FIFA Football World Cup 2018 : कोठे गेले भारतीयांचे फुटबॉलप्रेम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:16 AM2018-07-07T01:16:41+5:302018-07-07T01:16:57+5:30

विश्वचषकामध्ये तुम्ही का नाही? हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धेपूर्वी मोरोक्को, इजिप्त, मेक्सिकोसारख्या देशांतील पाठिराख्यांनी कैकवेळा विचारला. अतिशय वेदना त्यामुळे झाल्या. शतकभरापेक्षा अधिक फुटबॉल इतिहास, करोडोंचा देश, तसा तेवढा गरीबही नाही, पण आम्ही या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरत नाही. का?

FIFA Football World Cup 2018: Where has the Indian football's football? | FIFA Football World Cup 2018 : कोठे गेले भारतीयांचे फुटबॉलप्रेम?

FIFA Football World Cup 2018 : कोठे गेले भारतीयांचे फुटबॉलप्रेम?

googlenewsNext

- रणजीत दळवी

विश्वचषकामध्ये तुम्ही का नाही? हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धेपूर्वी मोरोक्को, इजिप्त, मेक्सिकोसारख्या देशांतील पाठिराख्यांनी कैकवेळा विचारला. अतिशय वेदना त्यामुळे झाल्या. शतकभरापेक्षा अधिक फुटबॉल इतिहास, करोडोंचा देश, तसा तेवढा गरीबही नाही, पण आम्ही या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरत नाही. का?
नुकताच भारतीय संघाला एक अतिशय नाउमेद करणारा मोठा धक्का बसला. त्यांच्या आशियाई खेळांतील सहभागाला लाल बत्ती दाखविण्यात आली. कारण काय, तर म्हणे तुम्ही गेल्या वेळी अव्वल आठमध्ये नव्हता. आता हा ‘अव्वल’ मापदंड ठरविला, ‘अव्वल’ पात्रतेच्या भारतीय आॅलिम्पिक संघटनेने. ज्या संघटनेमध्ये असतात, खेळाच्या दृष्टीने अपात्र व अडाणी असामी, केवळ स्वहित जोपासणारे! खरे तर बऱ्याच वर्षांनी आपला संघ या वेळी आशिया चषकसाठी पात्र ठरला होता. आपण जागतिक क्रमवारीमध्ये १७१ वरून ९६पर्यंत चढलो होतो. तेही आपल्याला ती सुधारण्यासाठी उच्च दर्जाच्या संघांशी खेळण्याची संधी प्राप्त न होता, पण त्यांच्या मार्गात शेवटी अडथळा हा आलाच!
अशा स्थितीत सरकार व आॅलिम्पिक संघटनेने थोडा मनाचा मोठेपणा का नाही दाखविला? त्यांना आपल्या खर्चाने हवे तर जा म्हणायचे. आणि हो, गेल्या वर्षी आपण १७ वर्षांखालील विश्वचषक भरविला तो मग कशासाठी? उत्तेजन देण्यासाठीच ना? मात्र, शल्य एका गोष्टीचे बोचते, देशात फुटबॉलवर एवढे लोक प्रेम करतात, पण जे झाले, त्यावर कोठेही कोणीही राग व्यक्त केल्याचे जोरदार निषेध केल्याचे, मोर्चे काढल्याचे दिसले नाही.
म्हणून एरवी जोरजोरात वाद घालणाºया आपल्या फुटबॉलप्रेमींना विचारावेसे वाटते, आता का बरे थंड पडलात? की विश्वचषकाच्या ज्वरामुळे तुम्ही भ्रमिष्ट झालात? कोलकाता, मुंबई, बंगळुरू, दिल्ली, किंवा मग उत्तर - पूर्व, केरळ, गोवा, पंजाबमध्ये मेणबत्त्या घेऊनही बाहेर पडणे तुम्हाला शक्य होऊ नये? हल्ली मेणबत्त्या हाती घेतल्या की लक्ष वेधता येते!
एकूणच खेळाची दुरवस्था का झाली हे दिसते. गेली दोन दशके या खेळाच्या संघटनेच्या अग्रस्थानी दोन बडे राजकारणी होते, सरकार दरबारी बºयापैकी वजनही असणारे, पण झाले उलट. संघटनेच्या तिजोरीत जमा काही करोडोंची रक्कम यांच्या उठण्या-बसण्यावर खर्च झाल्यावर, विकासाचे काय व्हावे? आपले वजन वापरून क्रिकेटप्रमाणे मूलभूत सुविधा निर्माण करतील, अशी किमान अपेक्षा त्यांच्याकडून होती. त्यामुळे फुटबॉलची प्रतिमाही उंचावली असती.
आम्ही १९८३ची विश्वचषक स्पर्धा जिंकेपर्यंत क्रिकेट कुठे होते? त्याच वेळी साध्या क्लब स्पर्धांमध्ये हजारो-ेलाखो फुटबॉलप्रेमी गर्दी करत असत. कोलकात्यात तेव्हा मोहन बागान - ईस्ट बंगाल यांच्यातली स्थानिक साखळी लढत इडन गार्डनवर खेळवावी लागे. उपस्थिती किती म्हणाल... एक लाख!
१९९०च्या दशकांमध्ये मोठ्या थाटामाटात राष्ट्रीय साखळी सुरू झाली व २०१३ मध्ये इंडियन सुपर लीग (आयएसएल) ही पैसेवाल्यांचा आश्रय लाभलेली स्पर्धाही मोठ्या आशेने सुरू करण्यात आली. खेळामध्ये मुबलक पैसा येईल व स्थिती हळूहळू सुधारेल, अशी चिन्हे दिसत होती, पण झाले असे की शेकडाभर भारतीय खेळाडूंना आपले आयुष्य अवश्य सुधारता आले. मिळतात हल्ली कोटी - दीड कोटी! पण सुमार विदेशी खेळाडूंसह, काही निवृत्त झालेल्या सिताºयांचेही फावले. अगदी चाळीशीतले खेळाडू ‘झोली भरके’ कमावून गेले. भारतीय फुटबॉलच्या उत्कर्षासाठी, उत्थानासाठी आखलेली योजना तशी तकलादू निघाली. वेळ तशी केव्हाच निघून जात नसते. अजूनही एकमेकाला दोष न देता युद्धपातळीवर प्रयत्न झाले, तर ते हितकारी ठरावे!

Web Title: FIFA Football World Cup 2018: Where has the Indian football's football?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.