थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला!
By admin | Published: September 6, 2015 04:35 AM2015-09-06T04:35:01+5:302015-09-06T04:35:01+5:30
विचार स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत अंधाराच्या एका मोठ्या कालखंडातून आपण समाज म्हणून जात आहोत, अशावेळी जिवाच्या भीतीमुळे आपले स्वतंत्र विचार व्यक्त करायचे थांबविण्याऐवजी शासनाला
- डॉ. हमीद दाभोलकर
विचार स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत अंधाराच्या एका मोठ्या कालखंडातून आपण समाज म्हणून जात आहोत, अशावेळी जिवाच्या भीतीमुळे आपले स्वतंत्र विचार व्यक्त करायचे थांबविण्याऐवजी शासनाला हे हत्यासत्र थांबविण्यासाठी कटिबद्ध व्हायला भाग पाडणे आणि दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांचे विचार समाजात रुजतील, हे प्रयत्न अहिंसेच्या मार्गाने करत राहणे, हे आपल्यातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
दोन वर्षांपूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसाठी ‘ते’ विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आले. १६ फेब्रुवारीला ‘ते’ कॉ. गोविंद पानसरेंसाठी कोल्हापुरात आले आणि गेल्या रविवारी तर प्रा. कलबुर्गींच्या घरीदेखील ‘ते’ आले. प्रत्येकवेळी बंदूक घेऊन गाडीवरून आलेले दोन तरुण सत्तरी पार केलेल्या विचार प्रसारकांना मारायला आले. उद्या ते प्रश्न विचारण्याचे धाडस करणाऱ्या आपल्यापैकी कुणासाठीही कुठेही येऊ शकतात. आपल्या स्वत:च्या विचारांवर (खरे सांगायचे तर अविचारांवर) या मारेकरी शक्तींचा इतकाही विश्वास नाही की आपण कोण आहोत, हे समाजासमोर येऊन सांगण्याचे त्यांना जड जात आहे.
या देशात राज्यघटनेचेच राज्य चालावे आणि या देशातील विधायक कृतिशील धर्मचिकित्सेची ज्योत तेवत राहावी म्हणून काम करणाऱ्या आणि संघटना बांधणाऱ्या नेत्यांवरच नेमके एकापाठोपाठ एकाच पद्धतीने कसे हल्ले होतात? आणि तेदेखील धर्माच्या नावावर अधर्म वाढत असलेल्या कालखंडात? स्वतंत्र विचार आणि धर्माची चिकित्सा नको असलेल्या, हिंसेचा पुरस्कार करणाऱ्या आणि धर्माच्या नावावर राजकारण आणि धार्मिक कट्टरीकरण करणाऱ्या संघटितशक्ती कोणत्या, हे ओळखणे इतके अवघड आहे का? या शक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बळ देणाऱ्या सगळ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, इसिस आणि तालिबानसारख्याच असणाऱ्या या प्रवृत्ती कधी ना कधी आपल्या जन्मदात्यांच्याच मुळावर उठतात, हा इतिहास आहे. राहता राहिला प्रश्न या समाजातील स्वतंत्र विचारांचे आणि धर्मचिकित्सेच्या संस्कृतीचे काय होणार?
(लेखक अनिसचे राज्य सरचिटणीस (पश्चिम महाराष्ट्र) आहेत.)