हौतात्म्याची अवहेलना करणारा देश?

By admin | Published: January 6, 2016 10:48 PM2016-01-06T22:48:21+5:302016-01-06T22:48:21+5:30

भारतीय हवाई दलाच्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पठाणकोट हवाई तळावर झालेला अतिरेकी हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्यांसह सात

A country defying martyrdom? | हौतात्म्याची अवहेलना करणारा देश?

हौतात्म्याची अवहेलना करणारा देश?

Next

भारतीय हवाई दलाच्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पठाणकोट हवाई तळावर झालेला अतिरेकी हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्यांसह सात साहसी जवानांनी जे हौतात्म्य पत्करले, त्यांच्या शौर्याचा साऱ्या देशाला अभिमान आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती साऱ्यांना सहानुभूती असली तरी मुळात त्यांनी हौतात्म्य पत्करले की केन्द्र आणि पंजाब सरकारच्या अनास्थेचे आणि गलथानपणाचे ते बळी ठरले हा प्रश्नदेखील साऱ्या देशवासियांना आज कुरतडतो आहे. जेव्हां केव्हां भारत आणि पाकिस्तानातील लोकनियुक्त सरकारचे प्रमुख परस्परांशी चर्चा आणि वाटाघाटी करतात किंवा तसा मनोदय जाहीर करतात तेव्हां अशी चर्चा होऊ नये असे ज्यांना वाटत असते त्या शक्ती जाणीवपूर्वक भारतावर अतिरेकी हल्ला चढवितात, असे नेहमी आणि सारेच बोलत असतात. या शक्ती कोण, तर पाकिस्तानचे लष्कर, तेथील आयएसआय ही गुप्तचर संघटना आणि या दोहोंचे पाठबळ प्राप्त असलेल्या जिहादी टोळ्या. आपला अफगाणिस्तानचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेन्द्र मोदी परतीच्या वाटेवर लाहोरला उतरले व त्यांनी तिथे पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची सदिच्छा भेट घेतली व त्याचवेळी उभय देशांच्या परराष्ट्र सचिंवांच्या चर्चेचा कार्यक्रमही ठरला. साहजिकच आजवरचा अनुभव लक्षात घेता ही चर्चा होऊ नये म्हणून भारतावर अतिरेकी हल्ला होऊ शकतो, हे अपेक्षितच असावयास हवे होते. ती अपेक्षा तर होतीच पण केवळ तितकेच नव्हे तर असा हल्ला होणार आणि सुमारे पंधरा आत्मघाती अतिरेकी भारताची सीमा ओलांडून भारतात घुसणार असा भारतातीलच गुप्तचर संस्थांचा अहवाल होता. पण त्याच्याही पलीकडे जाऊन यावेळचा हल्ला पठाणकोटच्या हवाई तळावर केला जाणार आणि तेथील लढाऊ विमाने नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार इथपर्यंतची अचूक माहिती केन्द्र सरकारला प्राप्त झाली होती, असेही आता उघड झाले आहे. भूतकाळात भारतावर जे अतिरेकी हल्ले केले गेले त्यावेळी इतकीच काय पण थोडीशीही कल्पना आधी आली नव्हती. मग प्रश्न निर्माण होतो तो असा की, केन्द्र आणि पंजाब राज्य सरकार यांनी कोणती आणि काय खबरदारी घेतली? सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्या असे आता संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर म्हणत आहेत. पण एकूण घटनाक्रम लक्षात घेता त्यांचा स्वत:चाच त्यांच्या शब्दांवर कितपत विश्वास बसत असेल याची शंका येते. सदर हल्ल्याची इतकी तंतोतंत माहिती प्राप्त झाल्यानंतरदेखील हल्लेखोर अतिरेक्यांच्या नेमक्या संख्येबाबत चाचपडणेच सुरु होते. तरीही यातील सर्वात भयानक प्रकार म्हणजे पंजाब पोलीस दलातील सलविंदरसिंग नावाच्या अधिकाऱ्याची अत्यंत संशयास्पद भूमिका. जे अतिरेकी पठाणकोटच्या दिशेने निघाले होते त्यांनी याच अधिकाऱ्याचे अपहरण केले, पण तो पोलीस अधिकारी असल्याचे समजल्यानंतरही त्याला ठार न करता त्याचे केवळ हातपाय बांधून व त्याला रस्त्यावर फेकून देऊन त्याच्या मोटारीसह ते तसेच निघून गेले. थोड्या वेळाने ते पुन्हा तिथे आले तेव्हां आपण आपले बांधलेले हात सोडवून घेऊन पसार झालो होतो असे हाच अधिकारी आता सांगतो आहे. ते परतले तेव्हां त्यांचा हेतू आपल्याला ठार मारण्याचा होता, असेही हा अधिकारी म्हणतो. पण ते त्याला कसे समजले? आजवर भारतावर जे जे म्हणून अतिरेकी हल्ले झाले, त्यात अतिरेक्यांनी लहान मुलांनाही जिवंत सोडले नाही. असे असताना आपल्या हाती लागलेली व्यक्ती एक पोलीस अधिकारी आहे असे समजल्यानंतरदेखील तिला जिवंत सोडणारे आणि राहून गेलेली हत्त्या करण्यासाठी माघारी परतणारे पाकी अतिरेकी इतके कनवाळू आणि वेंधळे झाले आहेत यावर केवळ हा अधिकारी सांगतो म्हणून लोकानी विश्वास ठेवायचा? प्रत्यक्षात आज संपूर्ण पंजाब राज्य अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे माफिया राज झाले आहे. पाकिस्तानशी त्याचे गैर व्यावहारिक संबंध प्रस्थापित होऊन बसले आहेत आणि यात राजकारणी व पोलीस यांचा सहभाग गृहीतच आहे. एरवी पंतप्रधानांनी अजित डोवाल यांना खास करुन पंजाबातील या गैरव्यवहारांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्यानंतर तेथील सत्ताधारी व केन्द्रातील रालोआचा घटक असलेल्या अकाली दलास अस्वस्थ होण्याचे काही कारणच नाही. केवळ पठाणकोटच नव्हे तर संरक्षक दलांच्या कोणत्याही वास्तूमध्ये प्रवेश करणे सोपे नसते. जागोजागी पहारे आणि काटेकोर तपासणीला सामोरे जावे लागते. असे असताना पाच अतिरेकी पठाणकोट हवाई तळाच्या हद्दीत लीलया प्रवेश करतात आणि त्यांच्याकडे पाकिस्तानच्या लष्कराची नाममुद्रा असलेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरील दारुगोळा आणि स्फोटके असतात ही बाब सुरक्षा व्यवस्तेमधील ‘काही’ त्रुटींची निश्चितच निदर्शक नाही. हवाई तळावरील हल्ला म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असल्याने लष्करी जवानांनी प्राणाची बाजी लावून तो परतवला पण खरे तर त्यांच्यातील शौर्याची यात अवहेलनाच झाली आहे.

Web Title: A country defying martyrdom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.