पुढे जाण्यासाठी मागे येण्याची शर्यत

By यदू जोशी | Published: October 13, 2023 10:57 AM2023-10-13T10:57:43+5:302023-10-13T10:58:48+5:30

सगळ्यांना पुढे जायचे आहे आणि त्यासाठी आधीचे डाग पुसायचे आहेत. कुछ दाग अच्छे होते है... पण राजकारणात कोणालाही कोणताच डाग नको आहे.

Race to come back to move forward | पुढे जाण्यासाठी मागे येण्याची शर्यत

पुढे जाण्यासाठी मागे येण्याची शर्यत

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत -

‘गडे मुर्दे उखाडना’ असा हिंदीत एक शब्दप्रयोग आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तेच चालले आहे. बंद खोलीत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा दिलेला शब्द, पहाटेच्या शपथविधीमागे नेमके कोण होते, बाळासाहेबांचा विचार मातोश्रीवर संपत असल्याने बंड केल्याचे समर्थन, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा शब्द चारवेळा दिला अन् ऐनवेळी तो कसा फिरवला, आता शरद पवारांसोबत असलेले जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडच भाजपसोबत चला म्हणत कसे होते ही त्याची काही उदाहरणे आहेत. 

आताच्या किंवा भविष्याच्या राजकारणावर फारसे कोणी बोलताना दिसत नाही. असे का होत आहे? कारण सगळ्यांना पुढे जायचे आहे आणि त्यासाठी आधीचे डाग पुसायचे आहेत. कुछ दाग अच्छे होते है... हे जाहिरातीत ठीक आहे; पण राजकारणात कोणालाही कोणताच डाग नको आहे. त्यामुळेच स्वत:ला शुद्ध करवून घेण्याची शर्यत लागली आहे. सगळ्यांनी सगळेच केले. ते काय लपून राहिले? उद्धव ठकरे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले, काँग्रेसने शिवसेनेला मिठी मारली. मैद्याचं पोतं म्हणून हिणवणाऱ्यांसोबत शरद पवार गेले, राजकीयदृष्ट्या तोवर अस्पृश्य असलेल्या अजित पवारांबरोबर फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी केला. निष्ठेला पाठ दाखवत एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या फौजेवर गोमूत्र शिंपडून भाजपने त्यांना पवित्र करवून घेतले. 

कालपर्यंत बाळगलेल्या विचारांना तिलांजली देणारे निर्णय सगळ्याच प्रमुख पक्षांनी घेतले; त्यातून तत्कालिक फायदेही झाले; पण आता जनतेच्या न्यायालयात जायचे असल्याने त्या निर्णयांमागे असलेल्या सत्तातूर अशुद्ध हेतूंना शुद्धतेचा मुलामा लावण्याचे काम जोरात चालले आहे. त्यासाठीच एकमेकांना कटघऱ्यात उभे करणे सुरू आहे. दोन चुकीच्या गोष्टी बरोबर एक योग्य गोष्ट असे होत नसते. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने बैल मारण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही; पण महाराष्ट्रात सध्या तेच होत आहे. मित्रांमध्येच परस्परांबद्दलचा अविश्वास हादेखील कळीचा मुद्दा आहे. 
शरद पवार इंडिया आघाडीसोबत राहतील की नाही, अशी साशंकता विशेषत: काँग्रेसच्या नेत्यांना आहे. या आघाडीसोबत राहून शरद पवार काही आमदार, खासदार निवडून आणतील, अजित पवार भाजपसोबत राहून काही आमदार, खासदार जिंकवतील आणि मग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या साक्षीने काका- पुतण्यांचे मनोमिलन तर होणार नाही ना, अशी शंका अधूनमधून घेतली जाते. अदानींशी अधेमधे होणाऱ्या भेटींमुळे मग ही शंका अधिक गडद होत जाते. परतीचे दोर कापले गेले आहेत, असे जयंत पाटील म्हणतात. दुसरीकडे भाजपसोबत चला म्हणून सह्या करणाऱ्यांमध्ये जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडही होते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल करतात. एकनाथ शिंदे बाहेर पडले ते परतीचे दोर कापून आणि ते त्यांच्या प्रत्येक कृतीतही दिसले. राष्ट्रवादीत तसे नाही. तुझे माझे पटेना अन् तुझ्यावाचून करमेना, असे सुरू असते. 

लोकसभेला धक्के बसतील
भाजपने मध्य प्रदेशात विधानसभेची उमेदवारी देताना अनेक धक्के दिले. केंद्रीय मंत्री, खासदारांना मैदानात उतरविले. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असेच धक्के दिले जातील. राज्याच्या राजकारणातील आठ-दहा नेत्यांना दिल्लीचे तिकीट दिले जाईल. त्यात अत्यंत आश्चर्यकारक नावे असू शकतात. विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. राहुल नार्वेकर, डॉ. संजय कुटे, रवींद्र चव्हाण, महेश लांडगे यांची नावे त्या दृष्टीने चर्चेत आहेत. काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले जाऊ शकते. कसेही करून लोकसभा जिंकणे यालाच प्रमुख पक्षांचे सर्वोच्च प्राधान्य असेल आणि राज्यातील नेत्यांसमोर दिल्लीचे ऐकल्याशिवाय पर्याय नसेल.
काँग्रेसमधील हाणामाऱ्या
काँग्रेससाठी वातावरण गेल्यावेळपेक्षा चांगले आहे; पण काँग्रेसवाले सुधारत नाहीत. नागपुरात एकमेकांना भिडले. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्या समक्ष हे घडले. एकमेकांचे कपडे फाडण्याची नागपूर काँग्रेसला जुनी परंपरा आहे. तिडके- तिरपुडेंपासून तेच चालले 
आहे. 

संघवाले नागपुरात भाजपला आणता आणता थकले; काँग्रेसने संघाची इच्छा पूर्ण केली. एकत्र राहिले असते तर शुक्रवारी तलाव, अंबाझरी तलाव, सक्करदरा तलावात कमळ फुलले नसते. पक्षातले बरेच नेते काँग्रेसपेक्षा मोठे झाले अन् काँग्रेस लहान होत गेली. ही एकट्या नागपूरचीच व्यथा नाही. 
मुंबई काँग्रेसमध्येही उद्या हीच वेळ येऊ शकते. तिथे पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरू आहे. राज्यातील बड्या काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वयाचा आजही अभाव आहे. धानपट्ट्यातल्या पटोलेंचे बाजूच्या संत्रा पट्ट्यात चालत नाही तर दूरच्या ऊस पट्ट्यात काय चालेल? 

जाता जाता : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली ४० दिवसांची मुदत दोन दिवसांवर आली आहे. पाठोपाठ धनगर समाजाने दिलेली डेडलाइनही संपत आली आहे. ओबीसी आंदोलकही पुन्हा आक्रमक होऊ पाहत आहेत. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करताना शिंदे सरकारची पुन्हा कसोटी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात दोन वेळा मुंबईत येत आहेत. एकूणच वातावरण ढवळून निघेल, असे दिसते.

Web Title: Race to come back to move forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.