कंगनाबाई, तोल जाऊ देऊ नका, म्हणजे झाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 08:03 AM2024-08-20T08:03:25+5:302024-08-20T08:06:33+5:30

चित्रपटाच्या स्क्रीप्टप्रमाणे राजकारणातही स्वतःचे संवाद स्वत:च लिहून  कंगना राणावत विरोधकांना आपल्या वाक‌्बाणांनी घायाळ करत आहेत. 

Kangana Ranaut, don't let the balance go, that's it! | कंगनाबाई, तोल जाऊ देऊ नका, म्हणजे झाले!

कंगनाबाई, तोल जाऊ देऊ नका, म्हणजे झाले!

- प्रभू चावला
(ज्येष्ठ पत्रकार)

कंगना राणावत हे एक गूढ रहस्य आहे, असे वाटते खरे; पण बारकाईने विचार केला, तर लक्षात येईल की, सब्यसाची साडी लेवून सजलेले हे रहस्य हा प्रयत्नपूर्वक निर्माण केलेला एक आभासच होय!  नवशिक्या  राजकीय नेत्या असतानाही या बाई अचानक नैतिक पोलिस होऊन बसल्या आहेत, कारण समाज माध्यमांवरची त्यांची दांडगी लोकप्रियता! सिनेमाच्या पडद्यावरून राजकारणात आलेल्या इतरही काही महिला आहेत; पण या ३८ वर्षीय ‘हिरॉइन’चा नखरा काही वेगळाच. 

ही कुणी संकटात सापडलेली गरीब बिचारी अबला नारी नव्हे. स्वतःचे म्हणणे रेटून मांडणे पुरते जाणून असलेली ही बॉलीवूडची राणी काहीही झाले, तरी रणांगणातून मागे हटायला तयार नसते. लढत राहते. सहा वर्षांपूर्वी  नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन त्या भाजपत आल्या. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून भाजपने कंगना यांना उमेदवारी दिली आणि सिनेमांतून आलेल्या या राणीने विद्यमान खासदाराच्या मुलाचा पराभव करून थेट लोकसभेत पाऊल ठेवले. सिनेमा आणि राजकीय पक्ष; खरेतर दोन्ही प्रांतात बाई तशा उपऱ्याच. अजूनतरी त्यांनी दिल्लीत तोंडावर ताबा ठेवलेला दिसतो... पण पक्षात पहिल्यांदाच खासदार झालेल्या अनेकांपेक्षा पक्ष प्रवक्त्याची भूमिका त्यांना उत्तम साजून दिसेल, हे नक्कीच !

बॉलीवूडमधली शाही मंडळी असोत किंवा पक्षाची संघटनात्मक रचना, दोन्हीकडे कंगनाबाईंना तशी स्वीकृती नसली, तरी त्यांना ‘टाळता येणे’ शक्य नाही, हे सारे जाणतात. त्यांनी ४४ चित्रपट केले. त्यातले जेमतेम ६ सुपरहीट ठरले. शेवटचा चित्रपट तेजस. त्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. काही चित्रपटगृह मालकांनी, तर एकही तिकीट विकले न गेल्यामुळे तेजसचे खेळच रद्द केले.  मात्र, आता नरेंद्र मोदी यांच्यामुळे कंगनाबाई एका वेगळ्या भूमिकेत शिरल्या आहेत. ‘मी या शतकाची लढवय्यी असून, सुदैवाने सगळ्यांनाच उपेक्षित आवडतात’, असे त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले. संसदेतल्या इतर चित्रपट तारेतारकांपेक्षा त्या  वेगळ्या ठरतात. फिल्मी डायलॉग मारायला त्या कमी करत नाहीत. पुरुषी वर्चस्वाविरुद्ध उभ्या राहिलेल्या सबल स्त्री-भूमिका आजवर त्यांनी रंगवल्या. आता मोदींच्या अभिजनविरोधी पवित्र्यात त्या एकदम शोभून दिसत आहेत.

सगळे जग हा एक रंगमंच असून, सर्व स्त्री-पुरुष हे केवळ नट आहेत. त्यांचे येणे-जाणे ठरलेले आहे, असे शेक्सपिअरने म्हटले होते. दर नव्या रंगमंचावर ‘प्रवेश कसा करावा’, हे कंगना उत्तम  जाणतात. आपल्याखेरीज इतर पात्रे कोण आहेत, याची फिकीर त्यांना नसते. राहुल गांधी यांच्याविषयीची त्यांची अलीकडची वक्तव्ये पाहा. जातनिहाय जनगणनेवरच्या राहुल यांच्या वक्तव्यावर बोलताना कंगना यांनी बरेच फटाके फोडले. बॉलीवूडमध्ये असतानाही कंगना अशीच शेरेबाजी करत. करण जोहर यांना त्यांनी ‘भाईभतीजेगिरीचा म्होरक्या’, ‘मुव्ही माफिया’ म्हटले होते. महिला पोलिसाने मुस्काटीत मारल्यानंतर बॉलीवूड आपल्या पाठीशी उभे राहिले नाही, म्हणून त्यांनी जाहीर  टीका केली होती. उर्मिला मातोंडकर, सोनम कपूर, स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा यांच्यासाठीही कंगनाबाईंनी शेलके शब्द वापरले होते.

सध्याच्या राजकारणाचे मर्म कंगना याना चांगले उमगले  आहे : ‘विषारी बोला आणि लक्ष वेधून घ्या.’ वीसेक वर्षांपूर्वी त्यांनी म्हटले होते, ‘मला शिकायचे कसे हे चांगले कळते आणि त्याचा मला पुढे उपयोग होईल.’ आता तर त्या संसदेत पोहचल्या आहेत. थोडक्यात काय, तर सिनेमा आणि राजकारणात धडधडत जाणारा हा एक तोफखानाच आहे.
अनेक बड्या फिल्मी सिताऱ्यांकडून अपमानित झालेल्या कंगना अमरदीप राणावत यांनी ए ग्रेड नटी व्हायचे ठरवले, पण ते सोपे नव्हते.  आमंत्रण नसलेल्या फिल्मी पार्ट्यांमधल्या नखऱ्यांपेक्षा अभिनयाचे राष्ट्रीय पुरस्कार ही त्यांची  जमेची बाजू होती.  त्यांच्या इंग्रजी उच्चाराची सतत थट्टा झाली, पण त्यांनी हार मानली नाही. चांगल्या भूमिका मिळवल्या आणि त्यातल्या काहींचे सोने केले. सध्या त्या करत असलेल्या भूमिका भगवी ऑस्कर्स आणि शेवटी राजकीय जीवन गौरव मिळण्यासाठी पुरेशा आहेत. 

राजकारण हा एक मोठा बुलडोझर आहे. मोदी यांच्या एकेका शत्रूला गारद करणे हे जीवनध्येय असल्यासारखे वर्तन करणाऱ्या कंगना यांना ‘निर्बुद्ध बिंबो’ म्हणणे  चुकीचे ठरेल. वादविवादात चर्चा आपल्याकडे कशी ओढून घ्यावी, हे त्या उत्तम जाणतात. हल्ली तर नाट्यपूर्ण आविर्भावातून त्या स्वतःला भाजपच्या जोन ऑफ आर्क सिद्ध करण्याच्या मागे लागलेल्या दिसतात. याही आधी संसदेत फिल्मी सितारे होतेच, पण  कंगना त्यांच्याप्रमाणे वागू इच्छित नाहीत. हेमा मालिनी, शबाना आजमी प्रत्येक विषयावर बोलताना दिसत नसत. कंगना यांनी मात्र आपल्याला काय करायचे आहे, हे पक्के ठरवलेले आहे. 

चित्रपटाच्या स्क्रीप्टप्रमाणे राजकारणातही  स्वतःचे संवाद स्वत:च लिहून त्या विरोधकांना आपल्या वाक‌्बाणांनी घायाळ करत आहेत, पण या धावपळीत त्यांचा तोल जाऊन त्या केवळ बडबड करत राहिल्या, तर मात्र  अडचणीत येतील.
...त्यांच्या राजकीय स्वयंपाकघरात काय शिजते आहे कोण जाणे !

Web Title: Kangana Ranaut, don't let the balance go, that's it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.