विशेष लेख: 'रॉ'वर बंदी घालण्याचा कट, अमेरिकेच्या या आगळिकीचा अर्थ काय?
By विजय दर्डा | Updated: March 31, 2025 08:03 IST2025-03-31T08:02:40+5:302025-03-31T08:03:46+5:30
United State Policy: धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली 'रॉ'वर बंदी घालणे हे मोठे षड्यंत्र आहे! जग जर सीआयएची कुंडली उघडून बसले तर 'अंकल सॅम' आपण कुठे तोंड लपवणार?

विशेष लेख: 'रॉ'वर बंदी घालण्याचा कट, अमेरिकेच्या या आगळिकीचा अर्थ काय?
- डॉ. विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
अमेरिका मोठा देश असल्याने जगभरातल्या मोठमोठ्या चिंता करत बसतो, असे मला बऱ्याचदा वाटते. इकडे आम्ही विनाकारण चिंतेची चिंता करत फिरतो, म्हणून अशी म्हण तयार झाली की, 'चिंतेने चतुराई कमी होते आणि दुःखाने शरीर.' आपण अमेरिकेला कधी दुर्बल होताना पाहिले आहे? जेव्हा हा देश युद्ध लढत असतो, तेव्हाही त्याचा खजिना भरलेलाच असतो; कारण अमेरिकेच्या चिंता त्याच्या चतुराईमुळे उत्पन्न होतात. आता नव्या विषयाची चिंता करण्याची वेळ आली आहे, असे त्याची चतुराई त्याला सांगते आणि मग तो त्या नव्या विषयाची चिंता करू लागतो.
अमेरिकेची नवी चिंता आपली गुप्तचर संस्था 'रॉ' म्हणजेच रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग ही आहे. जगातील धार्मिक स्वातंत्र्याबद्दल अमेरिकेचा एक संघीय आयोग आहे. या आयोगाने 'जागतिक धार्मिक स्वातंत्र्य अहवाल २०२५' प्रसिद्ध केला असून, भारतात धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती सातत्याने खराब होत आहे, असे त्यात म्हटले आहे. धार्मिक अल्पसंख्याकांना विदेशी भूमीवर लक्ष्य केले जाते. यासाठी 'रॉ'ला जबाबदार धरून निर्बंध लादण्याची शिफारस करण्यात आली आहे. फुटीरतावादी खलिस्तानी नेता गुरूपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या असफल कटाचा दाखलाही अहवालाने दिला आहे.
या विषयाशी आमचे काही देणेघेणे नाही, असे भारत वारंवार सांगत आला. परंतु, अमेरिकेच्या गळी ही गोष्ट कोण उतरवणार?, त्या देशाला हे कोण सांगणार की, बाबा रे, तुमच्याकडे काय आहे?, काळे आणि गोरे यांच्यात किती भेदभाव आहे?, कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यामध्ये किती दरी आहे? आपल्या जखमा तर तुम्हाला दिसत नाहीत आणि ज्यातून वैमनस्य पसरवले जाईल, असे दुसऱ्याच्या घरात डोकावण्याचे उद्योग करत राहता. अमेरिकेच्या या खोडसाळपणाकडे पाहून मला पद्मभूषण रघुपती सहाय तथा फिराक गोरखपुरी यांची कविता 'डॉलरदेश'च्या काही ओळी आठवतात.
दुनियाभर को बरबाद करे,
दुनियाभर का निर्माता भी।
दुनियाभर का विद्रोही भी,
दुनियाभर का निज भ्राता भी।
दुनियाभर को भूखा मारे,
दुनियाभर का अन्नदाता भी।
दुनियाभर में खैरात करे,
दुनियाभर पर ललचाता भी।
दुनियाभर का व्यापार मिटाकर,
खुद व्यापारी बन बैठा।
सच्ची झूठी मूरत गढ़कर,
दुनिया का पुजारी बन बैठा।
फिराक साहेबांइतक्या कठोर शब्दांचा उपयोग तर मी करणार नाही; परंतु भारतीय समाजाचे विघटन होऊन त्या देशाची लोकशाही आणि अर्थव्यवस्था पुढे जाऊ नये हा एकमेव उद्देश ठेवून भारताला बदनाम करण्याचे हे प्रयत्न चालवले आहेत, यात तर काहीच शंका नाही. कधी अदानी तर कधी अंबानी यांच्याविषयी वाद उपस्थित करण्यामागे काय इंगित आहे?
एकेकाळी जगाच्या जीडीपीच्या २५ टक्के हिस्सा उचलणाऱ्या भारताला लुटून इंग्रजांनी कंगाल केले; परंतु आपण आपल्या क्षमतेवर पुन्हा उभे राहिलो आणि आज पुन्हा पाचव्या क्रमांकावरची आर्थिक व्यवस्था झालो. आगामी काळात तिसऱ्या क्रमांकावरही जाऊ. कदाचित ही गोष्ट अमेरिकेच्या पचनी पडत नसावी आणि इतरांच्याही. विदेशी शक्तीने आपल्या देशात किती दंगली घडवल्या, आपल्याला त्या कशा विसरता येतील? आणि आजही तशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. अमेरिकेने आपल्या छातीवर हात ठेवून सांगावे की पाकिस्तानला त्याने इतकी वर्षे जी आर्थिक मदत केली, त्याच पैशांनी काश्मीरमध्ये पाकिस्तान दहशतवाद पसरवत नव्हता..
कधी ट्रम्प यांची भेट झाली, तर त्यांना मी नक्की हे विचारू इच्छितो की मि. प्रेसिडेंट, अमेरिका तर मानवाधिकाराचा झेंडा घेऊन फिरतो, मग आमच्या लोकांना हातकड्या घालून का पाठवले? आमचे महान वैज्ञानिक आणि पुढे राष्ट्रपती झालेले एपीजे अब्दुल कलाम यांच्यापासून वाणिज्यमंत्री कमलनाथ, अभिनेता शाहरूख खान यांना अंगावरचे कपडे काढायला का भाग पाडले गेले? आपण काय सिद्ध करू इच्छिता? आपण बॉस, जगाचे 'चौधरी' आहोत हेच ना? परंतु संस्कृती सांगते सांगते, ज्या झाडावर जास्त फळे लागतात ते झाड वाकते. आपण बलवान आहात, तर आपली ही जबाबदारी असली पाहिजे की कमजोर असेल त्याच्याशी आपण सहकार्य कराल. आपला अनुभव त्याला उपलब्ध करून द्याल, जेणेकरून तो आपल्या पायावर उभा राहू शकेल.
आम्ही शांतता आणि अहिंसेच्या मार्गावर चालत असल्याने आमच्याकडे बोट दाखवणे आम्हाला अजिबात मंजूर नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ज्या प्रकारे 'रॉ'ला बळकटी दिली, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही कोणावरही हल्ला केला नाही. ना धार्मिक ना सांस्कृतिक, याला आमची हजारो वर्षाची संस्कृती साक्ष आहे. नद्यांपासून झाडे, वनस्पती आणि प्राण्यांपर्यंत सर्वांची पूजा करणारा आमचा देश आहे. वसुधैव कुटुंबकम हा आमच्या जीवनाचा मूळ मंत्र आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की, कोणी आमच्यावर डोळे वटारावेत किंवा आम्हाला टपली मारून पळून जावे. हा नव्या युगाचा भारत आहे महाराज!
मात्र, मला शंका आहे की, या कारवाया म्हणजे ट्रम्प यांच्याविरुद्धचा कट आहे का? आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात इतके सौहार्दपूर्ण संबंध आहेत की, ट्रम्प असे काही करू शकत नाहीत. असे होऊ शकते की, ट्रम्प यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती (अमेरिकेत अशा संस्थांची कमतरता नाही) अशा समस्यांना खतपाणी घालत आहेत. पण खरे म्हटले, तर यामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. हा नव्या युगाचा भारत आहे.