SURVEY : लग्नाबाबत भारतीय तरुणाईची काय आहे पसंती !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 07:41 AM2017-02-28T07:41:06+5:302017-02-28T13:11:06+5:30
लग्नाअगोदर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली असते. लग्न करण्याअगोदर विविध प्रकारचे विचार मनात घोंगवत असतात.
‘शादी के लड्डू, जो खाए पछताए, और जो न खाए ओ भी पछताए !’ असे म्हटले जाते. लग्नाअगोदर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली असते. लग्न करण्याअगोदर विविध प्रकारचे विचार मनात घोंगवत असतात. चला मग भारतीय तरुणाई लग्नाबाबत काय विचार करते, याचा खुलासा एका सर्वेक्षणात झाला असून याबाबत आज जाणून घेऊया.
अविवाहित तरुण-तरुणींचे लग्नाबाबतचे विचार जाणून घेण्यासाठी एका वेबसाईटने नुकताच एक सर्व्हे केला. त्यात लग्नामुळे आयुष्यात भावनात्मक आणि आर्थिक स्थैर्य येईल, असं बहुतांश तरुणाईला वाटतं. या आॅनलाईन सर्वेक्षणात २५ ते ३२ वर्षांदरम्यानच्या १४,७०० जणांनी सहभाग घेतला होता. यात ४७ टक्के तरुणी आणि ५३ टक्के तरुणांचा सहभाग होता.
त्यात सुमारे २०.५ टक्के तरुण आणि २३.१ टक्के तरुणींनी सांगितलं की, ‘ते लग्नासाठी आणखी वाट पाहू शकत नाहीत.’ तर १२.२ टक्के तरुण आणि १०.३ टक्के तरुण म्हणाले की, ‘आमचा जन्म लग्नासाठी झालेला नाही आणि आम्हाला लग्नात रस नाही.’ याशिवाय १८.२ टक्के तरुण आणि १३.२ टक्के तरुणी द्विधा मनस्थितीत आहेत. लग्न करण्याबाबत त्यांचा ठोस निर्णय झालेला नाही.
लग्नासाठी आमचा जन्म झालेला नाही, असं सांगणाऱ्या तरुण आणि तरुणींना याचं कारण विचारलं असता. ३५.१टक्के तरुण आणि २७.२ टक्के मुलींनी सांगितलं की, ‘त्यांना जबाबदारी स्वीकारायची नाही.’ तर ‘आमचा लग्नावर विश्वास नाही,’ असं २३.२ टक्के मुलं आणि २१.३ टक्के मुलींनी सांगितलं.
सुमारे २६.३ टक्के मुलं आणि २०.३ तरुणी म्हणतात की, ‘दीर्घ काळासाठी संसारात अडकून राहायचं नाही.’ तर ‘लग्नानंतर आयुष्यात होणाºया बदलाची भीती वाटते,’ असं १५.४ टक्के पुरुष आणि ३१.२ टक्के महिलांनी सांगितलं.
लग्नानंतरचा सर्वात मोठा फायदा काय?, असं विचारलं असता २५.७ टक्के पुरुष आणि ३४.७ टक्के महिलांनी त्याचं उत्तर भावनात्मक आधार हे दिलं. आयुष्यभराचा साथीदार मिळणं हा लग्नाचा सर्वात मोठा फायदा असल्याचं ३३.७ टक्के पुरुष आणि ४५.२ टक्के महिलांनी सांगितलं.