, 2024 07:52 AM2024-10-12T07:52:56+5:302024-10-12T07:53:10+5:30

हरयाणात सकाळी काँग्रेस पुढे होती अन् दुपारी भाजपची सत्ता आली. हरयाणात घडले तसे महाराष्ट्रात घडेल का, ही चर्चा आता सुरू झाली आहे.

bjp politics and haryana assembly election 2024 result and consequences on maharashtra assembly election 2024 | संदलचे ठिकाण अन् मिठाईचा पत्ता बदलेल का?

संदलचे ठिकाण अन् मिठाईचा पत्ता बदलेल का?

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच महायुतीचे दिवस खराब चालले होते. जातीय समीकरणे बाजूने नव्हती, महायुतीत सुसंवाद नव्हता, असे सगळे असतानाच शिंदे-फडणवीस-अजित पवार हे तिघे ‘लाडक्या बहिणीं’साठी धावून गेले. आता निवडणुकीत लाडक्या बहिणी मते देतील हा विश्वास वाढला आहे. लाडकी बहीण ही महायुतीची ‘सिस्टर कन्सर्न’ झाली आहे. लहान-लहान जातींसाठीची महामंडळे, अनेक लोकाभिमुख निर्णय असा चौथा गिअर महायुतीने टाकल्याचे दिसत आहे. 

लोकसभा निकालानंतर अगदीच नापास वाटत असलेली महायुती तीन-साडेतीन महिन्यांत नापासवरून सेकंड क्लासपर्यंत पोहोचल्याचे दिसते. फर्स्टक्लासमध्ये येऊन सत्ता मिळवेल का, याची खात्री आजही देता येत नाही; पण आशा जागली आहे. हरयाणात सकाळी काँग्रेस पुढे होती अन् दुपारी भाजपची सत्ता आली. संदलवाल्यांनी ठिकाण बदलले आणि मिठाईवाल्यांनी पत्ता बदलला. क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे; पण राजकारण आता  क्रिकेटच्याही पुढे निघून जात आहे, असे दिसते. हरयाणा त्याचे ताजे उदाहरण आहे. केवळ ‘एक्झिट पोल’च नाही तर हरयाणा, दिल्लीत बसलेले पत्रपंडितही काँग्रेसच्या विजयाचे भाकित छातीठोकपणे वर्तवीत होते. ते सगळेच पुरते तोंडावर आपटले. 

लोकसभेच्या निकालाचे गणित मनात ठेवून महाराष्ट्रातील पत्रकारही असेच अंदाज वर्तवतील तर त्यांचीही तीच गत होण्याची शक्यता अधिक. काँग्रेस हरयाणात एकाच जातीवर  जास्त विसंबून राहिली अन् चुकली असे म्हणतात. एकाच जातीचा बाऊ न करता भाजपने लहानमोठ्या जातींची बेरीज करत विजय मिळविला. महाराष्ट्राचे या परिस्थितीशी साधर्म्य दिसत आहे. हरयाणात घडले तसे आपल्याकडे घडेल का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. लोकसभेच्या निकालावेळी ‘संदलचे ठिकाण आणि मिठाईचा पत्ता’ हा महाविकास आघाडीचाच होता, कल किसने देखा! 

राजकारणाचे संदर्भ दर दोन-चार दिवसांआड बदलतात, निवडणुकीच्या काळात ते चार-दोन तासांगणिक बदलत असतात. लोकसभा निवडणुकीकडे पाहताना जो चष्मा वापरला होता तोच घालून आताच्या राजकीय परिस्थितीकडे पाहिले तर नीट दिसणार नाही; कदाचित जवळचे थोडेफार दिसेल; पण दीड महिन्यानंतरचे आताच दिसायला हवे असेल तर चष्म्याचा नंबर बदलला पाहिजे. काही गोष्टी सहज दिसतात तर सूक्ष्म, अतिसूक्ष्म बघण्यासाठी मायक्रोस्कोपवर डोळे टेकवावे लागतात.

हरयाणाने हेही सिद्ध केले की, लोकसभेचे नरेटिव्ह जसेच्या तसे विधानसभेतही मांडल्याचा फायदा काँग्रेसला झाला नाही. तेव्हा महाराष्ट्रात फायदा व्हायचा असेल तर नवीन नरेटिव्ह शोधावे लागतील. हरयाणा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात भाजपला मोठे बळ मिळाले, हे सगळ्यांना दिसतेच आहे. हरयाणाही जिंकू शकतो तर महाराष्ट्र तर जिंकूच शकतो, या आत्मविश्वासाची पेरणी भाजप कार्यकर्त्यांच्या मनात झाली आहे. 

एक गोष्ट अनेकांना माहिती नाही ती म्हणजे भाजपने गेल्या महिनाभरात केलेले निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन; तसेच ते हरयाणातही केले होते; पण हवेत असलेल्या काँग्रेसला ते कळले नाही. आपल्याच पक्षात काय चालले आहे, याची अद्ययावत माहिती नसलेल्यांना इतर पक्षांत काय चालले आहे, ते कळण्याची शक्यता कमीच. तर भाजपच्या नियोजनाचे एकच उदाहरण देतो, आपण प्रशांत किशोर यांना मोठे रणनीतीकार मानतो, भाजपमध्येही प्रत्येक राज्यात असे रणनीतीकार आहेत; पण ते पक्षाच्या पडद्यामागेच राहणे पसंत करतात. असे तीन रणनीतीकार सध्या महाराष्ट्रात आले आहेत. त्यातलेच एक आहेत, इंदूरचे डॉ. निशांत खरे. ते नामवंत प्लास्टिक सर्जन आहेत. महाराष्ट्रातील १०० मतदारसंघांमध्ये भाजपच्या रणनीतीची सर्जरी करण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. अजूनही भाजपचे काय काय चालले आहे, ते सगळेच सांगितले तर भाजपवाले म्हणतील की, हा आपली रणनीती फोडतो... एक मात्र नक्की की, रा. स्व. संघाने ही निवडणूक फारच गांभीर्याने घेतली आहे.

अमित शाह यांचे बारीक लक्ष

अमित शाह हे रोज सकाळी पाऊण तास ट्रेडमिलवर चालतात. त्याच वेळी स्पीकर ऑन करून त्यांचे महत्त्वाचे कॉलही सुरू असतात. हल्ली सकाळच्या वेळात त्यांचे एकदोन कॉल तरी महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भात असतात. महत्त्वाचे सगळे ते याच वेळेत बोलून घेतात म्हणे. अमितभाई सब की खबर लेते है. मित्रपक्षांना दुखावू नका, त्यांना सन्मान द्या, असे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना ते सांगत आले आहेत; पण मित्रपक्षांपैकी कोणीही दबावाचे राजकारण केले तर या निवडणुकीत तरी खपवून घ्यायचे नाही, असे त्यांनी मनोमन ठरवल्याचेही सूत्रे सांगतात. छत्रपती संभाजीनगरला त्यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांचा हा पवित्रा सगळ्यांच्या लक्षात आला. ‘शिंदे जी! या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तहसीलदार ही तीनच पदे महत्त्वाची असतात, बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदे ही व्यवस्थेसाठी निर्माण केलेली असतात, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिले, तुमच्यासाठी आमच्याच माणसांनी त्याग केला,’ असे अमितभाई म्हणाल्याचे ती बैठक जेथे झाली त्या हॉटेलच्या भिंतींना कान लावून बसलेल्यांपैकी एकाने सांगितले. 

शाह यांच्या या वाक्याचा अर्थ मित्रपक्षांना भाजपने सत्तापदांबाबत महत्त्व दिले; पण निवडणुकीत त्यांच्या इच्छेनुसारच जागा मिळतील अशी अपेक्षा करू नका, असा तर नव्हता ना? की मित्रपक्षांना भाजप किती सन्मान देतो, हे त्यांना आवर्जून नमूद करायचे होते ते मात्र समजले नाही. दोनपैकी त्यांना नेमके काय म्हणायचे होते ते जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर कळेलच.
yadu.joshi@lokmat.com

 

Web Title: bjp politics and haryana assembly election 2024 result and consequences on maharashtra assembly election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.