Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशातील रणांगणात भाजपाचं ८०:२० चं सूत्र आणि नरेंद्र मोदींचा ‘प्लॅन’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 05:49 AM2022-02-17T05:49:29+5:302022-02-17T05:49:59+5:30

योगींनी हिंदुत्वावर बोलत राहायचे आणि मोदींनी विकासावर भर द्यायचा, हे सूत्र उत्तर प्रदेशात कायम असले, तरी भाजपने दिशा बदललेली दिसते!

Uttar Pradesh Election 2022: BJP's 80:20 formula and Narendra Modi's 'plan' in Uttar Pradesh election | Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशातील रणांगणात भाजपाचं ८०:२० चं सूत्र आणि नरेंद्र मोदींचा ‘प्लॅन’ 

Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशातील रणांगणात भाजपाचं ८०:२० चं सूत्र आणि नरेंद्र मोदींचा ‘प्लॅन’ 

googlenewsNext

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,
नवी दिल्ली

उत्तर प्रदेशात मतदानाच्या दुसऱ्या फेरीनंतर निवडणूक पंडित आपली सुरावट बदलू लागले आहेत. भाजपच्या दोन इंजिनांच्या सरकारने राज्यासाठी काय केले, यावर भर देण्यापेक्षा समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांनी पाच वर्षांपूर्वी राज्यात काय नुकसान केले, यावर भाजपचे वरिष्ठ नेते आगपाखड करताना दिसतात. पंतप्रधान मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा त्यांच्या प्रचार सभांमध्ये भीती आणि भयाची पेरणी करत आहेत. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल सत्तेवर आले तर राज्याचे वाटोळे करतील, असे ते म्हणतात. 

अमित शहा तर इथंवर सांगतात की, समाजवादी पार्टी - राष्ट्रीय लोकदल सत्तेवर आले तर सपावाले रालोदच्या जयंत चौधरी यांना बाजूला सारून आझम खान यांना आणतील. मुस्लीम आणि जाट यांच्यात जमत चाललेले सख्य मोडण्याचा हेतू यामागे दिसतो. २०१३च्या कैराना दंगलीची आठवणही भाजप नेते सातत्याने करून देतात. त्यावेळी मुस्लीम आणि जाट एकमेकांना भिडले होते. त्यातूनच २०१४ची लोकसभा निवडणूक आणि २०१७च्या विधानसभा निवडणुकीत सपाला मार खावा लागला होता. ‘एनडीए’ने सुरू केलेल्या सर्व कल्याणकारी योजना बंद होतील, असे सांगून मोदी हल्ला तीव्र करत आहेत. 

एका सपा नेत्याने आपल्या कुटुंबातील दोन डझनावर सदस्यांना बढती दिली, असे सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली. एकूण काय, भाजपच्या धोका लक्षात आला असून, आपल्या २० टक्क्यांहून अधिक विद्यमान आमदारांना पक्षाने तिकीट नाकारले आहे. आता परिस्थिती काबूत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुन्हा सत्तेवर आल्यावर काय काय मिळेल, याची यादी पक्षाने मतदारांना दिली आहे. मतदानाच्या पहिल्या फेरीनंतर भाजपने निवडणुकीतले मुद्देही बदलले. कुठेही हिजाबचा मुद्दा उसळलेला नाही, हे विशेष! हिंदू-मुस्लीम यांच्यामधल्या दरीभोवती आता निवडणूक फिरत आहे. पुढच्या फेऱ्यांमध्ये त्याची फळे पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न भाजप करेल. मुख्यमंत्री योगी यांना अर्थातच त्याचा आनंद होईल. ते आणि त्यांचे समर्थक प्रारंभापासूनच ८० : २० हे सूत्र चालवत आहेत. योगींनी हिंदुत्वावर बोलत राहायचे आणि मोदींनी विकासावर भर द्यायचा!!

मोदी यांची काटेकोर आखणी
जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांना मोदी यांनी आधी निवडणुकीच्या खेळपट्टीवर उतरवले पण नंतर त्यांनी सूत्रे आपल्या हाती घेतली. मोदी मैदानात उतरतात तेव्हा नीट आखणी झालेली असते. लोकसभेत ७ फेब्रुवारीला याची झलक पहिल्यांदा दिसली. ते ९० मिनिटे बोलले आणि त्यांनी राहुल गांधींना धुवून काढले. पाच राज्यांतील मतदारांना मोदींनी समोर ठेवलेले होते. गोव्यातल्या अपयशाबद्दल त्यांनी नेहरूंवर ठपका ठेवला तर १९८४च्या शीख हत्याकांडाबद्दल गांधी कुटुंबावर हल्ला चढवला. मोदी शहेनशहासारखे वागतात, या राहुल यांच्या आरोपाने विचलित न होता मोदींनी पाच राज्यातले मतदार समोर ठेवून भाषण दिले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी राज्यसभेत आपले वाक्पटुत्व दाखवले. तिथेही त्यांचा भर पाच राज्यांतल्या निवडणुकांवर होता. 

९ फेब्रुवारीला तर आक्रीतच घडले. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली. बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी ती देशभर दाखवली. १० तारखेला उत्तर प्रदेशात पहिल्या फेरीतले मतदान होते. पुढचे तीन दिवस तेच चर्चेत राहिले. मोदी यांनी भक्तांवर तर मोहिनी टाकलीच पण कुंपणावरच्यांनाही प्रभावित केले. मोदी यांच्या नियोजनाला तोड नसते. प्रस्तुत लेखकाने १० पंतप्रधान पाहिले आहेत. इंदिरा गांधी वगळता इतके काटेकोर नियोजन कोणी केलेले कधी दिसलेले नाही.

पंजाबात भाजपला ‘आप’मुळे काळजी
पंजाबात ‘आप’ने चांगला जोर दाखवल्याने भाजपची काळजी वाढली आहे. पंजाबात ‘आप’ची सरशी झाली तर अरविंद केजरीवाल यांना अखिल भारतीय वलय प्राप्त होईल. उत्तर प्रदेशात काॅंग्रेसला पर्याय म्हणून तो पक्ष उभा राहील. एकेकाळी संयुक्त जनता दलाच्या नितीश कुमार यांच्याकडे असा खमका पर्याय म्हणून पाहिले जात होते. परंतु, भाजपशी हातमिळवणी केल्यावर त्यांचा आलेख घसरला. ममताही काही राज्यांत असा प्रयत्न करत आहेत. पण पश्चिम बंगाल हे त्यांचे घरच त्या फारसे ठीक ठेवू शकलेल्या नाहीत. पंजाबात त्रिशंकू विधानसभा झाली तर भाजप पुन्हा अकालींना बरोबर घेईल का, हे आता बघायचे.

किल्ला प्रियांकांच्या कनवटीला!
निवडणुकीच्या दोन फेऱ्या आटोपल्या तरी उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रचारक राहुल गांधी कुठेही न दिसणे हे एक आश्चर्यच होय. राहुल गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूरमध्ये दौरा करत आहेत. उत्तर प्रदेशात प्रचारापासून ते हातभर लांबच राहिले. भगिनी प्रियांकाकडे सूत्रे सोपविल्यावर उत्तर प्रदेशातल्या कोणत्याही नेत्याला त्यांनी चुचकारलेले नाही. प्रियांका टीव्ही वाहिन्यांना मुलाखती देत आहेत, पत्रकारांच्या प्रश्नांना सामोऱ्या जात आहेत हे त्यांचे बंधुराज राहुल यांच्या अगदी उलट आहे. २०१४ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी फजितवाडा झाल्यानंतर त्यांनी अशा मुलाखती देणे बंद करून टाकले. प्रियांका यांचे मात्र उलटे आहे. त्या नेहमी छान हसतात. सांगण्यासारखे फार नसल्याने लोकांवर त्या प्रभाव टाकू शकल्या नसतील पण राहुलपेक्षा माध्यमांशी त्यांनी छान जुळवून घेतलेले दिसते, हे मात्र नक्की! आश्चर्य म्हणजे त्या पंजाबातही दौरा करत आहेत.

Web Title: Uttar Pradesh Election 2022: BJP's 80:20 formula and Narendra Modi's 'plan' in Uttar Pradesh election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.