पब्ज, पोर्शे आणि पिअक्कड नवश्रीमंतांची मस्ती

By संदीप प्रधान | Published: May 21, 2024 11:23 AM2024-05-21T11:23:41+5:302024-05-21T11:26:21+5:30

हाती गडगंज पैसा आला की त्याची मस्ती आणि गुर्मी येतेच. पुण्यात एका मद्यधुंद अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघाताने ते पुन्हा एकदा सिद्ध होते आहे.

Pubs, Porsches and drunken nouveau riche fun | पब्ज, पोर्शे आणि पिअक्कड नवश्रीमंतांची मस्ती

पब्ज, पोर्शे आणि पिअक्कड नवश्रीमंतांची मस्ती

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे -

पुण्यातील कल्याणीनगर येथे शनिवारी मध्यरात्री एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे या महागड्या मोटारीने दुचाकीवरील तरुण-तरुणीला एखाद्या चेंडूसारखे हवेत उडविल्याने त्यांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीपर्यंत पबमध्ये मद्यपान केलेल्या या अल्पवयीन मुलास मद्य देणाऱ्या पब मालकावर तसेच मुलगा वयात आला नसतानाही त्याच्या हाती मोटार सोपवणाऱ्या वडिलांवरही गुन्हा दाखल झालाय. दोनजणांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या मुलास न्यायालयाने जामीन मंजूर केला.

पुण्यातील ही घटना काही अशा स्वरूपाची पहिली घटना नाही. बॉलिवूडस्टार सलमान खान याने काही वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत दुकानाच्या पायरीवर मोटार चढवून तेथे झोपलेल्या दोनजणांना चिरडले होते. त्यावेळी सलमानची अवघ्या ९५० रुपयांच्या जामिनावर सुटका झाल्याने तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केले होते. 

या घटनेनंतर सलमानचे वास्तव्य असलेल्या वांद्रे पालीहिल परिसरात एका मोटारीला अपघात झाल्यावर सलमानने अपघातग्रस्त तरुणाला आपल्या मोटारीतून विलेपार्ले येथील घरी सोडले, अशी सलमानमधील ‘माणुसकी’चे दर्शन घडवणारी बातमी त्याच्या प्रतिमासंवर्धनाचा ठेका घेतलेल्या कंपनीने वृत्तपत्रात छापून आणली होती. देशात २०२२ मध्ये मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या तीन हजार २६८ होती. २०२३ मध्ये मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या १६ हजार १७३ लोकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. दारू पिऊन वाहन चालवू नये याकरिता कडक कायदा केला. सहा महिने तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद केली. मात्र, तरीही मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रमाण कमी होत नाही. कायद्याच्या, शिक्षेच्या धाकाने गुन्हे करण्याची प्रवृत्ती कमी होत नाही, हेच दिसून आले.

गेल्या काही वर्षांत एकाच शहरात दोन शहरे वसवली जाण्याचे प्रमाण नागरीकरणाच्या रेट्यामुळे वाढत आहे. जुने पुणे हे मध्यमवर्गीय लोकवस्ती असलेले सांस्कृतिक केंद्र वगैरे. एकेकाळी या शहरात रात्री नऊनंतर सामसूम होत असे. याच पुण्यातील जोशी-अभ्यंकर हत्याकांडाने १९८० च्या दशकात पुणेकरांचा थरकाप उडवून टाकला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत पुण्यातील कल्याणीनगर, विमाननगरपासून खराडीपर्यंतचा १० कि.मी.चा परिसर आयटी उद्योग व त्यामध्ये लठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांवर काम करणाऱ्या तरुण, तरुणींच्या वास्तव्यामुळे विकसित झाला. येथील खडकाळ जमिनीला लाखमोलाचा भाव आला. तिकडे बाणेर, बालेवाडी हा परिसरही असाच विकसित झाला आहे. एकेकाळी कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमामुळे त्या परिसरात हे नाईट कल्चर होते. मात्र, आता पुण्यालगतच्या परिसरात ठिकठिकाणी हे दिसते. 

पुण्यात दरवर्षी पाच ते सहा लाख विद्यार्थी शिक्षणाकरिता येतात. त्यापैकी अनेकांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पुण्यातील आयटी पार्कमध्ये नोकरी मिळते. त्यांचे मित्रमंडळी तेथेच वास्तव्याला असल्याने शुक्रवार व शनिवारच्या रात्री पुण्यालगतच्या परिसरात उभ्या राहिलेल्या किमान १५० पब्जमध्ये पहाटे तीन ते चारपर्यंत धुमाकूळ सुरू असतो. अनेक तरुण, तरुणी येथील हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. नव्या पुण्यातील गुन्हेगारी ही पोलिसांची डोकेदुखी झाली आहे. ठाण्यातही घोडबंदर रोड परिसरात असेच नवे ठाणे वसले आहे. जुन्या चरई व नौपाड्यातील ठाण्याचा आणि घोडबंदर रोडवरील ठाण्याचा सूतराम संबंध नाही. घोडबंदर रोडला राहणारे स्वत:ला ठाणेकर मानत नाहीत. ते आपली नाळ मुंबईशी जोडल्याचे सांगतात व तसेच वागतात. घोडबंदर परिसरातही मॉल, पब्ज उभे राहिले आहेत. मुंबईत नोकरी करणारे तरुण, तरुणी येथे वास्तव्य करतात. तोच प्रकार नवी मुंबईबाबत आहे. मध्यमवर्गीयांची घराची निकड भागविण्याकरिता नवी मुंबई उभी राहिली. गेल्या काही वर्षांत येथे पाम बीच रोड भागात असेच टॉवर, पब्ज, हॉटेल उभे राहिले. आयटी क्षेत्रात काम करणारी तरुणाई येथे राहते. येथेही तेच नाईट कल्चर आहे. जुन्या शहरांमध्ये वसलेल्या या नव्या शहरांमध्ये वास्तव्य करणाऱ्यांकडे लाखो व कोटी रुपयांच्या पॅकेजच्या नोकऱ्यांमुळे सुबत्ता आहे. जमिनीला प्रचंड भाव आल्याने बांधकाम क्षेत्र, हॉटेल, पंचतारांकित हॉस्पिटल वगैरे विकसित झाल्याने एका वर्गाकडे गडगंज पैसा आल्याने या नवश्रीमंतांना मस्ती आली.

पोलिस, महापालिका, आरटीओ अशा सर्वच व्यवस्था विकत घेता येतात, व्यवस्थेमधील प्रत्येक माणसाची बोली लावता येते, असा अहंगंड या वर्गात आहे. अर्थात कायदा, नियम यांचे पालन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेही पुणे, ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथील क्रीम पोस्टिंगकरता मोठ्या रकमा राज्यकर्त्यांना मोजतात आणि मग बदली होईपर्यंत सामान्यांना चिरडणारे ‘बकरे’ तावडीत सापडले की कमाईची संधी सोडत नाहीत. पैसे देऊन क्रीम पोस्टिंग व क्रीम पोस्टिंगवर कमाई करून पुन्हा नवे क्रीम पोस्टिंग असे हे दुष्टचक्र आहे. नेमके तेच नवश्रीमंतांच्या पथ्यावर पडते. पुण्यात ११ वर्षांपूर्वी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्याचा निकाल आता लागला. शनिवारी मरण पावलेल्या त्या दोनजणांना न्याय मिळायला कदाचित असेच १० ते १५ वर्षे लागतील. तोपर्यंत अनेक चिरडले जातील. भारतात मरण स्वस्त आहे आणि जगणे महाग आहे..
    sandeep.pradhan@lokmat.com
 

Web Title: Pubs, Porsches and drunken nouveau riche fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.