Lok Sabha Election Result 2024 : ...पुत्र सांगती चरित पित्याचे

By Shrimant Mane | Published: June 7, 2024 09:53 AM2024-06-07T09:53:10+5:302024-06-07T09:54:06+5:30

Lok Sabha Election Result 2024 : नुसते घराणे असून चालत नाही, नेतृत्वाचे गुण असावे लागतातच. असे गुणवान वारसच कर्तबगार पित्यांचा वारसाही पुढे चालवितात, हे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे.

Lok Sabha Election Result 2024 :...Son tells the charit of the father | Lok Sabha Election Result 2024 : ...पुत्र सांगती चरित पित्याचे

Lok Sabha Election Result 2024 : ...पुत्र सांगती चरित पित्याचे

- श्रीमंत माने
(संपादक, लोकमत, नागपूर)

लोकसभा निवडणुकीचे निकाल सांगतात, की घराणेशाहीची चर्चा वगैरे सगळे झूट आहे. ज्यांच्यात धमक असते ते चमकतातच. नुसते घराणे असून चालत नाही. नेतृत्वाचे गुण असावे लागतातच. ज्यांच्यात ते असतात ते स्वत: मोठे होतातच. शिवाय कर्तबगार पित्यांचा वारसाही पुढे चालवितात. असा वारसा चालविताना यंदा काही नेत्यांनी वडिलांच्या पश्चात अथवा त्यांच्या ठळक मदतीशिवाय लक्षणीय यश मिळविले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)चे प्रमुख चिराग पासवान  हे ते नेते आहेत. यात ३५ वर्षांचे तेजस्वी यादव सर्वांत तरुण आहेत. चिराग पासवान ४१ वर्षांचे आहेत, तर अखिलेश यादव येत्या १ जुलैला ५१ वर्षांचे होतील आणि उशिरा राजकारणात आलेले उद्धव ठाकरे यांनी साठी ओलांडली आहे.  उद्धव व तेजस्वी यांनी लोकसभा लढवली नाही. अखिलेश व चिराग यांनी निवडणूक लढवली व ते लोकसभेतही पोहोचले. अखिलेशवगळता इतर तिघे अपघाताने राजकारणात आले. 

अखिलेश यादव यांच्या आई मालतीदेवी यांची प्रकृती त्यांच्या जन्मावेळी बिघडली, ती अखेरपर्यंत. मुलायमसिंह यादव राजकारणात व्यस्त असल्यामुळे अखिलेशचा सांभाळ आजी - आजोबांनी केला. ते म्हैसूर येथे शिकले. सिव्हिल इंजिनिअर झाले. पर्यावरण अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी त्यांनी सिडनी येथून घेतली. तिशीच्या आत ते कन्नाैजचे खासदार, तर अडतिसाव्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. समाजवादी पार्टी सध्या पूर्णपणे अखिलेश यांच्या नियंत्रणात असली तरी ती त्यांना सहजपणे मिळालेली नाही. त्यासाठी घराण्यातील यादवी, शिवपाल - अखिलेश हा काका - पुतण्यांचा संघर्ष व आयुष्याच्या अखेरीस मुलायमसिंह यादव यांची झालेली फरपट देशाने पाहिली आहे.  

२०२२ची विधानसभा निवडणूक अखिलेश त्वेषाने लढले. तेव्हाही सपाची लाट असल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्ष भाजपच्या तुलनेत निम्म्याहून कमी जागा सपाला मिळाल्या. बूथ व्यवस्थापन, मतमोजणीच्या नियोजनात अखिलेश कमी पडले. त्या अनुभवातून ते बरेच शिकले. यावेळी ते इंडिया आघाडीत होते. चाैधरी चरणसिंह यांना ‘भारतरत्न’च्या मोबदल्यात राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी सोडून गेले. सोबतीला फक्त काँग्रेस उरली. तिचे संघटन असूनही नसल्यासारखेच. परिणामी, दोन्ही पक्षांची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर आली आणि निम्म्यापेक्षा अधिक जागा जिंकून त्यांनी आपले नाणे खणखणीत वाजवले. 

रामविलास पासवान १९६९पासून राजकारणात असले, तरी चिराग पासवान यांच्या आवडीचे क्षेत्र ते नव्हते. त्यांना अभिनेता व्हायचे होते. ‘मिले न मिले हम’ हा २०११मधील पहिलाच चित्रपट दणकून आपटला. चिराग राजकारणाकडे वळले. २०१४मध्ये जमुईमधून लोकसभेवर निवडून गेले. आताचा विजय ही त्यांची तिसरी टर्म आहे. अखिलेश यांच्याप्रमाणेच चिराग यांनाही पक्षावर पकड मिळविताना काका पशुपती पारस यांच्याशी संघर्ष करावा लागला. भाजपने त्यावेळची गरज म्हणून काकांना जवळ घेतले. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र चिराग यांच्यावर अधिक विश्वास टाकला.

तेजस्वीला क्रिकेटपटू व्हायचे होते. लालूप्रसाद व राबडीदेवी यांच्या नऊ अपत्यांपैकी हे शेंडेफळ दिल्लीत शिकत असताना क्रिकेटकडे इतके आकर्षित झाले की, त्याने शाळेला रामराम ठोकला. काही प्रथम श्रेणी सामने, मुश्ताक अली चषक किंवा २००८च्या पहिल्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात स्थान इतकीच त्यांची मैदानावरील कामगिरी. तेजस्वी झारखंडकडून खेळला. क्रिकेट सोडावे लागल्यावर तो राजकारणाकडे वळला. २०१५ पासून आमदार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेससोबतच्या महागठबंधनचे नेतृत्व तेजस्वी यादव यांनी केले आणि  त्याच्या झंझावाती प्रचारामुळेच विधानसभेत राष्ट्रीय जनता दल सर्वांत मोठा पक्ष बनला. नितीश कुमार भाजप सोडून महागठबंधनसोबत आले. मुख्यमंत्री बनले. दोन वर्षांनंतर त्यांनी पुन्हा पलटी मारली व तेजस्वी यादव एकाकी पडले. तेजस्वीने पुन्हा प्रचाराचा झंझावात उभा केला आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीचे दोन आकडी खासदार निवडून आणले. 

उद्धव ठाकरे यांनी २००२मध्ये बृहन्मुंबई महापालिकेत पहिल्यांदा शिवसेनेचा प्रचार केला. पुढच्या वर्षी ते कार्याध्यक्ष बनले. नारायण राणे, राज ठाकरे वगैरेंच्या रूपाने शिवसेना दुभंगत गेली आणि सगळी जबाबदारी अखेरीस उद्धव ठाकरे यांच्यावर आली. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना केलेला भाजपचा  सामना व जिंकलेल्या ६३ जागा ही त्यांची पहिली मोठी कामगिरी होती. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून ते मुख्यमंत्री बनले. कोरोना महामारीच्या काळात आघाडी सरकार समर्थपणे चालवले. पण, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात मोठे बंड झाले आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यापुढचा इतिहास अगदीच ताजा आहे. 

 

Web Title: Lok Sabha Election Result 2024 :...Son tells the charit of the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.