उत्तर प्रदेशात घडले, तर ते देशातही घडू शकेल!

By admin | Published: January 19, 2017 11:53 PM2017-01-19T23:53:40+5:302017-01-19T23:53:40+5:30

भाजपा-शिवसेना एके काळी नैसर्गिक मित्र म्हणून ओळखले जात होते, पण त्यांच्यातली ही मैत्री नरेंद्र मोदींच्या काळात पूर्वीसारखी राहिलेली नाही

If it happens in Uttar Pradesh, it can happen in the country too! | उत्तर प्रदेशात घडले, तर ते देशातही घडू शकेल!

उत्तर प्रदेशात घडले, तर ते देशातही घडू शकेल!

Next


भाजपा-शिवसेना एके काळी नैसर्गिक मित्र म्हणून ओळखले जात होते, पण त्यांच्यातली ही मैत्री नरेंद्र मोदींच्या काळात पूर्वीसारखी राहिलेली नाही. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिकेवर महात्मा गांधींऐवजी नरेंद्र मोदींचे छायाचित्र प्रकाशित झाल्याचे उघड होताच एका वादाला प्रारंभ झाला आणि शिवसेनेशी संबंधित कामगार संघटनेने सर्वप्रथम आवाज उठवला. सेनेच्या एका खासदाराने तर दूरचित्रवाहिनीवर बोलताना महात्मा गांधींऐवजी मोदींचे छायाचित्र छापणे म्हणजे घोर पाप असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीे. यातील आश्चर्याची बाब म्हणजे सेनेला कधीच महात्मा गांधींविषयी प्रेम नव्हते. शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे तर एकदा चक्क असे म्हणाले होते की, नथुराम गोडसे हा भाडोत्री मारेकरी नव्हता तर त्याच्या मनात खरोखरीच गांधींच्या कृत्यांबद्दल राग होता.
मुळात गांधीविरोधी भूमिका असताना शिवसेनेला अचानकच त्यांच्याविषयी प्रेम वाटू लागले आहे की, महात्मा गांधींच्या अहिंसक राजकारणाच्या उलट मोदींची कार्यपद्धती आहे म्हणून सेना मोदींना विरोध करीत आहे? या प्रश्नाचे उत्तर कदाचित प्रचलित राजकारणात आणि मोदींच्या व्यक्तिमत्वात दडलेले असावे. मोदींच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांचे सारे विरोधक तर एकत्र येतच आहेत पण सरकारचा घटक असलेले काही लोकदेखील त्यांचे कठोर टीकाकार झाले आहेत. ममता बॅनर्जींपासून मायावती पर्यंत असे सर्वच विरोधी पक्षनेते उत्तर प्रदेशात महागठबंधन नावाच्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत. मोदींच्या आत्मरत वृत्तीपायीच अगदी टोकाच्या व भिन्न भूमिका असलेले विरोधक एकत्र येत आहेत. यापासून स्वत:ला अलग ठेवले आहे, ते शरद पवार, नवीन पटनायक आणि नितीश कुमार यांनी.
अर्थात समस्त मोदी विरोधक एखाद्या विशिष्ट विचारसरणीतून एकत्र आले आहेत, असेही नाही. शिवसेना आक्रमक हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चालत असते. ममता यापूर्वी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या घटक होत्या तर मायावती यांनीही भाजपाशी जमवून घेतले होते. पण यावेळी सारे व्यक्तीविरोधातून एकत्र आले आहेत कारण त्यांच्या मनात नरेंद्र मोदी यांच्या आत्मप्रौढीविषयी एकीकडे भीती तर दुसरीकडे अविश्वास निर्माण झाला आहे. साहजिकच मोदींच्या विरोधात वापरली जाणारी भाषा अत्यंत द्वेषपूर्ण आणि शिवराळ आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ खासदाराने तर सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून मोदींना चक्क ‘मूषकपुत्र’ म्हणून संबोधले आहे. अरविंद केजरीवाल तर त्यांचा उल्लेख नेहमीच मनोरुग्ण वा विमनस्क म्हणून करीत असतात आणि आता राहुल गांधींनीही केजरीवालांच्या पायावर पाय ठेवत मोदींवर त्यांच्या योग प्राविण्याबाबत खोटारडेपणाचा आरोप केला आहे.
मोदींच्या विरोधात होत असलेली जहरी टीका आणि त्यांना होणारा टोकाचा विरोध याचा एकच अर्थ निघतो व तो म्हणजे विरोधकांना त्यांच्या पुढ्यात मोठे आव्हान उभे करायचे आहे. परिणामी राजकारणात जशास तसे या नीतीला पसंती मिळू लागली आहे. अर्थात स्वत: मोदींनी याआधी त्यांच्या विरोधकांबाबत असेच केले होते. त्यांनी ज्या भाषेत आणि अविर्भावात सोनिया गांधींवर आणि त्यांच्या मूळ इटालियन असण्यावर आणि राहुल गांधींच्या राजकीय पात्रतेवर सातत्याने टीका केली होती हे वाचकांना आठवतच असेल. दरम्यान गांधींनाही आता पलटवार करण्याची कारणे उपलब्ध झाली आहेत. सोनिया गांधींनी २००७ साली गुजरातच्या निवडणूक प्रचारात मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हटले होते. पण मग काँग्रेसेतर पक्षांना एवढे आक्र मक होण्याचे कारण काय असावे?
जेव्हा राजकारणातून वैचारिक संघर्ष लुप्त होतो तेव्हा त्याची जागा वैयैक्तिक संघर्ष घेत असतो. ममता बॅनर्जी हे याचे ठळक उदाहरण आहे. नोटबंदी नंतर ममतांचा केंद्र सरकारविषयीचा विरोध प्रचंड टोकाचा झाला आहे. तृणमूलच्या दोन खासदारांना चिट फंड घोटाळ्यात अटक झाल्यानंतर ममता इतक्या सैरभैर झाल्या आहेत की त्यांनी या अटकांना केंद्र सरकारचा व्यक्तिगत पातळीवरील सूड असे म्हटले आहे. मायावती सुद्धा त्यांच्या नातेवाईकांवर पडलेल्या छाप्यांमुळे कृद्ध झाल्या आहेत. एकूण दिसते असे की, मोदींनी दोघींच्याही हितसंबंधांना जबर धक्का दिला आहे. दरम्यान नोटबंदीच्या निर्णयामुळे मोदींच्याच काही समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, व तेही पंतप्रधानांच्या विरोधात एकत्र झाले आहेत.
आपण विरुद्ध सारे असे चित्र उभे करुन आपणास कसे बळी देण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे कदाचित मोदी यांनाही दाखवयाचे असेल. दिल्लीत त्यांच्या सारख्या बाहेरच्याने आपले स्थान निर्माण करण्याने त्या शहरातील सत्तावर्तुळात वर्षानुवर्षे राहून सुखसुविधा उपभोगत राहणाऱ्यांनाही धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या एका निवडणूक सभेत बोलताना मोदींनी इंदिरा गांधींच्या एका जुन्या घोषणेची नक्कल करताना म्हटले होते की, ‘वो कहते है मोदी हटाव, मै कहता हूँ करप्शन हटाव’! मोदींनी एकप्रकारे स्वत:च स्वत:ला विरोधी पक्षांच्या विरोधाचे मुख्य लक्ष्य बनवून घेतले आहे. केवळ तितकेच नव्हे तर त्यांना आपल्या कार्यक्रमात असे काही अडकवून टाकले आहे, की त्यांचे विरोधक व टीकाकार स्वत:चा कार्यक्र मच विसरून गेले आहेत. विरोधी पक्षांच्या कंपूची अवस्था एकप्रकारे गर्भगळीत झाल्यासारखी झाली असून त्यांना मोदींच्या उत्तम आणि अनुरूप प्रशासकीय मॉडेलसमोर लोकांच्या पुढ्यात पर्यायी मॉडेल सादर करणे अवघड जात आहे. संधिसाधूंची युती सुसंगत कार्यक्रमाची किंवा प्रशासनाची जागा घेऊ शकत नाही, हेच यातून दिसून येते.
अंकगणित हा निवडणुकांचा मोठा आधार असतो. सर्व मोदी विरोधक एकत्र येऊन मोठी आघाडी निर्माण करतील तर ते मोदींच्या व्यक्तिगत वर्चस्वास आव्हान देऊ शकतील. या बाबतीत बिहारचे उदाहरण पाहाण्यासारखे आहे. उत्तर प्रदेशातही बिहारच्या धर्तीवर महागठबंधनचा प्रयोग होण्याची शक्यता आहे. मोदींचे वादळ रोखण्यासाठी विरोधकांना मोठ्या आणि अभिनव कल्पनांची गरज आहे तर त्याचवेळी भाजपाला सुद्धा चिंता सतावणार आहे. कारण २०१९च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण विरोधीपक्ष एकट्या मोदींना विरोध करण्यासाठी एकवटू शकतो. अशा प्रकारचा प्रयोग १९७७ आणि १९८९ साली यशस्वीही ठरला आहे. अर्थात असाच प्रयोगा २०१९ सालीसुद्धा केवळ एकट्या मोदींना हरवण्यासाठी केला जातो वा नाही हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात जे घडले वा घडू शकेल तेच भविष्यात राष्ट्रीय पातळीवरही घडून येऊ शकते.
ताजा कलम- ‘एसएमएस’द्वारे प्राप्त एका विनोदात मोदींनी विरोधकांसमोर उभ्या केलेल्या आव्हानावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात असे म्हटले आहे की सर्वात आधी मोदींनी काळ्या पैशाविरोधातील मोहिमेसाठी ‘आप’कडून झाडू हिसकावून घेतला. नंतर काँग्रेसकडून गांधी काढून घेऊन स्वच्छ भारत अभियान चालू केले आणि आता त्यांनी गांधींकडून चरखाच काढून घेतला आहे.
-राजदीप सरदेसाई
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)

Web Title: If it happens in Uttar Pradesh, it can happen in the country too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.