...आता कुणीही भारताला थांबवू शकत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 07:48 AM2024-09-27T07:48:00+5:302024-09-27T07:48:30+5:30

‘मेक इन इंडिया’ची दशकपूर्ती हा भारताच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा आहे. सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे चैतन्य देशात निर्माण झाले आहे!

Special article on the occasion of 10 years of Make in India initiative | ...आता कुणीही भारताला थांबवू शकत नाही!

...आता कुणीही भारताला थांबवू शकत नाही!

नरेंद्र मोदी
पंतप्रधान

मेक इन इंडिया’ उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली. या उपक्रमाला घवघवीत यश मिळवून देणाऱ्या प्रत्येकाला सलाम करण्याचा हा प्रसंग आहे. हे अथक परिश्रमाचे  सामूहिक अभियान आहे, ज्याने एका स्वप्नाचे एका शक्तिशाली चळवळीत रूपांतर केले आहे.

मेक इन इंडिया’च्या प्रभावातून हेच सिद्ध होते की, आता भारताला कुणीही थांबवू शकत नाही. भारत केवळ आयातदार नाही, तर निर्यातदारदेखील आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन क्षेत्रात भारताच्या प्रगतीला चालना देणे  या एका महत्त्वाकांक्षी उद्देशाने दहा वर्षांपूर्वी  हा प्रयत्न सुरू झाला. एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामर्थ्य आणि कौशल्याने  आपल्याला दूरचा पल्ला गाठून दिला  आहे. ‘मेक इन इंडिया’चा ठसा सर्व क्षेत्रांमध्ये दिसू लागला आहे. मी एक-दोन उदाहरणे देतो..

मोबाइल निर्मिती. २०१४ मध्ये संपूर्ण देशात मोबाइल निर्मिती करणारे केवळ दोन कारखाने होते. आज हा आकडा २०० हून अधिक झाला आहे. आपली  मोबाइल निर्यात अवघ्या  १,५५६ कोटींवरून तब्बल १.२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही वाढ ७५००% इतकी अवाढव्य आहे! आज भारतात वापरले जाणारे ९९% मोबाइल फोन ‘मेड इन इंडिया’ आहेत. जागतिक स्तरावर आपण दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे मोबाइल उत्पादक बनलो आहोत. त्याचबरोबर भारत पूर्णतः प्रक्रिया केलेल्या पोलादाचा निर्यातदार बनला आहे. २०१४ पासून उत्पादनात ५०% पेक्षा जास्तीची वाढ झाली आहे. सेमी कंडक्टर उत्पादन क्षेत्राने १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित केली असून, दररोज एकत्रितपणे ७ कोटी चिप्सचे उत्पादन घेण्याची क्षमता असलेल्या पाच प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीत आपण जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे उत्पादक ठरलो आहोत. एका दशकात आपली क्षमता ४०० टक्क्यांनी वाढली आहे. आपले इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्र, जे खरे तर २०१४ मध्ये अस्तित्वातच नव्हते, ते आता ३ अब्ज डॉलर्स मूल्याचे झाले आहे. संरक्षण उत्पादनांची निर्यातही १,००० कोटी रुपयांवरून वाढून २१,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे आणि आपण ८५ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करू लागलो आहोत.

खेळणी उद्योग क्षेत्राची गरज मी उपस्थित करताच, ही बाब प्रत्यक्षात कशी साकारावी हे भारतीय नागरिकांनीच सरकारला दाखवून दिले! गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातली आपली निर्यात २३९ टक्क्यांनी वाढली असल्याचे आणि त्याच वेळी आयातीत निम्म्याने घट झाली. यामुळे खेळणी उद्योगातल्या स्थानिक उत्पादकांना आणि विक्रेत्यांना लाभ झाला आहे, लहान मुलांना तर निश्चितच झाला आहे! 

आपल्या देशाची ओळख बनलेल्या अनेक बाबींपैकी असलेल्या मुख्य बाबी म्हणजे आपली ‘वंदे भारत’ रेल्वेगाडी, ब्राम्होस क्षेपणास्त्रे आणि आपल्या हातात असलेले मोबाइल फोन. या सगळ्यांवर आता अभिमानाचा ‘मेक इन इंडिया’चा शिक्का लागला आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंतचे हे यश भारतीय कल्पकता आणि गुणवत्तेची साक्ष देणारेच आहे.

‘मेक इन इंडिया’ या उपक्रमामुळे  गरिबांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि आकांक्षा बाळगण्याचे बळ मिळाले आहे. या उपक्रमाने त्यांना ते  साधनसंपत्तीचे निर्माते बनू शकतात हा आत्मविश्वास दिला आहे. या उपक्रमाचा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रावर पडलेला प्रभावही तितकाच दखल घेण्याजोगा आहे. सरकार म्हणून आम्ही हे चैतन्य अधिक ऊर्जस्वल करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमची दशकभरातील कामगिरी पुरेशी बोलकी आहे. उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन- पीएलआय योजना परिवर्तनक्षम ठरल्या आहेत. त्यांनी हजारो, करोडोंची गुंतवणूक शक्य केली असून लाखो नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. व्यवसाय करण्यात सुलभता आणण्याच्या बाबतीतही सरकारने लक्षणीय पावले टाकली आहेत.

भारताला अनुकूल असे बरेच काही आज घडते आहे- लोकशाही, लोकसंख्या आणि मागणी या तीन महत्त्वाच्या सूत्रांचे आपला देश हे परिपूर्ण मिश्रण आहे. जागतिक पुरवठा साखळीमध्ये कळीची भूमिका बजावण्यासाठी आवश्यक त्या सर्व कळीच्या गोष्टी आपल्याकडे आहेत.  व्यवसायातील विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. आपल्या अभूतपूर्व युवाशक्तीचे यश स्टार्टअप जगतात प्रत्येकाला पाहता येत आहे. एकूणच, गती भारताला अनुकूल आहे. जागतिक ‘महासाथी’सारखी अनपेक्षित आव्हाने येऊनही भारताच्या वाढीची वाटचाल सातत्यपूर्ण राहिली. आज, आमच्याकडे जागतिक वाढीचा प्रेरक म्हणून पाहिले जात आहे. 

मी माझ्या युवा मित्रांना पुढे येण्याचे, ‘मेक इन इंडिया’त सहभागी होऊन हा उपक्रम नव्या उंचीवर नेण्याचे आवाहन करतो. सर्वोत्कृष्टतेसाठी सर्वांनीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. दर्जेदार पुरवठ्यासाठी आपण वचनबद्ध राहिले पाहिजे. शून्य त्रुटी हा आपला मंत्र असला पाहिजे.
 

Web Title: Special article on the occasion of 10 years of Make in India initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.