चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादम्यान भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:28 IST2025-02-27T17:08:48+5:302025-02-27T17:28:24+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान, भारत-बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचा दावा

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादम्यान भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद? जाणून घ्या सत्य
Created By: BOOM
Translated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check: चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान २० फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी भिडल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा असल्याचे बूमच्या तपासात आढळून आला आहे. व्हायरल व्हिडिओ अंडर-१९ विश्वचषक २०२० चा आहे. अंतिम सामन्यात बांगलादेशच्या विजयानंतर खेळाडूंमधील जोरदार वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि युएईद्वारे केले गेलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. भारताने हा सामना सहा विकेटने जिंकला.
एका फेसबुक यूजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये भारत आणि बांगलादेश संघाचे खेळाडू एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. खेळाडूंमधील हाणामारीचा हा व्हिडिओ २० फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यातील असल्याचा दावा या व्हायरल व्हिडीओसोबत केला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरही व्हायरल झाला आहे.
फॅक्ट चेक
व्हायरल व्हिडिओ तपासण्यासाठी, व्हिडिओच्या फ्रेफला गुगलवर रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केले. या सर्चदरम्यान व्हायरल व्हिडिओशी संबंधित बातम्या सापडल्या.
माध्यमांच्या वृत्तानुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कप २०२० च्या अंतिम सामन्याचा आहे.
१० फेब्रुवारी २०२० च्या नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, ९ फेब्रुवारी रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने भारताचा ३ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. व्हायरल व्हिडिओ देखील नवभारत टाइम्सच्या बातमीत एम्बेड करण्यात आला आहे.
वृत्तानुसार, बांगलादेशच्या संघाने विजयी धावा काढताच बांगलादेशचे खेळाडू खूप उत्साहित झाले आणि मैदानावर धावत सुटले.
अमर उजालाच्या बातमीनुसार, विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंशी गैरवर्तन केले. बांगलादेशच्या एका खेळाडूने भारतीय संघाच्या खेळाडूसमोर उभं राहून प्रक्षोभक वक्तव्य करण्यास सुरुवात केली. वातावरण तापत असल्याचे पाहून अंपायरने हस्तक्षेप केला.
यूट्यूबवर यासंदर्भातील कीवर्ड सर्च केले असता ९ फेब्रुवारी २०२० रोजी डी-क्रिकेट चॅनेलवर अपलोड केलेल्या खेळाडूंमधील भांडणाच्या घटनेचा हा व्हिडिओ सापडला.
या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बांगलादेशच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार अकबर अलीनेही खेद व्यक्त केला होता. "आमचे काही गोलंदाज भावूक आणि अधिकच उत्साहित झाले होते. सामन्यानंतर जे घडले ते दुर्दैवी आहे, असे घडायला नको होते," असं त्याने म्हटलं.
या संपूर्ण घटनेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कारवाई केली. हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, आयसीसीने ५ खेळाडूंना (२ भारतीय आणि ३ बांगलादेशी) आचारसंहितेच्या तिसऱ्या स्तराचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारले आणि त्यांच्या खात्यांमध्ये डी-मेरिट गुण जोडले.
यासंदर्भात सध्या चालू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे कव्हरेज करत असलेल्या क्रिकेट पत्रकार विमल कुमार यांच्याशी संवाद साधला. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यात खेळाडूंमध्ये वाद झाल्याची कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले.
(सदर फॅक्ट चेक BOOM या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)