नि:सत्त्व आणि निरर्थक, ते फेकणे हीच साधना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 08:49 IST2024-12-17T08:48:43+5:302024-12-17T08:49:44+5:30
आतून रिकामे, नि:सत्त्व वाटावे अशी वेळ कलाकाराच्या आयुष्यात येतेच. अशावेळी काय करावे? सारे बाजूला ठेवून ‘चिला कतना’ करण्यासाठी एकांतवासात जावे!

नि:सत्त्व आणि निरर्थक, ते फेकणे हीच साधना!
- झाकीर हुसेन
मनातील असंख्य प्रश्नांच्या उत्तरांसाठी गुरूंकडे आशेने बघणाऱ्या माझ्या शिष्यांना पाहताना मला अजून आठवतो, तो पंचावन्न-साठ वर्षांपूर्वी झाकीर नावाच्या तरुण कलाकारापुढे उभा राहिलेला एक कसोटीचा क्षण. वयाच्या बाराव्या वर्षापासून व्यावसायिक म्हणून मैफलींमधून मी वावरत होतो. अब्बाजींबरोबर स्टेजवर वाजवायचो, तेव्हा होणारे कौतुक भारी आवडायचे. पण सोळाव्या वर्षी, प्रथमच, एका जाणत्या समीक्षकाने मला त्यांच्या एका लेखाद्वारे जाहीरपणे धारेवर धरत माझ्या वादनाबद्दल काही सवाल माझ्यापुढे ठेवले होते. त्यातील एक मुद्दा फार महत्त्वाचा होता.
माझ्याकडून, अब्बाजींच्या शिष्याकडून त्यांना ताजे करकरीत असे काही ऐकायचे होते आणि मी तेच जुने, घोटलेले नव्या दमाने ऐकवू बघत होतो. वर्गाच्या दारात उभे करून हातावर सपासप छड्या बसाव्या असे सगळे होते ते. डोळ्यांत पाणी आणणारे. खूप उदास झालो, पण हळूहळू त्या काळोखात उजेडाचे छोटे कवडसे दिसू लागले. जाणवले, टीका कठोर आहे पण चुकीची नसावी. स्वत:चा पुनर्शोध घेण्याची ही वेळ आहे आणि मग मला प्रकर्षाने आठवण आली ती चिलाची. अब्बाजी घरी नसताना, अवघ्या सोळाव्या वर्षी मी मलंग गडावर असलेल्या हाजी मलंगच्या दर्ग्याकडे निघालो. त्या टीकेने केलेल्या घावाच्या जखमा भरून काढण्यासाठी..!
सुफी संगीतकार ज्याला ‘चिला कतना’ म्हणतात तो एक अध्यात्मिक प्रवासच असतो, एकट्याने, अगदी एकट्याने करायचा. बाहेरच्या जगाला जोडणारे सगळे रस्ते-वाटा आणि फटी कडेकोट बुजवायच्या. शरीर जगवण्यापुरते ठराविकच अन्न घेतले की, उरलेला सगळा वेळ, लक्ष फक्त जगण्याच्या उद्दिष्टावर केंद्रित करायचे. दिवसाच्या पंधरा-सोळा तासांच्या सरावात खूप काही ढवळून निघते. स्वत:मध्ये साचत गेलेले, ठणका देत असलेले, नव्याने फुटणारे झरे अडवून धरणारे, करून बघायचे राहून गेलेले; असे सगळे हळूहळू वर यायला लागते. त्यातले गुंते दिसू लागतात, उलगडू लागतात. हाजी मलंग बाबांच्या दर्ग्यात केलेल्या त्या सोळा दिवसांच्या मुक्कामात अनेकदा एखाद्या मंत्रासारखे बोल स्फुरत गेले. दिवसातील किती तास तबला वाजवत होतो ते आठवत नाही, स्मरणात आहे ती मधाच्या एकेका दाट थेंबासारखी रोज नव्याने झिरपत गेलेली प्रसन्नता !
आतून अगदी रिकामे, नि:सत्त्व वाटावे, अशी एखादी वेळ प्रत्येकच कलाकाराच्या आयुष्यात कधीतरी येत असते. वापरून-वापरून निरर्थक, गुळगुळीत झालेले बरेच काही ओंजळीत जमवून मोठ्या निर्धाराने बाहेर भिरकावून देण्याची गरज असते. अशावेळी ओळखावे, ही साधनेच्या गरजेने दिलेली हाक आहे !
कस्तुरीचा कंद तळहातावर आणून ठेवावा, तसे अब्बाजींनी एका विलक्षण आनंदाचे बीज माझ्या आयुष्यात पेरले. संगीताच्या मैफली, त्यानिमित्ताने वाट्याला येणारे कधी सुखाचे लखलखीत तर कधी नि:शब्द करून टाकणारे कोवळे, निरभ्र क्षण हे सगळे मागे वळून बघतो, तेव्हा आठवत राहतात अब्बाजी. आधी माया करणारे वडील, तान्ह्या वयात माझ्या कानात तबल्याचे बोल म्हणणारे आणि मग त्यानंतर, शिष्य असलेल्या आपल्या मुलाने अल्लारखाची कॉपी होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे गुरू. ‘मेरा तो हो गया उस्ताद अल्लारखाँ, अभी दुसरा उस्ताद अल्लारखाँ तो कॉपी होगा, फायदा क्या है? मेरा लडका मुझसे अच्छा बजाये, कुछ नया करे, आगे जाये.’ हे प्रथम ऐकले तेव्हा आधी थोडे वाईट वाटले, जरा दुखावलोही, पण मग जाणवू लागले, अब्बाजींचे गुरू मियाँ कादर बक्श यांच्यापेक्षा अब्बाजींचे वादन अगदी वेगळे होते. अब्बांचा नाद हा त्यांनी शोधलेला त्यांचा स्वत:चा नाद होता आणि आता ते मला स्वत:चा नाद शोधायला सांगत होते..
पहाटे तीन वाजता मला उठवून आपल्याबरोबर बसवून अब्बाजी बोल शिकवायचे. मला शाळेत पाठवण्यासाठी अम्मीची लगबग सुरू झाली की कधीतरी तिला म्हणायचे, ‘अरे, क्यों भेज राही है तू स्कूल उसको.. वो तो तबला बजायेगा, उसको रियाझ करने दो..!’ अब्बांनी आम्हाला रागांबद्दल, त्यांच्या भावनिक वैशिष्ट्यांबद्दल, संगीतरचनांबद्दल शिकवले. हे सगळे एकल वादन करण्यासाठी शहाणे करणारे होते. पण तबला संगत करताना मुख्य कलाकाराशी कसा संवाद साधायचा, ते त्यांनी कधीच शिकवले नाही. ती वाट आम्ही आमची शोधायची होती.
लहानपणी अब्बाजींच्या आग्रहावरून दर रविवारी मी बडे गुलाम अली खांसाहेबांच्या घरी, वाळकेश्वरला, त्यांना ताल देण्यासाठी जायचो. मी शिकत होतो समोरच्या कलाकाराला वाचायला. त्या कलाकाराला काय आवडते, आवडत नाही, मैफलीच्या वेळी त्याची मन:स्थिती कशी असते, हे शोधत त्याच्या नोंदी मनात करीत होतो आणि साथीदार म्हणून मी माझा मलाच घडवत होतो. हाच मार्ग असतो साथीदार म्हणून घडण्याचा. साथसंगत करताना त्यातून योग्य ते आणि तेवढेच निवडता येणे ही साथीदार म्हणून तुमची परीक्षा असते. त्यातून अनुरूप असे नाते घडत असते..! इतके अनुरूप की जणू आम्ही एकमेकांसाठीच जन्माला आलोय असे वाटावे..! या प्रवासात सोबतीला असते काळाशी घट्ट नाते असलेले संगीत! नव्या प्रवाहांना आपल्यात सामावून घेण्याची उदारता आणि उमदेपणा असलेले संगीत!
(‘दीपोत्सव’ या लोकमत समूहाच्या दिवाळी अंकात २०२० साली प्रसिद्ध झालेल्या प्रदीर्घ लेखाचे संपादित संक्षेपन)