विशेष लेख : सिनेमात काय ठेवलंय विचार करण्यासारखं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 11:11 AM2023-09-16T11:11:06+5:302023-09-16T11:11:06+5:30

Cinema: सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचणारं, प्रचंड प्रभाव टाकणारं माध्यम म्हणजे चित्रपट! मराठी बुद्धिजीवींनी त्याकडे सपशेल पाठ का फिरवली असावी?

Special article: What is there in the cinema to think about? | विशेष लेख : सिनेमात काय ठेवलंय विचार करण्यासारखं?

विशेष लेख : सिनेमात काय ठेवलंय विचार करण्यासारखं?

googlenewsNext

- अपर्णा पाडगावकर
(निर्माती, दशमी क्रिएशन्स)
कोरोनानंतरच्या काळात ज्यांचे मुदतपूर्व मृत्युलेख लिहिले गेले, त्यात अग्रस्थानी होती सिनेमा थिएटर्स! ही सारी भाकितं खोटी ठरवणारे ‘जेलर, गदर २, जवान’सारखे सिनेमे धो-धो गर्दी खेचत असताना, एक गोष्ट हल्ली आवर्जून खटकत राहते, ती म्हणजे मराठी बुद्धिवादी वर्तुळात चित्रपट या माध्यमाबद्दल एकूणच असलेली घनघोर अनास्था! मराठी चित्रपट तर दुर्लक्षितच, पण जगभरच्या चर्चेचा विषय ठरलेल्या अन्य चित्रपटांबद्दल समाजमाध्यमांवर ज्या चर्चा सुरू असतात, त्यात मराठी चित्ररसिकांची अनुपस्थिती खुपण्याजोगी असते. साहित्य संमेलन, साहित्य-पुरस्कार, राजकारण, समाज-चळवळी याबाबत आपण तावातावाने बोलत असतो. पण मराठी बौद्धिक वर्गात चित्रपट - टीव्ही या करमणुकीच्या माध्यमांबद्दलची अनास्था जागोजागी स्पष्ट दिसून येते. छापील पुस्तकांचा गवगवा होतो. पण चित्रपटांबद्दल साधी चर्चाही होत नाही. हे माध्यम सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचणारे आणि त्यांच्यावर प्रचंड प्रभाव टाकणारे आहे. मात्र, मराठी बुद्धिजीवींनी त्याकडे सपशेल पाठ फिरवली आहे.

ज्या भाषेला अभिजात दर्जा मिळावा, म्हणून गेल्या दहा वर्षांपासून अनेक दिग्गजांनी प्रयत्न चालविले आहेत. चित्रपट (व अन्य करमणुकीची साधनं) हा त्या अभिजाततेचाच एक हिस्सा आहे, हे विसरून कसं चालेल? भाषा अभिजात असण्यासाठी ती केवळ जुनी असून पुरणार नाही. ती आजही संवादमाध्यम असली पाहिजे. यात राजकीय-सामाजिक-औद्यौगिकतेबरोबरच सांस्कृतिक अस्मितेचा संवाद अभिप्रेत आहे. आज कोणत्या सांस्कृतिक क्षेत्रात मराठी ठसा उमटलेला दिसतो? वैश्विक होण्याच्या नादात आपले सण आणि लग्न समारंभावरसुद्धा बंगाली-पंजाबी छाप उमटली आहे. आपण नेसतो ती सहावारी साडी मराठी साडी म्हणून नाही, तर बंगाली साडी म्हणून ओळखली जाते; आणि हा चित्रपटांचाच प्रभाव आहे. तो तसा का झाला? कारण समाजावर प्रभाव टाकू शकणाऱ्यांनी या प्रभावशाली माध्यमांकडे पाठ फिरवली. कुठल्याही महत्त्वाच्या चित्रपटाला बुद्धिवादी मराठी प्रेक्षक पहिल्या आठवड्यात जात तर नाहीतच, त्याबद्दल बोलतही नाहीत आणि मग केवळ गल्लाभरू सिनेमे चालतात, म्हणून गळा काढला जातो किंवा मराठी सिनेमाला एखादा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला की तेवढ्यापुरता उदोउदो होतो.

मराठी नाटक हे मराठीपणाचं एक अभिमानास्पद भूषण होतं. अखिल भारतीय व जागतिक रंगभूमीवर विजया मेहता, विजय तेंडुलकर ही नावं कौतुकाने घेतली जात. सिनेमाही उत्तमच चालला होता. शहरी की ग्रामीण, कलात्मक की विनोदी असा विवाद रंगलेला नव्हता. 
१९९१ पासून जागतिकीकरणाचे पडसाद भारतात उमटू लागले आणि त्याचा पहिला बळी ठरला मराठी चित्रपट! जागतिक स्पर्धेत मागे पडू नये, या भीतीने आपण देशी ते त्याज्ज्य ठरवत गेलो की काय, अशी शंका येते.

१९९१ या एकाच वर्षी ‘माहेरची साडी’ आणि ‘चौकट राजा’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले आणि मराठी चित्रपटांमध्ये खऱ्या अर्थाने फूट पडू लागली. ‘एक होता विदूषक, बनगरवाडी, वजीर, दोघी, मुक्ता, सरकारनामा’ असे कलात्मक चित्रपट या दशकात बनले. याचवेळी विनोदी चित्रपटांचं एक वेगळं युग सुरू झालं. सचिन - महेश - लक्ष्या यांच्या प्रारंभीच्या चित्रपटांना सार्वत्रिक यश मिळालंही. पण कालांतराने हा विनोद वेगळा पडला. बदलत्या व्यवस्थेत मराठी खिशात थोडे अधिकचे पैसे आले, मध्यमवर्गाची वाढ झाली. त्यांची सांस्कृतिक गरज ओळखण्याचं, त्याला दिशा देण्याचं काम मागच्या तीस वर्षांत मराठी बुद्धिजीवींनी केलं नाही, हेच खरं.

चित्रपट हे माध्यम सांस्कृतिक प्रचाराचं मोठं साधन आहे. सध्यातर सिनेमाचा वापर राजकीय मांडणीसाठीही केला जाऊ लागला आहे. निदान अशा वेळीतरी याबद्दल अधिक सजग होण्याची गरज आहे. आपण मात्र करमणुकीला त्याज्ज मानून ते क्षेत्र ‘घाला काय तो गोंधळ’ म्हणून सोडूनच दिलं. विचारांचं नैतिक पाठबळ नसेल तर थिल्लरपणा बोकाळणारच. लोकसहभाग नसेल तर आर्थिक बाबी नाजूकच राहणार. 

उत्तम आनंददायी अनुभव देऊ शकेल, असे चित्रपट का बनत नाहीत मराठीत ? एखाद्या कथासंग्रहाचं कौतुक होतं, कारण लिखिताला मूल्य आहे. तिच गोष्ट सिनेमाने सांगितली तर त्याकडे दुर्लक्ष आहे चक्क. चित्रपट पहा, त्याच्या गुणवत्तेबाबत चर्चा करा. दोष दाखवा, पण अनुल्लेखाने मारू नका!
दाक्षिणात्यांनी कला व करमणूक या दोन्हींचा उत्तम मेळ घातला कारण तिथल्या बुद्धिवाद्यांनी हे क्षेत्र वर्ज्य मानलं नाही. तिथे तर राजकीय बाजीही बहुधा चित्रपटाशी संबंधितांनी सांभाळलेली दिसते. म्हणून तिथे ‘असुरन, न्यूटन, काला, जय भीम’सारखे सकस चित्रपट तयार झाले आणि यशस्वीही, ज्यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. त्यात एक ठोस विचार होता आणि व्यावसायिक गणितंही जुळवलेली होती. ‘बाहुबली’ किंवा ‘आरआरआर’ या तद्दन व्यावसायिक चित्रपटांमधून जो अव्यक्त संदेश दिला गेला आहे, त्याची नोंद संवेदनशील व जागरूक मराठी समाजधुरिणांनी घेतली असेलच.

- ही परिस्थिती अन्य भाषकांमध्ये नाही. बंगालमध्येही सरसकट शालेय शिक्षण आता इंग्रजी माध्यमातच होतं, पण त्यांना शरदबाबू आणि रवींद्रसंगीत माहीत असतं. म्हणूनच व्यावसायिक हिंदी चित्रपटात सुसंस्कृत कलात्मक कुटुंब दाखवायचं असेल तर बंगालची निवड होते, महाराष्ट्राची नाही.
या क्षेत्राची गंभीर दखल मराठी बौद्धिकजन घेतील का? 
aparna@dashami.com

 

Web Title: Special article: What is there in the cinema to think about?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.