विशेष लेख: लागो न 'दृष्ट' माझी, माझ्याच वैभवाला !...

By यदू जोशी | Published: June 16, 2023 09:08 AM2023-06-16T09:08:40+5:302023-06-16T09:10:29+5:30

'जाहिराती'ने हात पोळलेल्यांना 'दुर्घटना से देर भली' असे आता वाटत असेल.

Special Article on CM Eknath Shinde Dy Cm Devendra Fadnavis Maharashtra Government and internal politics | विशेष लेख: लागो न 'दृष्ट' माझी, माझ्याच वैभवाला !...

विशेष लेख: लागो न 'दृष्ट' माझी, माझ्याच वैभवाला !...

googlenewsNext

-यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

“लागो न दृष्ट माझी, माझ्याच वैभवाला.” अशी एका प्रसिद्ध भावगीताची ओळ आहे. भाजप-शिवसेना युतीच्या बाळाला (एक वर्षाचे असल्याने) अशीच दृष्ट जाहिरातीच्या निमित्ताने लागली. बाळाला दृष्ट लागली तर काळी तीट लावतात, पण दृष्ट बाळानेच लावली असेल तर काय करायचे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इमेज बिल्डिंगची इतकी घाई का? असे गेल्याच आठवड्यात लिहिले होते, त्याची प्रचिती लगेच आली. 'अति घाई अपघाताकडे नेई', 'नजर हटी दुर्घटना घटी' असे बोर्ड हायवेवर असतात. ही वाक्ये गाडी चालवतानाच नाही तर घर, सरकार, व्यवहार चालवतानाही उपयोगी पडू शकतात. जाहिरातीच्या निमित्ताने ज्यांचे हात पोळले त्यांना या गोष्टीचे प्रत्यंतर नक्कीच आले असेल. 'दुर्घटना से देर भली' असे आता वाटत असेल. 

एक मात्र खरे! आम्ही भाजपचे पपेट नाही असा इशारा या निमित्ताने शिवसेनेकडून दिला गेला. त्यासाठी भाजपची नाराजी ओढवून घेण्याची जोखीम घेतली गेली. असले प्रकार पुन्हा खपवून घेणार नाही हे फडणवीस यांनी दोन दिवस काही न बोलता दाखवून दिले. जाहिरातीमुळे शिवसेनेचे फक्त नुकसान झाले हा तर्क योग्य नाही. कारण आपल्या अस्तित्वाची जाणीव यानिमित्ताने शिवसेनेने भाजपला करून दिली. आम्हाला गृहीत धरू नका हा संदेश त्यामागे असावा. 

युतीच्या गाडीने लय पकडली असे वाटत असतानाच ती थोडीशी बिघडली. यापुढेही ती बिघडत राहाल अशा आशेवर बरेच लोक असतील. तसे फारसे होणार नाही. मात्र झाला, त्या अपघाताने न दिसणाऱ्या बऱ्याच जखमा केल्या. आपल्या माणसांकडून झालेली जखम खोल, ती बरी व्हायलाही वेळ लागतो.

दोन्ही पक्षांमध्ये समन्वय समिती नसल्याने अनेक अडचणी येतात. आता समिती स्थापन करणार असे शंभूराज देसाई म्हणाले, पण भाजप त्यासाठी कितपत सहकार्य करेल हा प्रश्न आहे.

या जाहिरातीच्या निमित्ताने बाजारात फिरत असलेल्या अफवांमधली एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्यासाठी या जाहिरातीला दिल्लीहून अनुमती देण्यात आली. फडणवीस यांची राजकारणातील उंची कमी व्हावी यासाठी टपून बसलेल्यांची ही थिअरी! भाजपसोबत येऊन सरकार बनविणाऱ्या नेत्याला (एकनाथ शिंदे) मोठे करण्यासाठी ज्याच्यामुळे सरकार आले त्या आपल्या नेत्याला (देवेंद्र फडणवीस) अशा पद्धतीने भाजपश्रेष्ठी दाबतील ही शक्यता नाही.

ज्या कोण्या हितचिंतकाने ही जाहिरात दिली त्याला भाजप इतका दुखावेल याची पूर्वकल्पना नसावी आणि पूर्वकल्पना असेलच तर मग एकदा पाहूच भाजपला डिवचून, काय फरक पडणार आहे? अशी कॅम्क्युलेटेड रिस्क घेण्याचा विचार झाला असावा. मुख्यमंत्री शिंदे साधेबाधे व्यक्ती आहेत, छक्केपंजे खेळत नाहीत. गडबड सल्लागार करतात. मोदी-शाह-फडणवीस यांनी साथ दिल्यानेच बंड यशस्वी झाले, मुख्यमंत्रीपद मिळाले याची जाणीव ठेवूनच मुख्यमंत्री वागतात- बोलतात. भाजप, फडणवीस यांना दुखावत नाहीत.

पहिल्या जाहिरातीने सगळ्यांनाच धक्का बसला. कारण भाजप, फडणवीस यांच्याविषयी शिंदे यांच्या अप्रोचला छेद देणारी ती जाहिरात होती. भविष्यात त्याची पुनरावृत्ती झाली तर दोन पक्षांमध्ये अंतर पडेल व वाढेलदेखील.

२०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना सत्तेत सहभागी होती, पण दररोज खटके उडायचे. मोदी-शाह-फडणवीस यांच्यावर मुखपत्रातून भरपूर तोंडसुख घेतले जायचे. मात्र, शिंदे- फडणवीस यांचे ट्युनिंग चांगले आहे. आधीपेक्षा युती अधिक सुखाने नांदत आहे. असे असताना या वादंगाने युतीच्या एकीला नख लावले खरे. सरकारने केलेल्या चांगल्या कामांवर अशा प्रसंगांनीर पाणी फिरते. दोन्हीकडच्या कार्यकर्त्याना ते नको आहे. कल्याण- डोंबिवलीतील गल्लीतला वाद राज्यभरात नेण्याची गरज नव्हती. दोन्ही बाजूंनी त्याचे भान ठेवले नाही. सरकार आल्याने २० जणांच्या मंत्रिपदाची सोय झाली. अजून कोणालाही जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका मिळालेली नाही. ती द्यायची असेल तर जाहिरात हा अपघातच होता अन् त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी द्यावी लागेल. दोन्हीकडच्या बोंडे-गायकवाडांच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी लागेल. कान दुखला त्याची कथा

जाहिरात नाट्यानंतर फडणवीसांची कानदुखी बळावली. त्यांना सायनसचा त्रास आहेच, तो कानापर्यंत गेला. कानामागून येऊन कोणी तिखट होत असल्याची ती प्रतिक्रिया तर नव्हती? ते दोन दिवस घरी बसले तर सरकार घरी बसल्यासारखे वाटले. बरीच पळापळ झाली. मनधरणीही झाली. जाहिरात-२ च्या माध्यमातून भरपाईचा आटोकाट प्रयत्न झाला. भरपूर फोनाफोनी झाली. दिल्लीहून समज दिली गेली. मग पालघरच्या सभेसाठी शिंदे-फडणवीस एकाच हेलिकॉप्टरने गेले. जिथे डॉक्टरांनी विमान प्रवासाला मनाई केली होती तिथे खडखड आवाजाचा हेलिकॉप्टर प्रवासही सुखावह झाला. सभेमध्ये दोघांनी एकमेकांच्या कौतुकाची इमारत बांधली. जय-वीरू, धरम-वीर, फेविकॉल का जोड़ असे शिंदे बोलले. एका जाहिरातीने काही फरक पडत नाही, आमची मैत्री २५ वर्षे जुनी अन् घट्ट आहे, आमची चिंता करण्याची कोणाला गरज नाही, या शब्दात फडणवीसांनी दिस गोड केला.

जाता जाता: शिंदे समर्थक पाच मंत्री घरी जाणार अशा बातम्या मध्ये खूप चालल्या. मग खुलासाही आला. विस्तारात पाच नाही, पण शिंदेंकडचे एक-दोन जण तरी घरी बसतील. भाजपच्या एक-दोन मंत्र्यांवरही ती पाळी येऊ शकते. दिल्लीचे सीसीटीव्ही कॅमेरे खतरनाक आहेत रे बाबा!

Web Title: Special Article on CM Eknath Shinde Dy Cm Devendra Fadnavis Maharashtra Government and internal politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.