पराभूत झालेल्यांची मते दुर्लक्षिता न येणारी !

By किरण अग्रवाल | Published: June 9, 2024 02:13 PM2024-06-09T14:13:01+5:302024-06-09T14:13:12+5:30

Loksabha Election 2024 : पराभूत झालेल्यांची मते दुर्लक्षिता येणारी नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संबंधित पक्षांचा हुरूप वाढून जाणेही स्वाभाविक म्हणता यावे.

The opinions of the losers cannot be ignored! | पराभूत झालेल्यांची मते दुर्लक्षिता न येणारी !

पराभूत झालेल्यांची मते दुर्लक्षिता न येणारी !

- किरण अग्रवाल

अकोला, बुलढाणा व यवतमाळ-वाशिम या तीनही लोकसभा मतदारसंघांतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते तुल्यबळ असल्याचे पाहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यातून अनेकांना विविध संकेत नक्कीच घेता येणारे ठरावेत.

लोकसभा निवडणुकीत अकोला व बुलढाण्याच्या जागेवर महायुतीच्या उमेदवारांना यश लाभल्याने ‘एनडीए’ सरकारच्या माध्यमातून येथील विकासकामांना वेग येण्याची अपेक्षा आहे. परंतु तसे असले तरी या जागांवर पराभूत झालेल्यांची मते दुर्लक्षिता येणारी नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संबंधित पक्षांचा हुरूप वाढून जाणेही स्वाभाविक म्हणता यावे.

देशात ‘एनडीए’चे सरकार आरूढ होत असून, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात आपल्या विभागालाही संधी मिळण्याची मोठी शक्यता आहे, त्यामुळे विदर्भातील आपल्या परिसराच्या विकासाला गतीच मिळणार आहे. विशेषत: बुलढाण्याचे प्रतापराव जाधव हे विदर्भातून निवडून आलेले शिंदेसेनेचे एकमेव खासदार आहेत, तर ज्येष्ठ नेते नितीन गडकरी वगळता विदर्भातीलच रामदास तडस, नवनीत राणा, सुनील मेढे, अशोक नेते या विद्यमान खासदारांसह राज्यातील मातब्बर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे भले-भले भाजप नेते पराभूत झाले असताना अकोल्यात नवोदित अनुप धोत्रे यांनी मात्र भाजपचा गड शाबूत राखण्यात यश मिळविले. प्रतापराव यांची ही चौथी टर्म आहे, तर अनुप यांना त्यांच्या वडिलांच्या चार टर्मचा मोठा वारसा आहे. त्यामुळे या नेत्यांच्या प्रयत्नांतून विदर्भाच्या व आपल्या परिसराच्या विकासाचा अनुशेष यंदा नक्कीच भरून निघेल, अशी अपेक्षा करता येणारी आहे.

मात्र असे असले तरी, दुसरीकडे अकोला व बुलढाण्यातच नव्हे तर यवतमाळ-वाशिम या मतदारसंघातही पराभूत झालेल्या व दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्यांची मते कमी नाहीत. अकोल्यात तब्बल चार दशकांनंतर डॉ. अभय पाटील यांच्या निमित्ताने काँग्रेसने चार लाख मतांचा टप्पा गाठला आहे. बुलढाण्यात उद्धवसेनेचे नरेंद्र खेडेकर विजयापासून अवघ्या सुमारे २९ हजार मतांनी मागे राहिले, तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी अन्य काही पक्षीय उमेदवारांपेक्षा अधिक तब्बल सुमारे अडीच लाख मते घेतलीत. यवतमाळ-वाशिममध्ये मात्र शिंदेसेनेच्या राजश्री पाटील सुमारे ९४ हजारांच्या फरकाने मागे राहिल्यात. गेल्यावेळेच्या मतांच्या फरकापेक्षा यंदा सर्वांचाच फरकाचा टक्का घटला आहे. तेव्हा पराभूतांची ही मते तेथील मतदारांची मानसिकता सांगून जाणारी असून, त्याकडे सत्ताधाऱ्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही.

आणखी तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होईल. लोकसभा निवडणुकीची आणि विधानसभेची गणिते वेगवेगळी असतात असे कितीही म्हटले, आणि दोन्ही ठिकाणची समीकरणे, प्रश्न वेगवेगळे राहत असलीत तरी येथील विजयाच्या अनुषंगाने तेथील विजयाच्या अतिआत्मविश्वासात राहून चालणारे नसते. फार मोठ्या फरकाने नव्हे, तर तुल्यबळ मते घेऊन जेव्हा काही पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहतात तेव्हा ते अधिक ईर्षेने कामाला लागून तूट भरून काढण्याचा प्रयत्न करतात हे विसरता येऊ नये.

अकोल्यात काँग्रेसची पक्ष संघटनात्मक अवस्था किती दयनीय आहे हे सांगण्याची गरज नाही. तरी गेल्यावेळी विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात धीरज लिंगाडे यांनी सर्वांना चकित करणारा विजय मिळविला होता. आताही लोकसभेसाठी तुलनेने संघटनात्मक प्रचाराची फारशी यंत्रणा नसताना डॉ. पाटील यांनी ४ लाख मते मिळविलीत. ग्रामीण भागात तर त्यांना मोठी साथ लाभलेली दिसून येते. पराभूत होऊनही काँग्रेसचा उत्साह वाढवणारीच ही बाब आहे. अर्थात, उलट बाजूने विचार करता रिसोडला काँग्रेसचे आमदार असूनही भाजपला मताधिक्य लाभल्याने तेथे काँग्रेसला इशारा मिळून गेला आहे.

बुलढाण्यात खेडेकरांचा निसटता पराभव झाला, त्यामुळे आताच्या उणिवा लक्षात घेऊन रणनीती आखली गेली तर उद्धवसेनेसाठीही आशादायक स्थिती राहू शकते. विशेष म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर राहूनही तुपकरांचे नेतृत्व तेथे उजळून निघाले अशी मते त्यांनी मिळविली आहेत. गंमत अशी की, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात तर जाधव व खेडेकरांपेक्षा तुपकरांनी अधिक मते मिळविली. जाधव एकूण सुमारे २९ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी होत असताना अपक्ष तुपकरांनी या एकट्या विधानसभा मतदारसंघात त्यापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळविले. मेहकरच्या ‘होम ग्राउंड’वर जाधवांना फक्त २७३ मतांची आघाडी मिळाली. या अशा बऱ्याच गोष्टी खूप काही संकेत देऊन जाणाऱ्या आहेत.

सारांशात, लोकसभा निवडणुकीत कमी मतांच्या फरकाने पराभूत झालेले उमेदवार व त्यांच्या पक्षांना ‘हलक्यात घेऊन’ चालणार नाही. अकोल्यात काँग्रेस, बुलढाण्यात उद्धवसेना व वाशिममध्ये शिंदेसेनेचा लोकसभेसाठी दिसून आलेला परफॉर्मन्स आगामी विधानसभेच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांसाठी आव्हानात्मकच ठरला आहे.

Web Title: The opinions of the losers cannot be ignored!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.