अजातशत्रू कॉम्रेड..! थेट इंदिरा गांधींच्या निवासस्थानी पोहचले अन् काही दिवसांतच...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 07:46 AM2024-09-14T07:46:30+5:302024-09-14T07:47:02+5:30

एसएफआयला देशभरात रुजवण्यात येचुरी यांचा वाटा खूप मोठा. पुढे ते पॉलिटब्युरोचे सदस्य आणि पक्षाचे सरचिटणीसही झाले.

Editorial on Comrade sitaram yechury..! Directly reached Indira Gandhi residence when he is young | अजातशत्रू कॉम्रेड..! थेट इंदिरा गांधींच्या निवासस्थानी पोहचले अन् काही दिवसांतच...

अजातशत्रू कॉम्रेड..! थेट इंदिरा गांधींच्या निवासस्थानी पोहचले अन् काही दिवसांतच...

सप्टेंबर १९७७ मधील घटना! देशातील आणीबाणी हटली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला. तरीही त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ‘चॅन्सेलर’पद म्हणजे पदसिद्ध असे कुलपतीपद सोडले नव्हते. विद्यापीठाच्या विद्यार्थी चळवळीचा एक तरुण नेता थेट इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचला. या आंदोलकांच्या आग्रहामुळे गांधी घराबाहेर आल्या. त्या तरुणाने मागण्यांचे निवेदन ठामपणे वाचून दाखवले. त्यात इंदिरा गांधी यांच्या राजीनाम्याचीही मागणी होती. सुरुवातीला त्या बधल्या नाहीत. पण काही दिवसांतच इंदिरा गांधींनी ते पद सोडले.

हे घडवून आणणारा तरुण होता- कॉम्रेड सीताराम येचुरी. त्यांच्या निधनानंतर या प्रसंगाचे छायाचित्र समाजमाध्यमांवरून ‘व्हायरल’ झाले आणि येचुरींचा अवघा जीवनपटच समोर आला. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील बुद्धिमान आणि जनमान्य नेत्यांपैकी ते एक. आजच्या या वातावरणात त्यांची सर्वाधिक गरज असतानाच त्यांचे नसणे व्याकुळ करणारे आहे. येचुरी यांचा जन्म तेव्हाच्या मद्रासमध्ये झाला. आई सरकारी अधिकारी आणि वडील आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळात अभियंता. येचुरी मात्र सरकारी नोकरीच्या दिशेने गेले नाहीत.

सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानत, त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिले. बारावीच्या ‘सीबीएसई’ परीक्षेत संपूर्ण भारतात अव्वल स्थान मिळवणारे येचुरी हे मुळातच स्कॉलर. मात्र,स्वतःच्या करिअरपेक्षा शोषित-वंचितांसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. शहाण्यांच्या या जगात वेडा ठरलेला हा माणूस त्यामुळेच संधिसाधू राजकारण्यांच्या भाऊगर्दीत वेगळा ठरला. स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी जन्मलेल्या येचुरींनी राजकारणातील खूप बदल पाहिले. मात्र, आपल्या मूल्यांवर अढळ निष्ठा असलेल्या येचुरींनी अखेरच्या क्षणापर्यंत आपली वाट सोडली नाही. जेएनयूत असताना, स्टुडंट्स युनियनचे ते सलग तीन वेळा अध्यक्ष होते. हा तरुण एसएफआयच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत आणि पुढे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) माध्यमातून राजकारणात सक्रिय झाला.

एसएफआयला देशभरात रुजवण्यात येचुरी यांचा वाटा खूप मोठा. पुढे ते पॉलिटब्युरोचे सदस्य आणि पक्षाचे सरचिटणीसही झाले. चळवळीच्या दिवसांतील सहकारी प्रकाश करात यांच्यासह त्यांनी पक्षाचे जुने-जाणते नेते हरकिशन सिंग सुरजित, ज्योती बसू यांच्या मनातही स्थान मिळवले. येचुरी अस्खलित मराठी बोलत. मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषा त्यांनी आत्मसात केल्या. त्यांचे वाचन अफाट होते. तसेच त्यांनी स्वतः निर्माण केलेली ग्रंथसंपदाही मोठी आहे. २००५ ते २०१७ या काळात येचुरी राज्यसभेचे खासदार होते. ‘आमची लोकशाही प्राचीन आहे’, असे म्हणणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षांना- बराक ओबामांना- त्यांनी सुनावले होते. ‘१९६५ पर्यंत तुमच्या देशात प्रत्येकाला मताधिकार नव्हता. माझ्या देशात मात्र प्रत्येक स्त्री-पुरुषाला पहिल्या दिवसापासून मताधिकार आहे. म्हणून प्राचीन लोकशाही आमचीच आहे!’

लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेशी असलेली निष्ठा त्यांनी अखेरपर्यंत जपली. प्रसंगी पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊनही. साम्यवाद्यांची पोथीनिष्ठ म्हणूनही संभावना होतेच, येचुरी मात्र एकाच वेळी महात्मा गांधी आणि फिडेल कॅस्ट्रो अशा दोघांचेही चाहते! निवडणुकीच्या राजकारणात उतरूनही येचुरी यांचे मैत्र पक्षाच्या सीमा ओलांडत राहिले. डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार आणण्यात त्यांची भूमिका बरीच महत्त्वाची होती. एकाच वेळी धर्मांधता आणि जागतिकीकरणाला विरोध करत असतानाच, आपला प्राधान्याचा शत्रू कोण, हे त्यांनी ओळखले होते. यूपीए-१ सरकारच्या काळात त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे पाठपुरावा करून मनरेगा, माहितीचा कायदा, अन्नसुरक्षेचा कायदा आदी निर्णय तडीला नेण्यात मोठी भूमिका बजावली. मनमोहन सिंग सरकारने भारत-अमेरिका नागरी आण्विक करार केला, तेव्हा त्यांचे सहकारी प्रकाश करात यांची भूमिका ताठर होती. पण येचुरी यांनी समंजस भूमिका घेतली.

१९९०च्या दशकानंतर जगभर सर्वत्र साम्यवादी सरकारांची पडझड होत होती आणि डाव्या विचारसरणीला ओहोटी लागली होती. देशातही पश्चिम बंगाल आणि केरळसारखे गड डाव्यांच्या हातून निसटत होते. या पडत्या काळातही त्यांची आपल्या विचारांवरची श्रद्धा ढळली नाही. माकपच्या विचारांची मशाल पेटती ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न त्यांनी केला. राजकीय नेते कसे नसावेत, याची भरमसाठ उदाहरणे समोर दिसत असताना, असा एक नेता आपल्या देशात होता, यावर उद्या कदाचित अनेकांचा विश्वास बसणार नाही!

Web Title: Editorial on Comrade sitaram yechury..! Directly reached Indira Gandhi residence when he is young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.