‘स्वदेशी’चा दुसरा अध्याय सुरू करण्याची गरज

By Admin | Published: October 3, 2016 06:16 AM2016-10-03T06:16:22+5:302016-10-03T06:16:22+5:30

गेल्या साठ-पासष्ट वर्षांत आपण देशाला काय देऊ शकलो? गरिबी दूर करू शकलो नाही,

The need to start the second chapter of Swadeshi | ‘स्वदेशी’चा दुसरा अध्याय सुरू करण्याची गरज

‘स्वदेशी’चा दुसरा अध्याय सुरू करण्याची गरज

googlenewsNext


गेल्या साठ-पासष्ट वर्षांत आपण देशाला काय देऊ शकलो? गरिबी दूर करू शकलो नाही, आरोग्य, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार पुरवू शकलो नाही. देश प्रगती करेल असे काहीही करू शकलो नाही. आपण एकच केलं.. द्वेष आणि शत्रुत्व. पण ते करताना एक महत्त्वाची गोष्ट मुद्दाम विसरलो.. इस्लामला नफरत मंजूर नाही. उलट इस्लाम सांगतो, जो नफरत करतो; तो मुसलमानच नाही. जरा भारताकडे लक्ष द्या, एवढ्याच काळात त्या देशाने किती प्रगती केली आहे. हे इतकं स्पष्ट, परखड कोणी बोलावं आणि आपल्याच आजवरच्या कारभाराचं इतकं कठोर परीक्षण कोणी करावं तर पाकिस्तानच्या एक संसद सदस्य फौजीया एझाझ खान यांनी. इतकं वस्तुस्थितीदर्शक भाषण केल्यानंतर त्यांच्या भावनांचा बांध फुटला आणि त्यांना संसदेतच रडू कोसळलं. खान यांचं हे वक्तव्य येथे मांडायचं कारण इतकंच की भले अल्पसंख्य असतील पण पाकिस्तानातही काही समंजस लोक आहेत. सारेच माथेफिरू नाहीत. पण भारताचं आणि खरे तर मानवजातीचंच हे दुर्दैव की, एक तर असे आवाज बाहेर येण्याआधीच दाबले जातात अन्यथा ते साफ दुर्लक्षिले जातात.
जम्मू-काश्मिरातील उरी येथील लष्करी तळावर हल्ला करून १९ भारतीय जवानांची जी हत्त्या केली तो भारताच्या सार्वभौमत्वावर पाकिस्तानने केलेला आणखी एक हल्ला होता. आजवर असे अनेक हल्ले झाले पण पाकिस्तान आज सुधारेल, उद्या सुधारेल या आशेवर भारत होता. पण तशी लक्षणे दिसत नाहीत याची खात्री पटल्यानंतर मगच भारतीय सेनेने नियंत्रण रेषा ओलांडून पाकने बळकावलेल्या काश्मीरमध्ये घुसून अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला व त्यांची सात ठिकाणे नेस्तनाबूत केली. पाकने कधीही अशा जोरकस प्रतिकाराची अपेक्षा केली नसणार आणि म्हणूनच भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरापायी निर्माण झालेल्या स्थितीवर विचार करण्यासाठी तेथील संसदेचे संयुक्त अधिवेशन भरविण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर फौझिया खान यांचे वरील उद्गार अत्यंत समर्पक ठरतात, भले ते मागील आॅगस्ट महिन्यातले का असेना. पण अशा आवाजाचा तेथील सरकारवर काही परिणाम होईल अशी आशा आपण बाळगू शकत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण भारताचे निकष लावून तिथे नवाझ शरीफ यांचं सरकार आहे असं मानतो कारण ते पाकी लोकांनी निवडून दिले आहे. पण आजवर त्या देशात जेवढी म्हणून लोकनियुक्त सरकारे आली ती केवळ नामधारीच राहिली. सारी सत्ता तेथील लष्कर आणि आयएसआय या त्यांच्या गुप्तहेर संघटनेकडेच राहिली आहे. शरीफ याला अपवाद नाहीत. १९९९ साली पाकिस्तानने कारगिल युद्ध छेडलं तेव्हाही शरीफच पंतप्रधान होते. पण त्यांना डावलून परवेझ मुशर्रफ यांनी युद्धाचा निर्णय घेतला व त्यात हातही पोळून घेतले. एक व्यक्ती आणि एक राजकारणी म्हणून शरीफ यांना संघर्ष नको असला, भारताशी मैत्री आणि सलोखा हवा असला तरी त्याला शेवटी काहीही अर्थ उरत नाही. याउलट सध्याचे भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांनी अनेक देशांचे दौरे केले. तेथील सरकार प्रमुखांशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित केले. भारताची भूमिका आणि भारताला भेडसावणाऱ्या दहशतवादाच्या संकटाची त्यांना जाण करून दिली. पाकिस्तान आणि नवाझ शरीफ यांच्या संदर्भात पंतप्रधान मोदी यांचे असे प्रयत्न नित्याचे होते. पण त्यांच्या या प्रयत्नांना कधीच अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. पठाणकोटच्या हवाई तळावर झालेला अतिरेक्यांचा हल्ला जिव्हारी लागणारा होता. तरीही मोदींनी पाकिस्तानी तपास यंत्रणेला पठाणकोटला तपासासाठी येऊ दिलं. निवडणूक प्रचारात पाकिस्तानला धडा शिकविण्याविषयी बोलणारे मोदी हवाई तळावरील हल्ल्यानंतरही शांत बसलेले पाहून मग त्यांच्यावर प्रच्छन्न टीका होऊ लागली. पण हे सारे ते सहन करीत होते आणि जनमत आपल्याला अनुकूल बनविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. पण उरी हल्ला ही बहुधा उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली. लोक अधिकच त्वेषाने बोलू लागले. सरतेशेवटी मोदी आणि त्यांचे सरकार नाजूक हातांनी शस्त्रक्रिया करून मोकळे झाले. रातोरात टीकाकार प्रशंसक बनले.
गेल्या बुधवारी जी चढाई केली त्यानंतर कोणत्याही देशाने भारताला दोषी मानले नाही वा पाकिस्तानची पाठराखण केली नाही. उलट काही मोठ्या देशांनी पाकिस्तानला चार खडे बोल सुनावले. पण अमेरिका अजूनही पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत वा कर्जे देऊन ती माफ करायचे थांबवायला तयार नाही. रशियानेही पाकबरोबर संयुक्त लष्करी कवायती करण्याचे थांबवले नाही. सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भात चीनदेखील भारताच्या थेट विरोधात गेला नाही. पण मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ठरावाच्या विरोधात चीनने पुन्हा एकदा त्याच्या नकाराधिकाराचा वापर केला आहे. चीन काय किंवा अगदी अमेरिका काय, सारे देश आता व्यापारी बनले आहेत. अशा परिस्थितीत आपण एक नक्की करू शकतो, चिनी उत्पादनावर बहिष्कार! नाक दाबले की तोंड उघडते म्हणतात. पण प्रत्येकाचे नाक सारखे असत नाही. केवळ भारतच नव्हे तर अखिल मानवजातीच्या विनाशाला ज्यांचा धोका संभवतो असे चार घटक आज पाकमध्ये कार्यरत आहेत. लष्कर, आयएसआय, भारतद्वेषाचे बाळकडू आणि पुढील शिक्षण देणारे तिथले मदरसे व त्यातून तयार होणारे अतिरेकी. एरवी तेथील सामान्य जनता भारतीयांवर प्रचंड प्रेम करते, भाऊ-बहीणच मानते. पण ती स्वतंत्र नाही. माझ्या प्रत्येक पाक भेटीत मी याचा अनुभव घेतला आहे. तेथील माध्यमांशी बोलताना जेव्हा मला उभय देशांची तुलना करायला सांगितले तेव्हा मी म्हटले होते, भारतात खरी लोकशाही आहे, सर्व धर्मांविषयी आपुलकी आहे पण धर्मांधता नाही. बौद्ध, महावीर आणि बापू गांधी आहेत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे.
जाता जाता : भारतात तयार होणाऱ्या हिंदी सिनेमांमध्ये अभिनयाची किंवा संगीत देण्याची नोकरी करणाऱ्या पाकिस्तानी कलावंतांचे काय करायचे हा आजचा एक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. दोन्ही देशातील संघर्ष आणि तणाव दूर करण्यासाठी उभय बाजूंकडील लोकांमध्ये थेट संबंध प्रस्थापित केले जाण्याचे महत्त्व कोणीच नाकारत नाही. पण आजच्यासारख्या युद्धजन्य परिस्थितीत असे उपाय संदर्भहीन ठरतात. सलमान खानने जरा त्याच्याच वडिलांशी चर्चा केली असती आणि पाकी कलावंत दहशतवादी नाहीत वगैरे तत्त्वज्ञान न पाजळता दहशतवादाचा धिक्कार आणि उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती सहानुभूती व्यक्त करण्याची शिकवण त्या कलाकारांनाच दिली असती तर आज तो भारतीय जनतेच्या नजरेत खलनायक ठरला नसता.
-विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)

Web Title: The need to start the second chapter of Swadeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.