विशेष लेख: संबंध विकोपाला गेले असताना संघ आणि मोदी यांचे 'मेतकूट' कुणी जमवले?; 'इनसाइड स्टोरी' समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:08 IST2025-04-10T09:07:46+5:302025-04-10T09:08:41+5:30
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंध विकोपाला गेले असताना सारे पुन्हा जुळवून आणण्यात अरुण कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

विशेष लेख: संबंध विकोपाला गेले असताना संघ आणि मोदी यांचे 'मेतकूट' कुणी जमवले?; 'इनसाइड स्टोरी' समोर
हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली |
अरुण कुमार यांचे नाव तुम्ही ऐकले आहे का? पूर्व दिल्लीतील झिलमिल कॉलनीत जन्माला आलेले अरुण कुमार वयाच्या १८ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक झाले. २०२१ मध्ये संघ आणि भाजप यांच्यातील पूल होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास झाला. त्यांचे पूर्वसुरी कृष्णगोपाल यांच्या काळात संघाची आपल्या राजकीय शाखेवरील पकड ढिली होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे कृष्णगोपाल यांच्या भूमिकेत पाऊल ठेवणे अरुण कुमार यांच्यासाठी मोठे आव्हान होते. दरम्यानच्या काळात भाजप आपले घोडे अधिक ठामपणे पुढे दामटू लागला होता. उभय पक्षांतील संवाद जवळपास संपुष्टात आला होता. 'भाजप पक्षसंघटना म्हणून आता समर्थ झाला असून, राजकीय पाठिंब्यासाठी पितृसंस्थेची गरज त्याला उरलेली नाही,' असे पक्षाचे अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी म्हटले, तेव्हापासून उभय बाजूंतील संबंध आणखी घसरले.
संघाने इशारा देऊन पाहिला; परंतु भाजप आपल्या मार्गाने सुसाट निघाला होता. 'अब की बार ४०० पार' अशी घोषणा पक्षाने दिली. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्ष २४० जागांपर्यंत येऊन थांबला. संयमाची कसोटी पाहणारा हा खेळ होता. मात्र, उभय बाजूंतील संबंध विकोपाला गेले असताना दोघांचे मेतकूट जमवण्यात अरुण कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संघ पुन्हा सक्रिय झाला आणि हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुकांत भाजपने इतिहास घडविला. मोदी थोडे आणखी पुढे गेले. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात त्यांनी संघावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. नंतर लेक्स फ्रीडमन यांच्याशी पॉडकास्टवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, 'संघामुळे आपल्याला जीवनाचा हेतू सापडला.' त्यानंतर त्यांनी पंतप्रधान या नात्याने नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयाला भेटही दिली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर प्रशंसेचा वर्षाव करायलाही ते विसरले नाहीत.
संघ प्रचारक म्हणून अरुण कुमार यांनी काम केलेले असल्याने त्यांना मोदींशी व्यक्तिगत संबंध विकसित करता आले. अरुण कुमार यांची आणखी एक विशेषता म्हणजे ते काश्मीर विषयातील तज्ज्ञ आहेत. जम्मू काश्मीरविषयी धोरण आखणी तसेच ३७० वे कलम रद्द करण्यात अरुण कुमार यांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही कळते. आता भारतीय जनता पक्षाचा नवा अध्यक्ष शोधण्याची आव्हानात्मक कामगिरी अरुण कुमार यांच्यावर आहे. हा विषय बराच रखडला असून, संघ व मोदी अशा दोघांचाही विश्वास असणारा माणूस त्यासाठी हवा आहे.
नड्डा पडते का घेत आहेत?
केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील भाजपचे संसदीय पक्षनेते जयप्रकाश नड्डा यांना गेल्या जानेवारीपासून पक्षाचे अध्यक्ष म्हणून बेमुदत पुढे चाल देण्यात आली असली, तरी अध्यक्ष म्हणून सक्रिय राहण्याऐवजी नड्डा काहीसे मागे राहत आहेत. त्यांच्या जागी नवा अध्यक्ष नेमला गेला नसल्याने अत्यावश्यक कामे वगळता पक्षाच्या अन्य कामातून त्यांनी अंग काढून घेतले आहे. नेमक्या याच कारणाने गृहमंत्री अमित शाह देशभर फिरून पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. मोदी नागपूरला जाण्याच्या आधी अमित शाह 'केशव कुंज' या संघाच्या दिल्लीतील नव्या मुख्यालयात जाऊन आले. संघटनेच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी बोलणी केली. संसद असो वा पक्ष, ते किल्ला सांभाळतात. मोदी यांच्यानंतर त्यांचाच हुकूम चालतो. राज्यातील पक्षसंघटनेच्या निवडणुकांची
प्रक्रिया अद्याप बाकी असल्याने नव्या पक्षाध्यक्षांची निवड आणखी लांबू शकते. शिवाय ही प्रक्रिया पूर्ण करण्याची कोणतीच घाई दिसत नाही.
दीदींशी सामना कोण करणार?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याशी सामना करण्यासाठी भाजप प्रभावी महिला नेत्याच्या शोधात आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ७७ जागा जिंकल्या होत्या. आता ही संख्या ६५ पर्यंत घसरली आहे. वर्ष २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवायचीच आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या महिन्यात पश्चिम बंगालचा १० दिवसांचा प्रदीर्घ दौरा केला. आक्रमक हिंदुत्व हे या निवडणुकीत 'प्ले कार्ड' असू शकेल असे संकेत त्यातून मिळतात. चालू वर्षात संघाच्या शाखांची संख्या ६ हजारांवरून १२ हजारांवर नेण्याची घोषणा यांनी केली. भाजपला आजवर न जमलेले पश्चिम बंगालमध्ये भगवा फडकविण्याचे उद्दिष्ट शाखा विस्तारामागे असू शकते.
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच शिक्षक घोटाळ्याप्रकरणी दिलेल्या निकालामुळे ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. परंतु अजूनही त्यांची प्रतिमा शाबूत आहे; कारण अद्यापपावेतो त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप झालेले नाहीत. येत्या निवडणुकीत भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा सामना पाहायला मिळू शकतो. कारण काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला तिसरी आघाडी म्हणून अद्याप जम बसवता आलेला नाही.