नीरज चोप्रामुळे 'रोड मराठा' समाज चर्चेत; कसा वाचला, जगला, वाढला हा समाज? जाणून घ्या इतिहास

By Shrimant Maney | Published: August 11, 2021 05:40 AM2021-08-11T05:40:05+5:302021-08-11T05:40:32+5:30

पानिपतच्या रणांगणात पराभूत झालेल्या मराठी सैनिकांपैकी अनेकांनी परत न येता हजार-बाराशे मैलांवर उरलेले आयुष्य काढले.. तेच हे रोड मराठा!

what is road maratha community to which neeraj chopra belongs to | नीरज चोप्रामुळे 'रोड मराठा' समाज चर्चेत; कसा वाचला, जगला, वाढला हा समाज? जाणून घ्या इतिहास

नीरज चोप्रामुळे 'रोड मराठा' समाज चर्चेत; कसा वाचला, जगला, वाढला हा समाज? जाणून घ्या इतिहास

Next

- श्रीमंत माने,  कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर (shrimant.mane@lokmat.com)

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा पानिपतच्या युद्धात वाचलेल्या सैनिकांच्या रोड मराठा समाजाचा आहे, याची महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. स्वत: नीरज व त्यांचे कुटुंबीयदेखील गौरवाने आपण मराठ्यांचे वंशज असल्याचे सांगत आले आहेत; पण हरयाणातील मराठा ही संकल्पना वेगळी आहे. पानिपतच्या रणांगणात अहमदशाह अब्दालीविरुद्ध लढणारे आताच्या मराठा नव्हे तर अठरापगड जातीचे लोक होते. युद्धात मानहानीजनक पराभव झाल्यानंतर अपयशी तोंड घेऊन परत येण्याऐवजी त्यांनी हजार-बाराशे मैलांवर उरलेले आयुष्य काढले. आताच्या जातीपातींच्या भिंती त्यांनी मधल्या २६० वर्षांमध्ये पुसून टाकल्या. हरयाणातील कर्तबगार समाज अशी ओळख मिळविली. जगाच्या कानाकोपऱ्यात या समाजाचे कर्तबगार तरुण पोहोचले. नीरज चोप्राशिवाय भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार सुरिंदर कुमार तसेच व्हॉलिबॉलमध्ये बलविंदरसिंग बल्लू, दलेरसिंग चौहान, शेरसिंग शेर, बास्केटबॉलमध्ये अजमेरसिंग चोपडा, मुष्टियुद्धात मनोज कुमार असे सहा अर्जुन पुरस्कारविजेते रोड मराठा समाजाने घडविले. भारतीय म्हणून नीरजच्या यशाने छाती फुगायलाच हवी, पण त्याला आपला समजणाऱ्या महाराष्ट्रातील मराठ्यांनी खेळांसाठी रोड मराठ्यांपासून प्रेरणा घेतली तरच या अभिमानाला अर्थ राहील.



लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, सत्तावीस मोहरा हरवल्या, चिल्लरखुर्दा किती गेला, याची गणना नाही, हे पानिपतचे वर्णन महाराष्ट्रातील प्रत्येकाला तोंडपाठ आहे. कारण १४ जानेवारी १७६१ या मकर संक्रांतीच्या दिवशी अवधचा नवाब सुजा उद्दौला याने मदतीसाठी पाचारण केलेला अफगाणी आक्रमक अहमदशाह अब्दाली विरुद्ध सदाशिवराव भाऊ व विश्वासराव या पेशव्यांच्या नेतृत्वात लढलेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. मराठी मनाच्या खोल कोपऱ्यात ही जखम अडीचशे वर्षे भळभळते आहे. मुलुखगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या लढवय्या मराठा सैन्याची एक पिढी पानिपतावर धारातीर्थी पडली. पानिपतच्या पूर्वेकडील प्रत्यक्ष रणांगण आता “काला आम” नावाने ओळखले जाते. मराठ्यांच्या रक्ताने तिथले आम्रवृक्ष काळे पडले म्हणून “काला आम” हे नाव. १९९२ मध्ये तिथे स्मारक उभारण्यात आले. कर्नालचे सनदी अधिकारी वीरेंद्रसिंह वर्मा यांनी रोड समाजाचे मूळ शोधायला सुरुवात केली. शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. वसंतराव मोरे यांनी त्यांना मदत केली व रोड समाजाची नवी ओळख समोर आली. नंतर हरियाणा केडरचे मराठी आयएएस अधिकारी अजित जोशी यांच्या पुढाकाराने पानिपत महोत्सव भरवला जाऊ लागला. महाराष्ट्रातील मान्यवर राजकीय नेत्यांनी त्याला हजेरी लावली.



सोळा वर्षांपूर्वी, २००५ च्या नोव्हेंबरमध्ये वीरेंद्रसिंह वर्मा व सहकाऱ्यांनी कर्नाल येथे मराठा मीलन समारंभ आयोजित केला होता. महाराष्ट्रातील विविध संघटनांना निमंत्रित करण्यात आले होते.  त्यानंतर आठवडाभर खेड्यापाड्यात फिरताना प्रस्तुत लेखकाला मिळालेली रोड मराठ्यांची माहिती अक्षरश: रोमांचित करणारी होती. एखाद्या लढवय्या समाजाला रणांगणावर पराभवाचा, अपमानाचा सामना करावा लागल्यानंतर काय वेदना झाल्या असतील व आपल्या मुलुखापासून दूर अडीचशे वर्षे तो समूह कसा जगला व विस्तारला असेल, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी होती.



असे सांगण्यात येते की, पानिपतच्या युद्धातून वाचलेल्या मराठा सैनिकांनी जीव वाचविण्यासाठी लगतच्या पळसांच्या जंगलात आश्रय घेतला. ‘बचे हुए मराठा सैनिक बहुत दिन ढाक के जंगलों मे छिपे रहे’, हे जाणकारांचे शब्द. युद्ध जिंकल्यानंतर हजारो मराठा युद्धकैद्यांना सोबत घेऊन अब्दाली अफगाणिस्तानाकडे निघून गेला. ते कैदी वाटेत त्याने बलुचिस्तानातील डेरा बुग्गती याला भेट दिले. त्यामुळेच बलुचींमधील अनेकजण स्वत:ला मराठ्यांचे वंशज मानतात. इकडे यमुनेच्या खोऱ्यात लपलेले मराठा सैनिक हळूहळू खेड्यापाड्यात स्थायिक होऊ लागले. स्थानिक व क्षत्रिय आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी राजपूत राजा रोड यांचे नाव वापरले. आख्यायिका अशी की, तेराव्या शतकात कुतबुद्दीन अहमद याचा सामना करण्याची ताकद नाही हे ओळखल्यानंतर स्वत:च्या मुलीची डोली कुतबुद्दीनकडे पाठविण्याऐवजी स्वाभिमानी राजा रोड रक्षाबंधनाच्या दिवशी राजगादी सोडून दक्षिणेकडे निघून गेला. मराठी मुलुखात आलेल्या राजपुतांपैकी ते एक असे मानले जाते. याच कारणाने रोड मराठा रक्षाबंधनाचा सण साजरा करीत नाहीत. पानिपत युद्धातून वाचलेल्यांना जवळपास दोनशे चाळीस वर्षे ही ओळख कामी आली. वर्मा व मोरे यांच्या संशोधनानंतर रोड मराठा अशी नवी ओळख त्यांना मिळाली.

रोड मराठा हा महाराष्ट्रातील सैनिकी समाजांप्रमाणेच मुख्यत्वे हातात सहा महिने नांगर व उरलेले सहा महिने तलवार धरणारा समाज. हरियाणातील सोनिपत, पानिपत, कर्नाल, कुरूक्षेत्र, कैथल, जिंद, फतेहबाद या जिल्ह्यांमध्ये हा समाज अधिक आहे व शेती, पशुपालन, दूध उत्पादन हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहेत. हा बासमती तांदळाचा टापू. बासमती पिकविणारे ते रोड किंवा त्रावडी असे मानले जाते. त्याला बाराव्या शतकाच्या अखेरीस पृथ्वीराज चव्हाण व मोहंमद घोरी यांच्यातील तराईन लढाईचा संदर्भ आहे. हरयाणात रोड मराठा समाज असलेली गावे ३२५ व लोकसंख्या साडेआठ लाख. उत्तराखंडमध्ये १२ व उत्तर प्रदेशात ४५ गावांमध्येही हा समाज आहे. शेतीसोबतच या समाजाने मराठी संस्कृतीच्या खाणाखुणाही जीवापाड जपल्या. थोडा हरियानवी अपभ्रंश झाला असला तरी महाराष्ट्रात आढळणारी बहुतेक आडनावे रोड मराठ्यांमध्ये आहेत. घराची रचना अन्य समाजांपेक्षा वेगळी, घरापुढे अंगण व त्यापुढे मुख्य दरवाजा अशी. घरातल्या देव्हाऱ्यावर खंडोबाचा टाक हे खास वैशिष्ट्य. शिंक आली तर छत्रपती की जय म्हणतात. अनेक मराठी शब्द वापरात आहेत. पुरणपोळी अत्यंत प्रिय. सामूहिक पंगतीला भंडारा म्हणतात. विवाह पद्धतीमधील साटेलोटे म्हणजे बहीण व भावाने आपल्या मुली एकमेकांकडे देण्याची महाराष्ट्रीयन पद्धत हरयाणात फक्त रोड मराठ्यांमध्ये आहे. म्हणजे राेड मराठ्यांचे महाराष्ट्राशी नाते आहेच. महत्त्वाचे म्हणजे या छोट्या समाजाकडून प्रेरणा घेण्यासारखे बरेच काही आहे.
 

Web Title: what is road maratha community to which neeraj chopra belongs to

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.