कुठून येते ही टोकाची क्रूरता ?

By किरण अग्रवाल | Published: March 3, 2022 10:44 AM2022-03-03T10:44:51+5:302022-03-03T10:45:32+5:30

Where does this extreme cruelty come from ? : सहचराचा जीव घेण्यापर्यंत मजल गाठली जात असेल, तर त्यातून समाज मनावर ओरखडा ओढला जाणे टाळता येऊ नये.

Where does this extreme cruelty come from? | कुठून येते ही टोकाची क्रूरता ?

कुठून येते ही टोकाची क्रूरता ?

Next

- किरण अग्रवाल

म्हातारपणात आधाराची काठी शोधण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा सहचारिणीइतकी हक्काची व विश्वासाची दुसरी मजबूत काठी आढळत नाही. आयुष्यातील सुख-दुःखाची अनेकविध स्थित्यंतरे जिच्या सोबतीने अनुभवलेली असतात, प्रत्येक वेळी सावलीसारखी जी साथ-संगत करीत आलेली असते; ती सहचारिणीच वार्धक्याच्या टप्प्यावर मैत्रिणीची भूमिका निभावते, असे हे अतूट, अभिन्न असे नाते आहे. नाती कोणतीही असो, ती जपल्यानेच घट्ट होतात हे देखील खरे; परंतु पती-पत्नीमधील नाते आपसूकच जपले जाते, कारण अनेक वादळवाऱ्यात त्याची परीक्षा देऊन झालेली असते. काळ लोटतो तसा एक वेगळाच दृढतेचा भावबंद या नात्यात आकारास येतो. परस्परांची काळजी, अलवार जपणूक यात असते, तशी त्यासाठी स्वतःच्या अपत्यांशीही लढून जाण्याची ताकद आलेलीही बघावयास मिळते. त्यामुळे या टप्प्यातच जेव्हा उभयतांमधील मतभेदाच्या भिंती जाडजूड झालेल्या व प्रसंगी काही घटना हिंसाचारापर्यंत पोहोचलेल्या दिसतात तेव्हा नेमके कुठे चुकते आहे, असा प्रश्न संवेदनशील मनाला कुरतडल्याशिवाय राहत नाही.

 

मनुष्याचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करणे हे तसे अवघड काम आहे, कारण व्यक्ती तितके विचार व भिन्नता त्यात असते. संस्कारांच्या सोबतीने परिस्थितीसापेक्षतेचा मुद्दाही यात दुर्लक्षिता येणारा नसतो. शेवटी ज्या वातावरणात मनुष्य घडतो, त्याचा परिणाम टाळता येत नसतोच; पण काहीही असले तरी घरातील, कुटुंबातील पती-पत्नीमधील परस्परांबद्दलचा आदर व या नात्यातील जपणुकीत अपवाद वगळता कसली बाधा येत नसते. आयुष्यातील मोठा टप्पा ओलांडून झाल्यावर उत्तरार्धात तर हे नाते अधिक गहिरे झालेलेच आढळून येते; परंतु यात जो अपवाद असतो तो टोकाची क्रूरता गाठतो तेव्हा एकूणच समाज जीवनावर त्याचा परिणाम होऊन जाणे स्वाभाविक ठरते. समाजशास्त्रीय व मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याकडे बघितले जाणे व त्यावर मंथन होणे म्हणूनच गरजेचे ठरते. साधा स्वयंपाक उशिरा केला म्हणून हिंगोली जिल्ह्यातील सवना येथे ८० वर्षांच्या कुंडलिक शिवराम नायक नामक ज्येष्ठ नागरिकाने आपल्या ७८ वर्षीय वयोवृद्ध पत्नीचे हातपाय बांधून तिला रॉकेल ओतून जिवंत जाळल्याच्या प्रकाराकडे याचसंदर्भाने बघता यावे.

 

तरुण रक्त गरम डोक्याचे असते, असे नेहमी म्हटले जाते, त्याचप्रमाणे वय वाढते तशी अक्कल वाढते व समजूतदारपणा वाढीस लागतो, असेही म्हटले जाते; मनुष्य अनुभवाने शहाणा होतो तसा ज्येष्ठत्वाने समजूतदारही होतो म्हणतात; पण प्रत्येक बाबबीत अपवाद असतो, तसे याही बाबतीत असणे स्वाभाविक आहे. वाढलेल्या वयात मतभिन्नता नसते असे नाही; पण ती टोकाची असेल व संतापाची पातळीही क्रूरता गाठत असेल तर ज्येष्ठत्वातील समजूतदारी व सहनशीलतेचा प्रश्न उपस्थित व्हावा. कौटुंबिक तक्रारींच्या निवारणासाठी पोलीस स्टेशन अंतर्गत स्थापित भरोसा सेलकडे तरुण जोडप्यांसोबतच ज्येष्ठ दाम्पत्यांमधील कुरबुरींच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे पाहता हा प्रश्न अधोरेखित होणारा ठरला आहे. यातही एखादवेळी प्रारंभापासूनच मतभेद असू शकतात; पण अख्खे आयुष्य निघून गेल्यावर शेवटच्या चरणात ते असह्य होऊन सहचराचा जीव घेण्यापर्यंत मजल गाठली जात असेल, तर त्यातून समाज मनावर ओरखडा ओढला जाणे टाळता येऊ नये.

 

महत्त्वाचे म्हणजे, प्रारंभी म्हटल्याप्रमाणे कितीही सुसंपन्नता व सधनता असली तरी वार्धक्यातील काठी म्हणून सहचराकडेच आशेने पाहिले जाते. आपल्याकडचे सोडा; पण चीनमध्येही वृद्धांच्या वाढत्या संख्येने व त्यांच्या एकटेपणामुळे तेथील सरकार चिंताग्रस्त आहे. एकटेपणाला सामोरे जात असलेल्या ज्येष्ठांसाठी तेथे टीव्हीवर त्यांच्या डेटिंगसाठीचे खास शो चालवले जातात व त्यातून त्यांना प्रेम व पुनर्विवाहाची संधी मिळते, आधार लाभतो. अर्थात इकडे असो की तिकडे, एकटेपण वाट्यास आलेल्यासच त्याचे दुःख ठाऊक असते. त्या एकटेपणाच्या वेदनांवर अन्य कुणी कितीही फुंकर मारली तरी त्याला सहचराची सर नसते. म्हणूनच अशा साऱ्या पार्श्वभूमीवर एखादा ८० वर्षांचा ज्येष्ठ जेव्हा त्याच्या सहचराला साध्या, क्षुल्लक कारणातून जाळून संपवतो, तेव्हा एवढी क्रूरता येते कुठून, असा प्रश्न निर्माण झाल्याखेरीज राहत नाही.

Web Title: Where does this extreme cruelty come from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.