बराच काळ राजकीय विजनवासात गेलेल्या राज ठाकरेंच्या 'पुनर्जन्मा'मागचं इंगित काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 12:01 PM2022-05-05T12:01:38+5:302022-05-05T12:10:29+5:30

राजकीय विजनवासातले राज ठाकरे अचानक स्वत:चा पुनर्शोध घेतात आणि त्यांचे भाषण हिंदीत अनुवादित करून देशभर दाखवले जाते, हे काय आहे? 

What are the indications behind mns Raj Thackeray active in politics loudspeakers | बराच काळ राजकीय विजनवासात गेलेल्या राज ठाकरेंच्या 'पुनर्जन्मा'मागचं इंगित काय?

बराच काळ राजकीय विजनवासात गेलेल्या राज ठाकरेंच्या 'पुनर्जन्मा'मागचं इंगित काय?

googlenewsNext

हरीश गुप्ता, 
नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरचे भोंगे उतरवायला मुदत घालून दिली आणि ते न उतरल्यास ध्वनिक्षेपकावरून हनुमान चालिसा  लावण्याची धमकी दिली. या सगळ्याला भाजपच्या महाराष्ट्रातील संपूर्ण यंत्रणेचा मूक पाठिंबा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बराच काळ राजकीय विजनवासात गेलेले राज ठाकरे स्वतःला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मुद्दा शोधत होते हे खरे आहे. हनुमान चालिसाचा मुद्दा विविध राज्यांतल्या स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांनी मांडलेला आहे. त्यात राज ठाकरे एकदम अवतीर्ण झाले. रविवारी राज ठाकरेंची औरंगाबादेत सभा झाली. जवळपास सगळ्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी ती दिवसभर गाजवत ठेवली. पडद्यामागे काय घडते आहे याचा अंदाज यावरून येऊ शकतो. सभेची बातमी द्यायला पाहिजे होती, यात शंका नाही. परंतु, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यासह इतर सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी बाजूला ठेवून सभेचे थेट प्रक्षेपण केले गेले. इतकेच नव्हे तर राज ठाकरेंचे मराठी भाषण त्याच वेळी हिंदीत अनुवादित करून सर्वत्र ऐकवण्याची व्यवस्था केली गेली, त्याचा देशभर परिणाम झालेला दिसला. सभा दणदणीत यशस्वी व्हावी म्हणून राज यांच्या अदृश्य मित्रांनी श्रोते पाठवले होते, हे वेगळे सांगायला नको. आणि यामागचा हेतू साध्यही झाला. उद्धव ठाकरे सरकारला दोन पावले मागे सरकावे लागले. 

उद्धव यांची मनधरणी करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडण्याचे भाजपने ठरवले आहे, असे मी या स्तंभात पूर्वी म्हटले होते. आघाडी दुर्बल करण्याची योजना भाजपने आखली आहे. राज ठाकरे हे नवे शस्त्र त्यांच्या हाती लागले असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील लढाई बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वैचारिक वारसदार कोण? - ही आहे. आणखी एक महत्त्वाचे- राज ठाकरे आणि भाजपला या राजकीय नाट्यात गमावण्यासारखे काहीच नाही. 

वर्धापन दिनाचा पेच 
मोदी सरकारचा वर्धापन सोहळा या महिन्याच्या अखेरीस येतो. या निमित्ताने माध्यमांमधून धमाका उडवून देण्याचे बेत सरकारने आखले आहेत. या सोहळ्याचे मुख्य सूत्र काय असावे, यावर सरकारमध्ये बड्या मंडळींचा खल चालला आहे. चर्चेचा एक विषय असा की, मोदी सरकारचा  आठवा वाढदिवस साजरा करावा की एनडीए ३ चा तिसरा? 
मोदी सरकारची २०२० आणि २०२१ ही सुरुवातीची २ वर्षे कोरोनाशी लढण्यात गेली. लॉकडाऊन्स, स्थलांतरे, बेरोजगारी, आर्थिक प्रश्न अशी बरीच झंझटे त्यात होती. स्वतःची लस विकसित करून आणि ८० कोटी लोकसंख्येला मोफत अन्न पुरवून भारताने साथीचा यशस्वी सामना केला असला तरी मोदींची राजवट साजरी करण्यासाठी अधिक लक्षवेधी मुद्दा शोधला जातो आहे. 

चीनकडून होणारी आयात कमी करण्यासाठी देशाने या दोन वर्षांत उत्पादन क्षमता वाढवली. आत्मनिर्भर भारत योजनेचा तो भाग आहे. मोदी सरकारने पहिले दोन वाढदिवस गाजावाजा करत साजरे केले नाहीत. आता मात्र ती कमतरता भरून काढण्याचा सरकारचा इरादा आहे.  बहुसंख्य नेत्यांचे मत आहे की, तिसऱ्याऐवजी सलग राजवटीचा थेट आठवा वाढदिवस साजरा करावा. येत्या काही दिवसात यावर अंतिम निर्णय होईल.  नव्या मोहिमेची कॅचलाईन काय असावी, यावरचा निर्णय अजून होतो आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक छोटीशी समिती स्थापन केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग, सी. टी. रवी, माध्यमप्रमुख अनिल बलुनी, माहिती नभोवाणीमंत्री अनुराग ठाकूर आणि इतरांचा या समितीत समावेश आहे. कोविडने पुन्हा डोके वर काढल्याने जरा चिंता वाढली आहे, हे खरे. पण, त्यामुळे उत्साह उणावलेला नाही. कलम ३७० रद्द करणे, राममंदिराची उभारणी, विधानसभा निवडणुकीतील यश हे सारे सरकारच्या प्रतिमासंवर्धनासाठी वापरले जाईल, यात शंका नाही. 

‘प्रधानमंत्रीसे प्रधानसेवक, ८ साल बेमिसाल, विश्वगुरू भारत अशी काही सूत्रे वापरली जाणार  असल्याची चर्चा आहे. ७२ वर्षांचे मोदी लोकांसाठी सुटी न घेता अहोरात्र अथक काम करत असतात, यावरही भर असेल. अल्प शुल्क आकारून सर्वांसाठी आरोग्य विम्यासारखी एखादी मोठी योजना जाहीर केली जाण्याचीही शक्यता आहे.

तेलंगणात बदलाचे वारे? 
तेलंगणात २३ सालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही तरी घडेल, अशी अटकळ बांधून भाजपने पक्षाची दारे उघडली आहेत. कोणत्याही पक्षातल्या कोणालाही प्रवेश खुला आहे. १८ च्या निवडणुकीत भाजपला एकूण मतांच्या फक्त ७ टक्के मते मिळाली होती. ११९ सदस्यांच्या विधानसभेत त्यांचा अवघा एक आमदार आला. मात्र, दोन पोटनिवडणुकांत पक्ष उमेदवारांनी टी. आर. एस. उमेदवारांचा पराभव केल्याने सध्या राज्य भाजपमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. बृहन् हैदराबाद महापालिका निवडणुकीतही भाजप दुसरा मोठा पक्ष झाला. काँग्रेस तिसऱ्या स्थानावर गेली. 

भाजपच्या आक्रमक मोहिमेचा भाग म्हणून अमित शहा १४ मे रोजी तेलंगणा दौऱ्यावर जात आहेत. एकामागून एक सर्व केंद्रीय  मंत्री राज्याला भेट देतील. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरुद्ध जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. काळजीत पडलेले मुख्यमंत्री निवडणुका वर्षभर पुढे ढकलण्यासाठी निमित्त शोधत  असल्याचीही चर्चा आहे. या वर्षअखेरीस भाजप गुजरात आणि हिमाचलात पुन्हा सत्तेवर आल्यास राव यांची स्थिती बिकट होईल. तेलंगणात भाजपचा जोर वाढू लागल्यानेच केसीआर विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या उद्योगाला लागले, असे म्हटले जाते.  आता राहुल गांधीही तेलंगणाचा दौरा करणार आहेत. पण, त्यांना कोणी फारसे जमेस धरलेले नाही.

Web Title: What are the indications behind mns Raj Thackeray active in politics loudspeakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.