विशेष लेख: सर्वांना शरद पवारांच्या गाडीत का बसायचे आहे?

By यदू जोशी | Published: August 30, 2024 07:48 AM2024-08-30T07:48:05+5:302024-08-30T07:48:34+5:30

फडणवीस-अजित पवारांचे राजकारण छेदण्याचा थोरल्या पवारांचा प्रयत्न; पण शिंदेंना हात न लावणे ही राजाला सोडून प्रधानाला टिपण्याची खेळी आहे!

Special Article Why Everyone Wants to go with Sharad Pawars ncp | विशेष लेख: सर्वांना शरद पवारांच्या गाडीत का बसायचे आहे?

विशेष लेख: सर्वांना शरद पवारांच्या गाडीत का बसायचे आहे?

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत |

लोकसभेच्या दहाच जागा त्यांनी महाविकास आघाडीत स्वत:च्या पक्षासाठी घेतल्या आणि आठ निवडून आणल्या. सातारच्या पराभवाला पिपाणी कारणीभूत ठरली; नाहीतर नऊ आल्या असत्या.  स्वत:चा पुतण्या, इतर दमदार नेत्यांनी साथ सोडलेल्या शरद पवारांच्या पक्षाचा स्ट्राइक रेट इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त होता. विधानसभेसाठीही ते व्यवस्थित मांडणी करत आहेत. झोपलेली मुंगी आणि थकलेले पवार कोणी पाहिले आहेत का? भाजपशी तशी खूप जवळीक असलेले एक पत्रकार काही महिन्यांपूर्वी पवार साहेबांना भेटले, साहेबांना त्या पत्रकाराची वैचारिक भूमिका, जवळीक हे सगळेच माहिती होते. तरीही त्यांनी खूप आस्थेवाईकपणे  विचारपूस केली. आपण ज्यांच्या जवळचे आहोत ते तर आपल्याला कधीच असे आपलेपणाने विचारत नाहीत आणि साहेब किती आस्थेने बोलताहेत हे अनुभवून त्या पत्रकारास एकाच वेळी खंत वाटली अन्  सुखद धक्काही बसला. पवारांचे हे असे आहे; इतरांना पवार व्हायला वेळ लागेल. 

राजकारणाच्या अनुषंगाने असलेली जातीय समीकरणे, सांस्कृतिक वातावरण, सामाजिक संदर्भ यांचे बोट धरून राजकारण कसे करायचे हे त्यांना खूप चांगले जमते. गोपीनाथ मुंडेंना ते जमत असे. देवेंद्र फडणवीस यांनाही या सगळ्या बाबींचा उत्तम अभ्यास आहे; फक्त ते ‘फडणवीस’ आहेत हीच काय ती अडचण. मात्र, सामाजिकतेच्या पायरीवर उभे राहत पुढचे पाऊल राजकारणाच्या पायरीवर टाकत सत्ताकारणाच्या इमारतीत प्रवेश मिळविणे हा या तिघांमधला समान धागा! राजकीय हुशारीबाबत पवारांचा हात कोणी धरू शकत नाही, ते केव्हा काय करतील याचा नेम नसतो, म्हणूनच तर विरोधकांबरोबरच मित्रही त्यांच्याबाबत सावध असतात. 

महायुतीत अस्वस्थ असलेल्यांना शरद पवारांकडे जावेसे वाटते यामागे त्या-त्या मतदारसंघातील समीकरणे हे कारण तर आहेच शिवाय ८३ व्या वर्षीही पवार चमत्कार करू शकतात, हा विश्वास लोकांना वाटतो. काँग्रेसकडे जायला लोक बिचकतात. एका नेत्याच्या माध्यमातून गेलो तर दुसरा आपल्याला टार्गेट करेल, त्यापेक्षा न गेलेले बरे असे बहुतेकांना वाटते. अजित पवार यांच्याकडे सत्ता आहे, वय आहे, ७५ टक्के पक्षही ते घेऊन गेले तरीही काका आपली माणसे पळवून नेतील अशी भीती त्यांना वाटत असते. नीलेश लंके, बजरंग सोनवणे तिकडे गेले; खासदार झाले. आता राजेंद्र शिंगणे, अतुल बेनके त्याच वाटेवर आहेत, आणखी चार आमदार वाटेवर आहेत. मोठ्या पवारांच्या गाडीत बसण्यासाठी बरेचजण इच्छुक आहेत. अजित पवार यांना घेतल्यापासून भाजपचा कोअर कार्यकर्ता डिस्टर्ब असल्याचे अनेकदा बोलले गेले; पण भाजप जागावाटपाची चर्चा सुरू करत नसल्याने अजित पवार गटात प्रचंड नाराजी आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायला जितका विलंब होईल, तितके मोठ्या साहेबांकडे आपली माणसे जाण्याचे प्रमाण वाढेल, असे अजित पवार गटाला साहजिकच वाटते. पुतण्याच्या गोटातील ही अस्वस्थता काकांच्या पथ्यावर पडत आहे. 

शरद पवारांचे सध्याचे राजकारण बारकाईने बघा, ते फडणवीस-अजित पवार यांचे राजकारण छेदण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत; एकनाथ शिंदेंना त्यांनी हात लावलेला नाही. उलट या ना त्या कारणांनी ते त्यांना भेटत आहेत. राजाला सोडून प्रधानाला मारण्याची ही खेळी आहे. बुद्धिबळात प्रधानाला मारले की, नऊ पॉइंट्स मिळतात आणि ते विनिंग ॲडव्हान्टेज असते. एकदा प्रधान मारला की, राजाला टिपण्याचा मार्ग मोकळा होतो. अशावेळी, ‘मारला तर प्रधान जात आहे ना, मला काय फरक पडतो, असा विचार राजा करत असेल तर ती त्याची मोठी चूक ठरू शकते; कारण नंतर लगेचच त्याचा नंबर असतो हे त्याने लक्षात घेतले पाहिजे.’

कार्यकर्त्यांना चांगले दिवस
कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, फग्गनसिंह कुलस्ते असे  पक्षाच्या  कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेले मध्य प्रदेशातील नेते सध्या महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव, अश्वनी वैष्णव यांनी सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. यादव हे दहा-बारा दिवसांपासून पाठदुखीने कमालीचे त्रस्त आहेत; पण महाराष्ट्राकडे बारीक लक्ष असते त्यांचे. यादव हे हेडमास्तर आहेत, महाराष्ट्रातील भाजपच्या मुलांना त्यांचेच ऐकावे लागते. काही मुद्दे पटत नाहीत; पण अपिलाची सोय कुठे आहे? लोकसभेपेक्षा विधानसभेसाठी भाजपचा अप्रोच बदलत आहे. कार्यकर्ता केंद्रस्थानी ठेवा, कार्यकर्त्याला ताकद द्या, चमकेगिरी करणाऱ्यांना बाजूला ठेवा यावर फोकस आहे. सतरंजी, चिवडेवाल्यांचे दिवस पुन्हा येतील का पण? 

विधानपरिषदेचा नियम! 
विधानपरिषदेच्या सदस्यांना विधानसभेची संधी द्यायची नाही, असे काहीतरी भाजपच्या अंतस्थ गोटात शिजते आहे म्हणतात.  हा निर्णय एव्हाना झालाही असता; पण अडचण चंद्रशेखर बावनकुळेंबाबत आहे. गेल्यावेळी त्यांचे तिकीट कापले होते, मग त्यांना विधानपरिषदेवर घेऊन  पुढे प्रदेशाध्यक्ष करत पुनर्वसन करण्यात आले. आता ते त्यांच्या कामठी या मतदारसंघातून लढणार अशी चर्चा असताना पक्षाने विधानपरिषद सदस्यांबाबत निर्णय घेतला तर त्यांची अडचण होईल. कामठीची जागा तेच जिंकू शकतात, असा पक्षाचा सर्व्हे आहे म्हणतात. त्यामुळे विधानपरिषदेच्या आमदारांबाबत सरसकट निर्णय घेणे भाजप नेतृत्वाला सोपे नाही.  प्रवीण दटके (नागपूर), राम शिंदे (कर्जत-जामखेड), प्रवीण दरेकर (मुंबई) यांनाही फटका बसू शकतो.  अर्थात, दरेकरांच्या ते पथ्यावरच पडेल म्हणा. जनतेतून न लढता आमदारकी मिळत राहणार असेल तर ती कोणाला नको आहे?
 

Web Title: Special Article Why Everyone Wants to go with Sharad Pawars ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.