खरी परीक्षा आता अल्प संख्याबळाच्या विरोधी पक्षांची, महाविकास आघाडीचे काय होईल?

By नंदकिशोर पाटील | Updated: December 9, 2024 19:49 IST2024-12-09T19:47:31+5:302024-12-09T19:49:42+5:30

शेकाप आणि डाव्या पक्षांचे मूठभर आमदार सरकारला दमवायचे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे जमेल का ते बघू….

What will happen to Maharashtra's oppositions Mahavikas Aghadi? | खरी परीक्षा आता अल्प संख्याबळाच्या विरोधी पक्षांची, महाविकास आघाडीचे काय होईल?

खरी परीक्षा आता अल्प संख्याबळाच्या विरोधी पक्षांची, महाविकास आघाडीचे काय होईल?

- नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले आहे. भाजपने तर १३२ जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. २०१४ आणि २०१९ च्या मोदी लाटेत देखील एवढे यश मिळाले नव्हते. सर्वार्थाने सक्षम असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांना काही कमी पडू देणार नाहीत. या सरकारला पुढील पाच वर्ष कसलाही धोका नाही. अजितदादा, एकनाथ शिंदे सत्तेबाहेर पडणार नाहीत. तेव्हा खरी परीक्षा आता विरोधी पक्षांची असेल. २३८ विरुद्ध ५० असे सभागृहातील चित्र असेल. सरकारला धारेवर धरणे संख्याबळावर शक्य नाही, तेव्हा युक्ती, सजगता आणि अभ्यास यावरच ते शक्य आहे. १९५२ ते ७८ पर्यंत अशीच परस्थिती असायची. मात्र शेकाप आणि डाव्या पक्षांचे मूठभर आमदार सरकारला दमवायचे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे जमेल का ते बघू….

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता महाविकास आघाडीचे काय होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या दोन पक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीत एकमेकांवर आगपाखड करण्यात आली. काँग्रेस पक्षाने अट्टाहासाने शंभरावर जागा लढविल्या. मात्र, पन्नास टक्के जागांवरही त्यांना यश मिळाले नाही. शिवाय, काही मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मदत केली, असा आरोप उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला, तर असाच आरोप काँग्रेसकडूनदेखील करण्यात आला. यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात, असा सूर दोन्ही पक्षातून निघाला. कोणत्याही निवडणुकीतील विजयाचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ असते. मात्र, पराभवाचे खापर नेहमीच दुसऱ्याच्या माथी मारले जाते. मग ती निवडणूक आघाडीकडून लढवली असो की स्वतंत्रपणे. निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेसमध्ये घमासान होईल, असा अंदाज होता. मात्र, पक्षाच्या राज्य नेतृत्त्वाविषयी उघडपणे कोणी नाराजी व्यक्त केली नसली तरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केलेल्या चुकीच्या तिकीट वाटपाबाबत कुजबुज सुरू झाली आहे. विशेषत: विदर्भ आणि मुंबईतील उमेदवारांची निवड योग्य नव्हती, असा सूर आहे. औरंगाबाद पूर्व आणि कोल्हापूर येथील उमेदवार बदलण्यावरून या पक्षाची किती शोभा झाली, हे सर्वांनीच पाहिले आहे. लोकसभेला तीन खासदार निवडून देणाऱ्या मराठवाड्यात काँग्रेस पक्षाचे अमित देशमुख हे एकमेव उमेदवार (तेही काठावर) निवडून आले आहेत. २०१९ साली आठ आमदार होते. धुळे, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि सोलापूर या जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसचा एकही आमदार नाही. राज्यात असे १३ जिल्हे आहेत!

या निवडणुकीत सर्वाधिक मेहनत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली. वय आणि दुर्धर आजाराची पर्वा न करता त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. अवघ्या पंधरा दिवसात सत्तरहून अधिक सभा घेतल्या. मात्र, तरीही त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ दहा जागा मिळाल्या. आठ खासदार आणि दहा आमदार! शरद पवारांना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगले यश मिळेल, असे अंदाज वर्तविण्यात येत होते. परंतु, केवळ सोलापूर आणि सांगली, जिल्ह्याने त्यांना चांगली साथ दिली. कोल्हापूरसह १५ जिल्ह्यात पवारांच्या पक्षाचा एकही आमदार नाही. विधानसभेच्या या निकालात येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे भवितव्य दडले आहे. महाविकास आघाडीने एकसंघपणे या निवडणुकांना सामोरे जायचे आहे की, स्वतंत्रपणे, याचा निर्णय घेण्यासाठी या निकालाचे विश्लेषण महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या रविवारी (१ डिसेंबर) याच सदरात काँग्रेस पक्षाच्या विधानसभेतील पराभवाची चिकित्सा करताना नेते कसे गाफील राहिले, असा मुद्दा मांडला होता. यावर काही ज्येष्ठ काँग्रेसजनांचे म्हणणे असे की, सत्ताधारी पक्षांकडून ‘वोट जिहाद’, ‘बटेंगे तो कटेंगे’ यासारखे नारे देऊन धर्माचे मोठे वादळ उभे करण्यात आले. प्रचाराच्या ऐन टप्प्यावर भाजपने तयार केलेल्या या हिंदुत्वाच्या ‘नरेटिव’ला प्रतिवाद कसा करायचा, या संभ्रमात आम्ही होतो. ‘बटेंगे तो कटेंगे’ला आम्ही ‘एक है तो सेफ है!’ असे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा परिणाम झाला नाही.

विधानसभेला मिळालेला हा धडा लक्षात घेऊन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिला आहे. येत्या महापालिका निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर घरोघरी हिंदुत्व पोहोचवा, असे फर्मान त्यांनी शिवसैनिकांना सोडले आहे. यापुढे उद्धव ठाकरे याच मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता दिसते. कदाचित मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याखेरीज त्यांना दुसरा पर्याय दिसत नसावा. विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांचे वीस उमेदवार निवडून आले आहेत. पैकी दहा जण मुंबईतील आहेत. आजवर मराठी माणूस आणि हिंदुत्व याच मुद्द्यांवर त्यांनी मुंबई मनपावर भगवा फडकावला आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले, परंतु तरीही मुंबईकरांनी शिवसेनेच्याच हाती मनपाची सूत्रे दिली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेनेत फूट पडली आहे. शिवाय, राज्याची सत्ता भाजपच्या हाती आली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत आहेत.

ठाकरे यांनी जर हिंदुत्वाचा जोरकसपणे पुरस्कार केला तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहील, हाही प्रश्न आहे. कारण, काँग्रेस आणि पवार हे पुरोगामी विचारांची पाठराखण करणारे आहेत. महाविकास आघाडीत आल्यापासून ठाकरे यांनी आपली कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा थोडी मवाळ केली आहे. याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. कधी नव्हे ते अल्पसंख्याकांची मते ठाकरे यांच्या उमेदवारांना मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून ते मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या मूडमध्ये दिसतात. परंतु, लगेच ते महाविकास आघाडीतून बाहेर पडतील, ही शक्यता कमी दिसते. कारण २५ जिल्ह्यात ठाकरे यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या तरी महापौर अथवा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडताना मित्रपक्षांची मदत लागते.

Web Title: What will happen to Maharashtra's oppositions Mahavikas Aghadi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.