भयाच्या सावटापासून संगणकाला कसे वाचवावे? ना सायबर हल्ला, ना सिस्टीम हॅक...

By विजय दर्डा | Published: July 22, 2024 08:19 AM2024-07-22T08:19:04+5:302024-07-22T08:20:14+5:30

कोणताही सायबर हल्ला झालेला नसताना, शुक्रवारी संपूर्ण जगभरात कोट्यवधी संगणक हँग झाले. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

How to save the computer from the shadow of fear? Microsoft Outage issue open eyes of world | भयाच्या सावटापासून संगणकाला कसे वाचवावे? ना सायबर हल्ला, ना सिस्टीम हॅक...

भयाच्या सावटापासून संगणकाला कसे वाचवावे? ना सायबर हल्ला, ना सिस्टीम हॅक...

- डाॅ. विजय दर्डा,  चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

शुक्रवारी जगातील सर्वांत मोठ्या संगणक ऑपरेटिंग सिस्टीमच्या बाबतीत जे घडले, त्यावरून मला एक जुनी म्हण आठवली. ‘कुंपणच शेत खात असेल, तर शेताचे रक्षण कोण करील?’ खरे तर हेच झाले आहे. मायक्रोसॉफ्टवर कोणीही सायबर हल्ला केला नव्हता; कोणीही सिस्टम हॅक केली नव्हती, तरी संपूर्ण जगभरात कोट्यवधी संगणक हँग झाले. सोप्या भाषेत सांगायचे तर ते अडकून पडले. तंत्रज्ञानाच्या युगात अशा भीषण अडथळ्यामुळे बँका, हवाई सेवा, मोठमोठ्या कंपन्या आणि महत्त्वाच्या आस्थापनातील काम ठप्प झाले. या घटनेने भविष्यकाळासाठी अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय झाले होते, हे आधी समजून घेऊ. संगणक वापरणाऱ्या प्रत्येकाला अशी भीती असते की, न जाणो एखादा व्हायरस शिरेल किंवा सायबर हल्ला होईल. यापासून बचाव करण्यासाठी तो सायबर सुरक्षा प्रणालीचा वापर करत असतो. क्राउडस्ट्राइक फाल्कन नावाची एक कंपनी अमेरिकेतील टेक्सास परगण्यातील ऑस्टिन येथे आहे. तिचे सॉफ्टवेअर कॉर्पोरेट सिस्टमच्या पाठीशी असते, ते डेटाचे रक्षण करते. एखादा व्हायरस किंवा सायबर हल्ल्याचा पत्ता या कंपनीच्या सॉफ्टवेअरला लागतो. या कंपनीच्या १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांपैकी कुणीतरी अपडेट तयार केले आणि ते माहितीजालात सोडले. 

संगणकावर अपडेट दिसतात. स्वाभाविकपणे लोकांनी ते स्वीकारले. त्याक्षणी संगणकाचा पत्ता निळा झाला. संगणकाच्या भाषेत याला ‘ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ’ असे म्हणतात, म्हणजे हा संगणक आता कुठल्याही कामाचा राहिलेला नाही! सर्वाधिक ऑपरेटिंग सिस्टम्स मायक्रोसॉफ्टच्या  वापरल्या जातात आणि मायक्रोसॉफ्ट या क्राउडस्ट्राइक सायबर सुरक्षा प्रणालीचा उपयोग करते, म्हणून संपूर्ण जगभरात हाहाकार माजला. भारतात २०० हून अधिक विमानांची उड्डाणे खोळंबली. अमेरिकेत, तर ही संख्या हजाराच्या घरात गेली. ब्रिटनमध्ये रेल्वे आणि विमान प्रवासी संत्रस्त झाले. शेअर बाजारही अस्पर्शित राहिला नाही. जगातील अनेक देशांत टीव्हीचे प्रसारण बंद पडले. भारतातील विमान कंपन्यांनी  नाइलाजाने हाताने लिहिलेले बोर्डिंग पास जारी केले. झ्युरिकमध्ये, तर विमानांना उतरताही येत नव्हते. ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, थायलंड, हंगेरी, इटली आणि तुर्कस्तानमध्येही विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला.

हाच जर एखादा सायबर हल्ला असता, तर कदाचित इतकी चिंतेची गोष्ट झाली नसती, कारण सायबर हल्ल्याचा सामना करण्यात सगळी दुनिया अग्रेसर आहे. समस्या अशी होती  की, सायबर हल्ला परतवणाऱ्या  सिस्टमनेच  आत्मघात केला होता. प्रश्न असा की, तो अपडेट जारी करण्याच्या आधी तपासला गेला नव्हता काय? कुणी एकटादुकटा कर्मचारी अशा प्रकारे अपडेट प्रसारित करू शकत नाही. कुठे तरी मोठी चूक झाली आहे. कल्पना करा, भविष्यात यापेक्षाही एखादी मोठी चूक झाली, तर काय होईल? प्रश्न यासाठी गंभीर आहे की, आपण दैनंदिन गरजांसाठीसुद्धा संगणकावर अवलंबून राहू लागलो आहोत. संगणकाने आपले जीवन सोपे केले हे निश्चित, परंतु सुरक्षेच्या बाबतीत अनेकदा अशा चुका होतात की, वाटते संगणकावर हैवानाची सावली फिरते आहे. 
त्सुनामीचा काळ आपण विसरला नसाल. जपानमध्ये जेव्हा त्सुनामी आली, तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला आणि लोकांची स्वयंचलित घरे उघडलीच नाहीत. आपल्याच घरात लोक कैद झाले. अनेकांना प्राण गमवावे लागले. सायबर हल्ल्यांच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे, हे ऐकून आपल्याला धक्का बसेल. २०२३ मध्ये भारतीय वेबसाइट्स आणि ॲप्सवर रोज  सरासरी  एक कोटीपेक्षा जास्त सायबर हल्ले झाले, असे ॲप्लिकेशन सुरक्षा कंपनी इंडसफेसच्या अहवालात म्हटले आहे. 

जगाच्या प्रत्येक भागात असे हल्ले होत असतात. उत्तर कोरिया आणि चीनचे हॅकर याबाबतीत आघाडीवर आहेत, असे मानले जाते. हे हॅकर्स जगातील प्रत्येक संगणकाला  लक्ष्य  करण्याची क्षमता राखून आहेत. स्वाभाविकपणे या छोट्या सायबर हल्ल्यांची संख्या जास्त होती आणि जास्त करून सुरक्षा प्रणालीमुळे ते यशस्वी झाले नाहीत, परंतु काही मोठ्या हल्ल्यांमुळे भारताला त्रास झाला. देशातील अनेक मोठी इस्पितळे, अगदी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थासुद्धा या हल्ल्याची शिकार झाली हे आपल्याला आठवत असेल. अहवालात असेही म्हटले आहे की, आरोग्य सेवा देणाऱ्या  संस्थांच्या वेबसाइट्स १०० टक्के, तर बँकिंग, फायनान्स आणि विमा क्षेत्रातील ९० टक्के वेबसाइट्सवर सायबर हल्ला झाला. संरक्षण क्षेत्रातही हल्ल्याचा प्रयत्न झाला. सर्वात चिंतेची बाब म्हणजे  भारतातील सुमारे ४० टक्के मोठे उद्योग हे सायबर हल्ले रोखण्यासाठी सक्षम नाहीत. सायबर हल्ले आणि पैसे वसूल करण्याचे प्रकार वाढत आहेत. 

हॅकर्स कोणत्याही कंपनीच्या संगणक प्रणालीवर हल्ला करतात आणि ती ताब्यात घेऊन नंतर डेटा परत देण्यासाठी मोठ्या पैशांची मागणी होते. शिकार किती पैसे देताे याचा आकडा उपलब्ध नाही, कारण ते कोणी सांगत नसते. २००४ मध्ये सायबर हल्ल्यांमुळे ९.५  ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान होईल, असा अमेरिकेचा  अंदाज आहे. अमेरिका आणि भारतासारख्या देशातील सरकार स्वतःची स्टोरेज सिस्टम ठेवते, परंतु खासगी कंपन्या दुसऱ्यांच्या  स्टोरेज सिस्टमचा वापर करतात आणि त्यामुळे सहजपणे शिकार होतात.

आपण स्टार वॉर्सचे काल्पनिक चित्रपट पाहतो, त्या दिशेने आपण चाललो आहोत काय, याची चिंता मला त्रास देत आहे. याचे उत्तर होकारार्थी असेल, तर उद्याच्या लढाया संगणकाद्वारे लढल्या जातील. मग, आपण त्यासाठी तयार आहोत काय?, आपले रोबोट‌्स तयार आहेत का?, मला वाटते माणूस त्याच्या-त्याच्या जागेवर राहील, परंतु त्याच्या शक्ती संगणक नियंत्रित करील. आपल्या नव्या पिढीला त्यासाठी तयार होऊन निकराने संघर्ष करावा लागेल. आत्मरक्षणासाठी त्याचबरोबर आक्रमणासाठीही. आपल्या वैज्ञानिकांसमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Web Title: How to save the computer from the shadow of fear? Microsoft Outage issue open eyes of world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.