संपादकीय - आमदारांची खदखद कुठपर्यंत जाईल? चर्चा तर होणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 06:06 AM2022-04-01T06:06:48+5:302022-04-01T06:07:17+5:30

गालातल्या गालात हसणाऱ्या राष्ट्रवादीवाल्यांमुळे शिवसेनेचे आमदार चिडले आहेत, काँग्रेसचे आमदारही सोनिया गांधींकडे दाद मागायला निघाले आहेत.

How far will the Shiv Sena MLAs go? There will be a discussion | संपादकीय - आमदारांची खदखद कुठपर्यंत जाईल? चर्चा तर होणारच

संपादकीय - आमदारांची खदखद कुठपर्यंत जाईल? चर्चा तर होणारच

Next

यदु जोशी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, पण बाहेरून शरद पवार आणि आतून अजित पवार हे सरकार चालवतात अशी चर्चा नेहमीच असते. आपल्यासाठी आपणच बोलल्याशिवाय पर्याय नाही असं लक्षात आल्यानं शिवसेनेचे २५ आमदार अधिवेशन काळात पेटून उठले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चेम्बरमध्ये ठिय्या दिला. वित्त विभाग, बांधकाम, ग्रामविकास आदी खात्यांवर हल्लाबोल केला आणि निधी पदरी पाडून घेतला. असं म्हणतात की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात हे आमदार एकवटले होते. त्यामुळे आताच लक्ष दिलं नाही तर वेगळा स्फोट पुढे-मागे  होवू शकतो असं लक्षात आल्यानं की काय या आमदारांच्या आक्रोशाची तत्काळ दखल घेतली गेली. 

एकनाथ शिंदे हे बऱ्याच शिवसेना आमदारांची पॉवर बँक आहेत. डिस्चार्ज्ड झाले की आमदार शिंदेंकडे जातात.  शिवसेना आमदारांमधील आग अजून शांत झालेली नाही. परवा परांड्याचे आमदार तानाजी सावंत जाहीरपणे राष्ट्रवादीच्या विरोधात बोलले. ‘आमच्यावर अन्याय करून राष्ट्रवादीवाले गालातल्या गालात हसतात. आमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नका. राज्यात राष्ट्रवादीला ५७ टक्के, काँग्रेसला ३० टक्के आणि शिवसेनेला १३ टक्केच निधी मिळतो” हे सांगताना  “राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य २५ / १५चा निधी हसन मुश्रीफांकडून आणतो, पण आमच्या आमदारांना तो मिळत नाही’ असं सावंत बोलले. 
रायगडमध्ये तटकरे परिवाराच्या दबंगगिरीवरून शिवसेनेत कमालीची अस्वस्थता अजूनही आहे. तटकरे परिवाराशी जवळीक, की शिवसेना याचा फैसला शिवसेना नेतृत्वाला एकदाचा करावा लागेल.   शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर मध्यंतरी म्हणालेच होते, ‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, पण

प्रत्यक्ष लाभ कोण घेतं, पवार सरकार !’ 
- मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षातली ही खदखद आहे. माहिती अशी आहे की युती तुटल्यानं सुरुवातीपासून अस्वस्थ असलेले शिवसेनेचे बरेच खासदार पुढेमागे भाजपच्या गळाला लागू शकतात. एकदोन जणांनी स्वत:वरील कारवाया भाजपच्या आडोशाला जाऊन रोखून धरल्या आहेत. पक्षनेतृत्वाचा मूड ओळखून भाजपवर जाहीरपणे अक्षरश: तुटून पडणारे काही आमदार असे आहेत जे  ‘जुनंच घर बरं होतं’ असं खासगीत बोलतात. असं असलं तरी सरकारला या असंतोषाचा कुठलाही धोका नाही हे नक्की. भाजपवाले उगाच आशेच्या झाडावर लगेच चढून बसतात. ते निराशेच्या खड्ड्यात पडण्याचीच शक्यता अधिक.

काँग्रेसमध्ये वेगळीच अस्वस्थता
आता काँग्रेसचे तरुणतुर्क आमदारही सरसावले आहेत. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांच्यावर विश्वास नसल्यानं की काय आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी त्यांनी सोनिया गांधींचा दरवाजा ठोठावायचं ठरवलंय.. गावातला देव पावला नाही की तीर्थक्षेत्राला जाऊन मोठ्या देवाकडे साकडं घातलं जातं. तसं काँग्रेसचे आमदार दिल्लीला सोनिया गांधींच्या दरबारात जाणार आहेत. इतर तर सोडाच आपलेच मंत्री लक्ष देत नाहीत ही व्यथा त्यांना दिल्लीत घेऊन जात आहे. नाना पटोले, नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार हे एकमेकांना निपटवण्यात वेळ घालवताना दिसतात. काँग्रेस देशभरातच कमकुवत होत असतानाही  महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आपसातील छुप्या संघर्षातून बाहेर येताना दिसत नाहीत.

प्रवीण दरेकर जातील का? 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना अटकेपासून दोन आठवड्यांचा दिलासा मिळाला आहे, पण त्यानंतर त्यांना अटक झालीच तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून होईल. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला त्या परिस्थितीत दरेकरांचा बचाव करणं कठीण जाईल. दरेकर यांना जावंच लागलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी मिळू शकते. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना जुलैमध्ये विधान परिषदेवर आणून विरोधी पक्षनेतेपद देणं हाही एक पर्याय आहे. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची असेल. 

यशवंत जाधव अन् मातोश्री
यशवंत जाधव यांनी ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचं घड्याळ भेट म्हणून दिल्याची नोंद त्यांच्या डायरीत सापडल्याचा प्राप्तिकर विभागाचा दावा खळबळजनक आहे. त्यावर “मातोश्री म्हणजे माझी आई” असा खुलासा जाधव यांनी केला आहे. जाधव खूपच मातृभक्त दिसतात. मातृभक्तीचं प्रतीक म्हणून ते घड्याळ  भाऊ दाजी लाड संग्रहालयात ठेवण्याची कल्पना कशी वाटते? अनेकांना त्यातून प्रेरणा मिळेल. जाधव मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते, पण काही जणांना ते अस्थायी करतील असं दिसतं. तिकडे नागपुरात ॲड. सतीश उकेंवर ईडीनं कारवाई केली. या कारवाईला राजकीय रंग आहे. राज्यात येत्या महिनाभरात आणखी तीन-चार जण चौकशीच्या रडारवर राहू शकतात अशी माहिती आहे. त्यात काही जुने काही नवे असतील. 

राऊतांचं मौन
मनमोहन सिंग एकदा म्हणाले होते, ‘हजारो जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखे’. - या वाक्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे शिवसेनेची तोफ खासदार संजय राऊत यांनी अचानक जाहीर केलेलं मौन. ‘कधी कधी मौन हे सर्वांत चांगलं उत्तर असतं’ असं राऊत म्हणाले खरं,  पण चोवीस तासांतच त्यांनी मौन तोडलं. बोलणं हा राऊत यांचा व्यक्तिविशेष आहे. हा यूएसपी गेला तर राऊत काय उरतील? भाजीत मीठ अन् माठात पाणी नसेल तर कसं वाटेल?

(लेखक लोकमतमध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक, आहेत)

Web Title: How far will the Shiv Sena MLAs go? There will be a discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.