विजय मल्ल्या पळाले, मग भुजबळ का बरे अडकले?

By admin | Published: March 17, 2016 03:59 AM2016-03-17T03:59:19+5:302016-03-17T03:59:19+5:30

विजय मल्ल्या आणि छगन भुजबळ यांच्यात साम्य काय आहे? दोघेही आपल्या संपत्तीचं (काही लोकांच्या मते हिडीस) प्रदर्शन करीत आले आहेत. मल्ल्या यांच्या पार्ट्या, सुंदर तरूणींबरोबरची समुद्रातील

Vijay Mallya fled, why Bhujbal got stuck? | विजय मल्ल्या पळाले, मग भुजबळ का बरे अडकले?

विजय मल्ल्या पळाले, मग भुजबळ का बरे अडकले?

Next

- प्रकाश बाळ
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)

विजय मल्ल्या आणि छगन भुजबळ यांच्यात साम्य काय आहे? दोघेही आपल्या संपत्तीचं (काही लोकांच्या मते हिडीस) प्रदर्शन करीत आले आहेत. मल्ल्या यांच्या पार्ट्या, सुंदर तरूणींबरोबरची समुद्रातील सैर वा पंचतारांकित राहणी गाजत आली आहे. मुलीबाळींचा पिंगा भुजबळ यांच्याभोवती आहे, असं कधी दिसलं नाही. मात्र नाशिकचा महाल असू दे अथवा मुंबईतील इमारती, तेथील भुजबळ यांची राहणी पंचतारांकितच आहे.
या ना त्या प्रकारे पैसा मिळविण्याचा व तो उधळण्याचा हव्यास, हा या दोघांतील मूलभूत समान (अव)गुण. अर्थात दोघांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरात मोठी भिन्नता आहे. मल्ल्या हे भारतातील आणि जगातीलही अभिजन वर्गात वावरत आले आहेत. आपल्या वडिलांच्या दारूच्या उत्पादनाचा उद्योग मल्ल्या यांंनी वाढविला आणि त्यांची कंपनी दारू उत्पादन व विक्रीत भारतात पहिल्या क्रमांकाची मानली जाऊ लागली. नंतर त्यांनी विमान कंपनी काढली. तीही पंचतारांकित पद्धतीनं चालविण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आणि म्हणून आज ते गोत्यात आले आहेत. भुजबळ यांची उडी महाराष्ट्र आणि फार तर देशातील इतर भागांपुरतीच मर्यादित आहे. त्यांनी ‘सत्ता आणि राजकारण’ हाच उद्योग मानला आणि तेथे बक्कळ पैसा कमावला.
मल्ल्यादेखील राजकारणात उतरले. राज्यसभेचे खासदार बनले. पण त्यांच्यासाठी आपला उद्योग वाढविण्यासाठीचं एक साधन एवढाच राजकारणाचा उपयोग आहे. या साधनाचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला. विविध पक्षांच्या राजकारण्यांना मुबलक पैसा त्यांनी पुरवला. प्रसार माध्यमांनाही संपत्तीच्या जोरावर अंकित करून ठेवलं. आज प्रसार माध्यमांचा प्रकाशझोत मल्ल्या यांच्या आर्थिक गैरव्यवहारावर पडत असताना, ‘तुम्हाला मी काय काय दिलं व काय काय पुरवलं, याचा पुरावा माझ्यापाशी आहे’, असं ते बजावत आहेत, ते उगाच नाही. भुजबळ यांनी असं काही केलं नाही. त्यांची मूठ कधी उघडलीच नाही. त्यांनी थोडं फार ‘ओबीसी’चं राजकारण
केलं, नाही असं नाही. पण तेही तोंडी लावण्यापुरतंच. सत्ता हातची जाऊ नये, एवढ्याच मर्यादेत. बाकी ‘सत्तेचा वापर करून पैसा ओरपणं’ हीच भुजबळ यांची कार्यपद्धती राहिली. त्यांनी कुटुंबापलीकडं सत्तेत व संपत्तीत कोणालाही वाटेकरी होऊ दिलं नाही.
पैसा मिळविण्याच्या कार्यपद्धतीतील नेमक्या याच फरकामुळं आज भुजबळ अटकेत आहेत आणि मल्ल्या विनासायास परदेशी जाऊन राहू शकले आहेत.
...कारण ‘सत्तेसाठी पैसा आणि सत्तेच्या वापरातून अधिक पैसा’ ही जी आजच्या राजकारणात पक्की चाकोरी बनवण्यात आली आहे, त्यात सर्वांना सहभागी करून घेणं गरजेचं असतं. ज्यांना या चाकोरीबाहेर ठेवलं जातं, ते मग या ना त्या प्रकारे उट्टंं काढण्याचा प्रयत्न करतात.
मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या आवेशात तावातावानं काँग्रसे-राष्ट्रवादी काँगे्रसच्या भ्रष्टाचाराचा व राज्य कर्जाच्या खाईत बुडवणाऱ्या कारभाराचा लेखाजोखा विधानसभेत मांडतात. पण हेच मुख्यमंत्री राज्यातील सर्व अनधिकृत बांधकामं ‘नियमित’ करून टाकतात. त्यासाठी कारण देतात, ते गरिबांच्या हितासाठी निर्णय घेतल्याचं. निर्णय गरिबांच्या हितासाठी घेतला, पण या गरिबांना अशी अनधिकृत घरं विकणारे बिल्डर्स, त्या इमारतींना परवानगी देणारे अधिकारी आणि त्यांच्या मागं उभे राहणारे राजकारणी यांच्यावर कारवाई करण्याची गरज मुख्यमंत्र्यांना वाटत नाही. याचं कारण ‘सत्तेसाठी जो पैसा’ लागतो, तो हेच बिल्डर्स पुरवत असतात आणि त्यासाठीच त्यांना अशी अनधिकृत घरं बांधू दिली जात असतात. काँगे्रस सत्तेत असताना हेच करीत आली होती. तेव्हा विरोधात असलेले हेच मुख्यमंत्री तेवढ्याच आवेशाने व तावातावानं काँगे्रसवर टीकेचे आसूड ओढताना पाहायला मिळत असत. आता फक्त विधानसभेतील जागा बदलल्या. कार्यपद्धती तीच आहे आणि आवेशही तसाच आहे. पण हा आवेश हे जनहिताचं निव्वळ नाटक आहे. मुख्यमंत्र्यांनी ते उत्तम प्रकारे वठवलं, एवढंच फार तर त्यांचं श्रेय.
हीच गोष्ट शेती व्यवस्थेतील पेचप्रसंगाची. मल्ल्या नऊ हजार कोटी बुडवून परदेशी पसार होतात आणि इकडं एक दोन लाखांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांच्या घरादारावर टाच आणली जाते. तो निराशेच्या खाईत लोटला जातो. आत्महत्त्या करतो. त्याचं कुटुंब उघड्यावर येतं. या विदारक वास्तवात एकीकडं जी भीषणता आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यातील जे कारूण्य आहे, त्यानं आपल्या देशातील कोणत्याच राजकारण्याचे डोळे खरे ओलावताना दिसत नाहीत. म्हणजे डोळ्यात पाणी आल्याचं नाटक पंतप्रधान मोदी यांच्यासून गल्लीबोळातील उपटसुंभ व उनाड नेत्यांपर्यंत अनेक जण करतात.
‘पॅकेज’च्या निमित्तानं आकड्यांचे खेळ करून दाखवतात. पण प्रत्यक्षात असं एकही राजकारणी म्हणायला तयार नाही की, ‘येत्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखल्या जातील आणि त्यासाठी मी शेतकऱ्यातच राहून काम करणार आहे’. शेतकऱ्यांचा कैवार घेणारे शेतकरी नेतेही असं म्हणायला तयार नाहीत. किंबहुना आज मल्ल्या प्रकरण गाजत असताना, ‘आम्ही शेतकऱ्यांकडची कर्जे वसूल करून देणार नाही, आधी मल्ल्या यांना परत आणून त्यांच्याकडचे नऊ हजार कोटी वसूल करा, मगच शेतकऱ्यांच्या कर्जाचं बोला, जबरदस्ती झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू’, अशी अटीतटीची भाषा आज सत्तेची उब मिळवून नंतर निवांतपणे शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारणारे महाराष्ट्रातील राजू शेट्टी वगैरे नेते का बोलत नाहीत? या नेत्यांचं सोडा, ‘आपणच जनतेचे खरे कैवारी’ असा आव आणणारे अगदी डावे पक्षही असं काही बोलत नाहीत.
उघडच आहे की, सारेच पक्ष ‘सत्तेसाठी पैसा आणि सत्ता वापरून अधिक पैसा’ या चाकोरीत सुशेगात राहून राजकारण करीत आहेत. अशा परिस्थितीत सगळेच एका चाकोरीतील असल्यानं सत्तेचा वापर करून घेण्यातील कौशल्य निर्णायक ठरत असतं. भुजबळ यांच्याकडं हे कौशल्य नाही. त्यामुळं ‘हपापाचा माल गपापा’ अशी अवस्था होऊन त्यांना तुरूंगात जावं लागलं आहे.

Web Title: Vijay Mallya fled, why Bhujbal got stuck?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.