जळते आहे ते फक्त मणिपूर नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 08:14 AM2024-09-24T08:14:05+5:302024-09-24T08:14:55+5:30

खरी विदारक बातमी मणिपूरची नाही, ती दिल्लीच्या निष्ठुरतेबद्दलची आहे. एका अख्ख्या राज्याकडे दुर्लक्ष करून पसरलेल्या सुन्न सन्नाट्याबाबतची आहे.

Manipur which has been burning with communal violence for the past seventeen months has once again erupted in violence | जळते आहे ते फक्त मणिपूर नाही!

जळते आहे ते फक्त मणिपूर नाही!

योगेंद्र यादव
राष्ट्रीय संयोजक, भारत जोडो अभियान

मणिपूर जळत आहे... पण,  आता ही काही ‘बातमी’ नव्हे!   बातमी म्हटली की, तिच्यात काहीतरी  नावीन्य हवे. हरघडी घडणारी गोष्ट बातमी कशी होऊ शकेल?  

गेले सतरा महिने जातीय हिंसेच्या आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा  हिंसा उफाळली आहे. नव्या हिंसाकांडात आणखी दहा निरपराध माणसे मारली गेली. मृतांची संख्या २०० पेक्षा जास्त झालीय. राज्याच्या बहुतेक भागातील इंटरनेट बंद आहे. अनेक ठिकाणी कर्फ्यू पुकारला गेल्यानंतरही परिस्थिती शांत झालेली नाही... तरीही सरकारी सूत्रे म्हणतात, परिस्थिती नियंत्रणाखाली आहे!

 सुमारे साठ हजार मणिपुरी माणसांना घरदार सोडून आणखी एक हिवाळा  निर्वासितांच्या छावणीतच कंठण्यावाचून तरणोपाय राहिलेला नाही.  दोन जमातींत उफाळलेला हा  हिंसाचार रोखणे आपल्याला शक्य होत नसल्याची   हतबल कबुली  सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे. मणिपुरात तैनात आसाम रायफलचे माजी प्रमुख म्हणतात, मणिपूर पोलिसांतसुद्धा आता मैतेई पोलिस आणि कुकी पोलिस अशी विभागणी झाली आहे. एक नवीच सीमारेषा आता मणिपूर राज्याअंतर्गत  तयार झाली आहे. आपल्या  सुरक्षादलांच्या  नव्हे, तर विशिष्ट जमातीच्या शिपायांना ओळख पटवून दिल्यावरच ‘आत’ जाता येते. दोन्ही बाजूंना बंकर खोदले गेले आहेत. विरोधी बाजूचा कोणी नजर चुकवून आत आला तर त्याला गोळी घातली जाते. खुद्द मुख्यमंत्री आपल्याच राज्याच्या कुकीबहुल जिल्ह्यांत जाऊ शकत नाहीत. कुकी जमातीचे आमदार आपल्या राज्याच्या विधानसभेच्या आसपास फिरकू शकत नाहीत. राज्यात कुणाचे राज्य चालले आहे, याचा कुणालाच पत्ता नाही. 

मणिपुरात हिंसा सुरू झाली तेव्हापासून पंतप्रधान मोदी जपान, पापुआ न्यू गिनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इजिप्त, फ्रान्स, संयुक्त अमिरात, द. आफ्रिका, ग्रीस, इंडोनेशिया, कतार, भूतान, इटली, रशिया, ऑस्ट्रिया, पोलंड, युक्रेन, ब्रुनेई आणि सिंगापूर इतक्या राष्ट्रांचा दौरा करून आलेत. अमेरिकेच्या मागोमाग ते  लाओस, सामोआ, रशिया, अझरबैजान आणि ब्राझीलला जात आहेत; परंतु त्यांनी मणिपूरला जाण्याचा काही कार्यक्रम आखला असल्याचे  आज तरी  ऐकिवात नाही. 
 
चटपटीत बातम्यांच्या शोधातले पत्रकार म्हणतील, कुकी आणि मैतेई हे काय आहे? काही हिंदू-मुसलमान वगैरे असलं तर सांगा. प्रेक्षकांचे/वाचकांचे कान टवकारले पाहिजेत,  डोळे खिळून राहिले पाहिजेत! - तर आता मीच एक सनसनाटी बातमी पुरवावी म्हणतो!
असे कळते, की सध्या मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई जमातीचे लोक परस्परांवर बंदुकीने वैगेरे हल्ला करत नाहीत. आता ड्रोन आणि रॉकेट लाँचरचा उपयोग सुरू झाला आहे. मणिपूर पोलिसांनीच याला दुजोरा दिलाय. आता फक्त रणगाड्यांचा वापरच काय तो बाकी आहे. तसे झाले, की कदाचित मणिपूर ही ‘बातमी’ होऊ शकेल.

मणिपुरातील हिंदू बहुसंख्याक म्हणजे मैतेई जमातीच्या लोकांनीच मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्यावर अविश्वास व्यक्त केल्याचीही माहिती आहे. याअगोदर सदर मुख्यमंत्री उघड-उघड मैतेई समर्थक असल्याचा आरोप करत कुकी जमातीच्या लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला होता. या बहिष्काराचा फायदा उचलत बीरेन सिंहसाहेब मैतेई हृदयसम्राट बनले होते. कोणत्याही फूटपाड्या राजकारणाचा शेवट नेहमी  असाच होत असतो. सुरुवातीला  ज्यांची बाजू उचलून धरत असल्याचे तुम्ही  दाखवता  त्यांच्या लक्षात एक ना एक दिवस  तुमचा  खरा डाव आल्यावाचून राहत नाही. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी एवढे कारण पुरेसे नाही का?

मणिपुरात या राज्याचा मुख्यमंत्री स्वतः महामहिम राज्यपालांना पत्र लिहून मागणी करतो की, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी त्याच्यावर सोपवली जावी! म्हणजे घटनेने जो अधिकार त्याला मुळातच दिलेला आहे तो आता त्याला प्रत्यक्षातही देण्यात यावा! या प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्राने नियुक्त केलेल्या सुरक्षा सल्लागाराच्या हाती दिलेली आहे. समजा,  या राज्यात आज विरोधी पक्षाचे सरकार असते तर? केंद्रीय गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात गफलत केली अशी बातमी आलीच असती ना?

पण, एक चांगली बातमी अशीही आहे, की मणिपूर आता बोलू लागले आहे. मणिपूर खोऱ्यातील नवनिर्वाचित खासदार बिमोल अकोईजाम यांनी अगदी मध्यरात्री लोकसभेत एक ऐतिहासिक भाषण केले. प्रधानमंत्र्यांच्या संपूर्ण भाषणादरम्यान विरोधी पक्ष एकसुरात ‘मणिपूर, मणिपूर’ असा घोष करत राहिला... खरे तर याची बातमी व्हायला काही हरकत नव्हती.

आणखी एक बातमी सांगू? मात्र ही बातमी मणिपूरची नाही. ती दिल्लीच्या निष्ठुरतेबद्दलची आहे. देशभर पसरलेल्या सुन्न सन्नाट्याबाबतची आहे. आमची मने व्यापून राहिलेल्या  काळ्यामिट्ट अंधाराबाबतची आहे. खरी विदारक बातमी ही आहे की, आज  आपल्यासमोर जळून राख होत आहे ते केवळ मणिपूर नाही. भारत नावाच्या आपल्या  स्वप्नालाच आग लागली आहे. बालपणी आपण एक गाणे मनोभावे  ऐकत होतो, गात होतो- सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा..! 
त्या प्रिय प्रिय गीताच्या गाभ्यालाच जणू  आज चूड  लावली जात आहे.
 

Web Title: Manipur which has been burning with communal violence for the past seventeen months has once again erupted in violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.