नरेंद्र मोदी यांचे ‘द ग्रेट टॅलेंट हंट’; भावी राष्ट्रपती कोण? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 09:05 AM2022-06-02T09:05:35+5:302022-06-02T09:10:01+5:30

नरेंद्र मोदी गुणवान माणसांना विसरत नाहीत. योग्य वेळी योग्य माणसाला योग्य जबाबदारीसाठी ते नेमके उचलतात! प्रश्न असा, की भावी राष्ट्रपती कोण?

PM Narendra Modi's 'The Great Talent Hunt'! | नरेंद्र मोदी यांचे ‘द ग्रेट टॅलेंट हंट’; भावी राष्ट्रपती कोण? 

नरेंद्र मोदी यांचे ‘द ग्रेट टॅलेंट हंट’; भावी राष्ट्रपती कोण? 

Next

- हरीष गुप्ता

आपल्या सरकारचे काम अधिक चांगल्या रीतीने व्हावे यासाठी बहुतेक सर्व पंतप्रधान गुणवान माणसांच्या, वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञांच्या शोधात असतात. सनदी सेवांच्या बाहेरून चांगली माणसे सरकारमध्ये आणण्याची संकल्पना नेहरूंनी आणली. इंदिरा गांधी यांनी ती पुढे चालवली. राजीव गांधी यांनी तर तंत्रज्ञानविषयक १० संस्था निर्माण केल्या आणि त्यांचे नेतृत्व करण्यासाठी बाहेरून चांगली माणसे घेतली. त्यानंतर आलेल्या पंतप्रधानांनीही गुणवान व्यक्तींचा शोध चालू ठेवला. परंतु सत्तास्थानावरून कारभार हाकताना त्यांना काही वेळा नमतेही घ्यावे लागले. परंतु पंतप्रधान मोदी हे वेगळ्याच मुशीतून घडलेले आहेत.

लपलेली गुणवत्ता ते कायम शोधत असतात. त्यांचे हे गुणवंतांचे संशोधन पद्म पुरस्कारांपर्यंत जाऊन पोहोचते. आता त्यांनी सर्व सरकारी पुरस्कारांसाठी एक संयुक्त विभाग स्थापन करावा, अशी कल्पना मांडली आहे. यातल्या अनेक तपशिलांत ते भरपूर वेळ देऊन लक्ष घालत असतात. याबाबतीत घाई मुळीच करत नाहीत. योग्य वेळ येण्याची वाट पाहतात. क्वचित एखादे पाऊल मागे घ्यायलाही कचरत नाहीत. उदाहरणार्थ, मनमोहन सिंग सरकारने आणलेल्या आधार कार्डांच्या योजनेबद्दल त्यांच्या मनात अढी होती. परंतु या योजनेचे शिल्पकार नंदन निलेकणी यांना भेटल्यानंतर मोदी यांच्यात आश्चर्यकारक बदल झाला आणि ते त्यांच्यामागे उभे राहिले.

यंत्रणेच्या बाहेरून गुणवान व्यक्ती आत घेण्यासाठी मोदींनी आता दारे खुली करून दिली आहेत. त्यानुसार विविध संस्थांवर कंत्राटी पद्धतीने ही माणसे घेतली जातील. त्यात विविध महामंडळे तर आलीच, पण सचिव पातळीवरच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असेल. त्यांच्या मंत्रिमंडळातही अनेक मंत्री असे आहेत, ज्यांना राजकारणाचा अनुभव नव्हता. उदा. एस जयशंकर, आर. के. सिंग, हरदीप पुरी, अश्विनी वैष्णव! अर्थात,  मनात काही हेतू असल्याशिवाय मोदी काहीही करत नाहीत. मोदींनी हे का केले हे इतक्यात सांगणे मात्र कठीण आहे.

गणेशी लाल यांचे नाव कधी ऐकलेय? 

जुलै २०२२ मध्ये देशाचे राष्ट्रपती कोण होतील हे जाणून घ्यायची ज्यांची इच्छा असेल, त्यांना गणेशी लाल यांची गोष्ट माहीत करून घ्यावी लागेल. मोदी यांनी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदासाठी मुक्रर केले तेव्हा अनेकांना ते माहिती नव्हते. ना ते संघाचे वा भाजपाचे आघाडीचे नेते होते, ना दलितांचे  पुढारी. मोदींच्या राजकीय गणितात ते बसले इतकेच. मोदींची नजर गुजरातच्या निवडणुकीवर होती आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना दलितांची मतेही हवी होती.

मोदी यांची निवड बरोबर ठरली. भाजपाने कडव्या झुंजीत गुजरातची निवडणूक जिंकली आणि लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवले. अर्थातच दलितांची अधिक मते भाजपाकडे आली होती. मायावती यांचे राजकीय महत्त्व कमी झाले होते. यामुळे झाले असे की महत्त्वाच्या पदावर मोदींनी केलेली एखाद्या व्यक्तीची निवड बारकाईने पाहिली जाऊ लागली. गणेशी लाल हे असेच एक उदाहरण आहे. 

मे २०१९ मध्ये ओडिशाच्या राज्यपालपदी नेमणूक होईपर्यंत हे नाव कोणालाही ठाऊक नव्हते. हरियाणातील हरियाणा विकास पक्ष आणि भाजपाच्या सरकारमधील ते एक मंत्री होते. मुख्यमंत्री होते बन्सीलाल. या गणेशी लाल यांची मंत्रिपदाची कारकीर्द अल्पशी होती. आणि नंतर तर ते राजकीय अज्ञातवासातच गेले. २०१४ साली मोदी दिल्लीत आले. परंतु गणेशी लाल यांच्यावर त्याचा काहीच परिणाम नव्हता. त्यांच्याशी संपर्कही नव्हता. मात्र मोदी त्यांना विसरले नव्हते. त्याचे कारणही तसेच होते.

नव्वदच्या दशकात मोदी हरियाणामध्ये भाजपाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात भिडलेले असताना शिरसात गणेशी लाल हा भाजपाचा एकमेव आवाज होता. अत्यंत चमकदार अशी शैक्षणिक कामगिरी असलेल्या गणेशी लाल यांनी संघ स्वयंसेवक म्हणून निष्ठेने काम केलेले आहे. सध्या ते ७६ च्या घरात आहेत. आपल्या घरी गाढ निद्रेत असताना त्यांचा फोन वाजला. पलीकडे साक्षात पंतप्रधान होते.  दुसऱ्या दिवशी गणेशी लाल दिल्लीत आले आणि ओडिशाचे राज्यपाल झाले. हे गणेशी लाल राष्ट्रपती होण्याची शक्यता नाही. त्यांच्या या कहाणीचे तात्पर्य असे की मोदी विसरत नाहीत आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहून योग्य माणसाला उचलतात. मोदी आपल्याला महत्त्वाच्या पदावर बसवतील, असे स्वप्नही अनेकांनी पाहिले नव्हते. विशेष म्हणजे गणेशी लाल यांचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी मधुर संबंध आहेत. 

भावी राष्ट्रपती कोण? 

या प्रश्नाच्या उत्तरासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला कोण बळ देईल, मोदींना कोण साहाय्यभूत होईल हे पाहावे लागेल. दहा जूनला राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपचे  बहुतेक उमेदवार ओबीसी आणि दुर्बल घटकातून आलेले आहेत. नितीश कुमार आणि इतर अनेक मुख्यमंत्र्यांनी जातीय आधारावर जनगणना करण्याची मागणी केली आहे. प्रारंभी या कल्पनेला भाजपने विरोध केला, पण आता पक्षाने ती उचलून धरली आहे. पुढचे राष्ट्रपती बहुधा दुर्बल घटकातून, विशेषत: मागास वर्गातून आणि शक्य झाले तर दक्षिणेतून येतील. दक्षिण भारतातून एखाद्या मागासवर्गीय महिलेचे नाव मोदींच्या यादीत आले, तर काम आणखी सोपे होईल.

Web Title: PM Narendra Modi's 'The Great Talent Hunt'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.