उपेक्षा बालकवींच्या स्मारकाची

By Admin | Published: May 19, 2017 02:39 AM2017-05-19T02:39:11+5:302017-05-19T02:39:11+5:30

अजरामर अशा निसर्ग कवितांनी मराठी रसिकांना भुरळ घालणाऱ्या बालकवींची स्मृतिशताब्दी सुरूझालीय. या वर्षात तरी त्यांच्या जन्मगावी व मृत्युस्थळी यथायोग्य स्मारक उभे रहायला हवे.

Ignore the memorial of the Balkavi | उपेक्षा बालकवींच्या स्मारकाची

उपेक्षा बालकवींच्या स्मारकाची

googlenewsNext

- मिलिंद कुलकर्णी

अजरामर अशा निसर्ग कवितांनी मराठी रसिकांना भुरळ घालणाऱ्या बालकवींची स्मृतिशताब्दी सुरूझालीय. या वर्षात तरी त्यांच्या जन्मगावी व मृत्युस्थळी यथायोग्य स्मारक उभे रहायला हवे.

बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठी सारस्वताला पडलेले एक गोड स्वप्न आहे. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे... श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे... ऐल तटावर पैल तटावर, हिरवाळी लेवून.. यासारख्या अजरामर निसर्ग कवितांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या कवीच्या स्मृतिशताब्दी वर्षाला ५ मेपासून सुरुवात झाली. अभ्यासक्रमापासून तर प्रबंधापर्यंत अजूनही बालकवींच्या कवितांमधील निसर्गसौंदर्य, गूढता याचा अभ्यास नवीन पिढी करीत आहे. त्यांचे साहित्य हे खरे तर त्यांचे स्मारक आहे; परंतु जन्मगावी धरणगाव व मृत्युस्थळी भादली रेल्वे स्टेशनवर त्यांचे समर्पक असे स्मारक व्हावे, ही रसिकांची अपेक्षा मात्र फोल ठरत आहे. शासकीय लालफितीचा फटका बालकवींच्या स्मारकालाही बसला आहे.
केळी, कापूस आणि कवितांचा देश म्हणजे खान्देश अशी या प्रांताची ओळख आहे. ‘काव्यरत्नावली’सारखे केवळ कवितांसाठी वाहिलेले नियतकालिक जळगावात शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध होत असे. त्याच जळगावात १९०७मध्ये कविसंमेलन झाले. त्यात १७ वर्षीय त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी उत्स्फूर्तपणे पटका सादर केला. या तरुणाची विलक्षण प्रतिभा पाहून संमेलनाचे अध्यक्ष डॉ.कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ‘बालकवी’ ही उपाधी दिली. रेव्हरंड टिळक आणि कवी विनायक यांच्या उपस्थितीत हा गौरव झाला. बालकवींनी अवघ्या २८ वर्षांच्या आयुष्यात १६३ कविता लिहिल्या. त्यापैकी ४० प्रकाशित, तर १२३ अप्रकाशित आहेत.
धरणगाव येथे त्यांचा १३ आॅगस्ट १८९० ला जन्म झाला. वडील फौजदार होते. आजोळी राहिलेल्या बालकवींना कवितेची गोडी आई गोदूबाईकडून लाभली. रेव्हरंड टिळक यांच्याकडे काही काळ त्यांनी वास्तव्य केले. मिशनरी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केल्यानंतर ते खान्देशात परतले. ५ मे १९१८ रोजी जळगावनजीकच्या भादली रेल्वे स्टेशन येथे त्यांचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात की आत्महत्या याविषयी साहित्यविश्वात तर्कवितर्क लढविले गेले. अवघ्या ११ वर्षांच्या कालखंडात विलक्षण प्रतिभेने मराठी सारस्वतात ध्रुवासारखे अढळ स्थान बालकवींनी निर्माण केले.
धरणगावच्या जैन गल्लीत त्यांचा जन्म झाला. पण त्या ठिकाणी बालकवींचे स्मारक नाही. तत्कालीन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी हे गाव मतदारसंघात असल्याने स्मारकाचा प्रस्ताव मंजूर केला. शासकीय जागा मिळाली. तिला कुंपण घातले गेले. ४.५ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव देवकरांच्या नंतर लालफितीत अडकला आहे. योगायोगाने याच मतदारसंघाचे गुलाबराव पाटील हेदेखील मंत्रिमंडळात राज्यमंत्री असल्याने स्मारकाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. भादली रेल्वे स्टेशन येथे जन्मशताब्दीनिमित्त छोटे स्मारक उभारण्यात आले. एका संगमरवरी स्तंभावर ‘निर्झरास’ ही कविता कोरण्यात आली आहे. त्यावर निर्झर आणि बालकवींचे चित्र असून, त्यावर छत उभारण्यात आले आहे. शाळकरी मुलांच्या सहली अधूनमधून या ठिकाणी येत असतात. परंतु रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणात आता हे स्मारक अडथळा ठरत असल्याने हटविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मृत्यूनंतरही एखाद्या कवीची किती अवहेलना होऊ शकते, त्याचे हे उदाहरण आहे.
दिलासा देणाऱ्या गोष्टी एवढ्याच की, त्यांच्या स्मृती जपण्याचे काही प्रयत्नदेखील झाले आहेत. जैन उद्योगसमूहाने जळगावात ‘काव्यरत्नावली चौक’ सुशोभित केला असून, त्यात बालकवींची ‘श्रावणमासी’ ही कविता कोरली आहे. तसेच भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन ट्रस्टतर्फे बालकवी ठोंबरे यांच्या नावाने द्वैवार्षिक राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.
भौतिकता, यांत्रिकतेच्या आहारी जाऊन आम्ही संवेदनहीन होत असल्याचे सभोवताली चित्र असताना ‘काव्य-शास्त्र-विनोदा’ने जीवन आनंदमयी बनविण्याचा मार्ग आम्ही विसरत चाललो आहे, हे खरे म्हणजे बालकवींच्या स्मारकाच्या उपेक्षेमागील कारण आहे. परदेशी साहित्यिकांच्या स्मारकाचे गोडवे गाणारे आम्ही आमच्या श्रेष्ठ साहित्यिकांविषयी मात्र उपेक्षा करण्यात आघाडीवर आहोत. स्मृतिशताब्दी वर्षात तरी ही उपेक्षा थांबेल, अशी अपेक्षा करूया.

Web Title: Ignore the memorial of the Balkavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.