विशेष लेख: आघाडी सरकार आणि मतैक्याची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:36 AM2024-06-13T11:36:18+5:302024-06-13T11:37:13+5:30

NDA Alliance Government: चार जूनपासून चित्र बदलले आहे. मोदींनी दहा वर्षांच्या कार्यकाळात ‘मतैक्य’ हा शब्द कधी उच्चारला नव्हता; तो त्यांच्या भाषणात प्राधान्याने दिसतो आहे!

Special Article: Alliance Government and Testimony of Voters | विशेष लेख: आघाडी सरकार आणि मतैक्याची ग्वाही

विशेष लेख: आघाडी सरकार आणि मतैक्याची ग्वाही

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

निवडणुकीत भाजपला धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर टोकाची लवचीकता दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या टीकाकारांना पुन्हा एकदा चुकीचे ठरवले आहे. ‘मोदी सरकार’ ही घोषणा गाडून टाकायला त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही. वारंवार ते ‘एनडीएचे सरकार’ असे म्हणत राहिले. सरकार नव्या युगात प्रवेश करत आहे, असेही त्यांनी सांगून टाकले. अहंकारी, एककल्ली, सहकाऱ्यांना बरोबर  घेण्यास असमर्थ असणारे, असे आरोप करणाऱ्यांना ४ जूनपासून वेगळे चित्र दिसू लागले आहे. त्या दिवशी संध्याकाळी मोदींनी  भाजप कार्यकर्त्यांपुढे भाषण दिले. कार्यकर्ते ‘मोदी सरकार जिंदाबाद’च्या घोषणा देत होते. त्यांना मोदींनी पुन्हा पुन्हा सांगितले की हे सरकार एनडीएचे आहे. देशाचा कारभार मतैक्याने हाकला जाईल यावर ते वारंवार भर देताना दिसले. 
मोदी यांनी  त्यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात ‘ मतैक्य’ हा शब्द कधी उच्चारला नव्हता. परंतु बदललेले राजकीय वातावरण स्वीकारताना त्यांनी खूपच तयारी दाखवलेली दिसते. खरे तर, आघाडी सरकार चालविणे हे मोदी यांच्यासाठी मोठेच आव्हान असेल. आतापर्यंत मोदी हे एकल खेळाडू होते आणि नव्या परिस्थितीत एकदा का ते स्थिरावले की सरकार स्थापनेच्या काळात मित्रपक्षांविषयी जी आपुलकी ते दाखवत आहेत, ती कदाचित पातळ होत जाईल, असेही बोलले जाते आहेच. मित्रपक्षांना किरकोळ खाती दिली गेली हेही उचित झालेले नाही.

मोदी हे राव किंवा अटल नव्हेत
१९९१ ते १९९६ दरम्यान एकामागून एक संकटे येत असतानाही काँग्रेसच्या २४० खासदारांना घेऊन आघाडी सरकार चालवणारे पी. व्ही. नरसिंहराव आणि मोदी यांच्यात बराच फरक आहे.  लोकसभेत १९९९ साली केवळ एक मताने सरकार जाऊ देणारे अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी यांच्यातही पुष्कळ फरक आहे. मोदी हे अहोरात्र काम करणारे पंतप्रधान असून  अजिबात वेळ न दवडता धोरण बदलण्याची दैवी शक्ती आपल्याकडे आहे, असे त्यांचेच सांगणे असते. जमीन अधिग्रहण वटहुकूम मोदींनी दोनदा काढला होता. परंतु ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांनी तो मागे घेतला. त्यावेळी त्यांच्या  समर्थकांनाही आश्चर्य वाटले होते.  लोकांच्या मनात काय आहे हे ओळखून मोदींनी शेती सुधारणा विधेयकही मागे घेऊन पलटी मारली होती. त्यामुळे महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका जिंकेपर्यंत ते कोणताही संघर्षाचा मार्ग अवलंबणार नाहीत, अशीच शक्यता आहे.

योगींचे पुढे काय होणार?
लोकसभा निवडणुकीतल्या पीछेहाटीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना डच्चू मिळेल, असे मानणाऱ्यांची संख्या भाजपत कमी नाही. २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने या राज्यात ६२ जागा जिंकल्या होत्या आणि यावर्षी पक्षाला केवळ  ३० जागा मिळाल्या.  या मोठ्या पराभवाचे खापर योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडले जाऊ शकते. 
पराभवानंतर लखनौमध्ये योगी यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला दोन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हजर नव्हते. यावरून तुंबळ युद्धाला तोंड फुटणार असे भाकीत वर्तवले जात आहे. आक्रमक असे कमंडल राजकारण करणाऱ्या शिवाय ज्याला मंडलशी जोडता येऊ शकेल अशा नेत्याला योगी यांच्या जागी आणण्याची तयारी सुरू आहे, असे दबक्या आवाजात बोलले जाते. मात्र बदललेल्या परिस्थितीत उत्तर प्रदेशातून योगी यांना बाजूला केले तर हिंदुत्वाचा कार्यक्रम दुबळा होईल, हे  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चालेल का, असा प्रश्न आहे. योगी यांचे समर्थक सांगतात की लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पसंतीच्या एकाही उमेदवाराला तिकीट दिले गेले नाही. सर्व तिकिटे दिल्लीच्या श्रेष्ठींनी वाटली. योगींचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे सुनील बसवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आले. योगी यांनी पक्षश्रेष्ठींची प्रत्येक सूचना पाळली. धोरण आखताना कुठेही आपले डोके चालवले नाही. आखून दिलेल्या पद्धतीने प्रचारही केला. त्यामुळे त्यांना बळीचा बकरा करू, नये असेही म्हटले जाते.

जाता जाता
जाहीर सभेत वाकून मोदींच्या पाया पडून नितीश कुमार यांनी एक राजकीय खळबळ माजवली खरी ! नितीश हे तसे कणखर बाण्याचे नेते; त्यांच्याकडून असे प्रथमच घडले.  त्यांना विस्मरणाच्या आजाराचा त्रास होतो यात शंका नाही. पण तरी मोदींना असा नमस्कार? - राजधानी दिल्लीत चर्चा आहे की, मोदींनी  त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार करण्याची व्यवस्था केली आहे. मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असताना ते लंडनला जाऊन आले... आणि पुन्हा जाणार आहेत म्हणतात!

Web Title: Special Article: Alliance Government and Testimony of Voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.