रोहयोच्या कामांचे ७.७९ कोटी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:47 PM2018-03-04T23:47:57+5:302018-03-04T23:47:57+5:30

7.79 crore pending work of Roho | रोहयोच्या कामांचे ७.७९ कोटी प्रलंबित

रोहयोच्या कामांचे ७.७९ कोटी प्रलंबित

Next
ठळक मुद्देउद्दिष्टपूर्तीत अडचणी : गडचिरोलीतील रोहयो कामांना ब्रेक

दिलीप दहेलकर ।
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये विविध कामे हाती घेण्यात आली होती. काही कामे पूर्ण झाली असून बरीच कामे सुरू आहेत. मात्र नरेगाच्या कुशल व अकुशल कामाचा निधी शासनाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने सुरू असलेल्या कामांवर परिणाम झाला आहे. गडचिरोलीतील कुशल व अकुशल कामांचे मिळून केंद्र शासनाकडे ७ कोटी ७९ लाख ८२ हजार रूपये प्रलंबित आहे.
जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागामार्फत रोहयोच्या कामांचा वार्षिक आराखडा तयार करून त्यास मंजुरी प्रदान केली जाते. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींमार्फत कामे सुरू केली जातात. रोहयोच्या कायद्यान्वये ५० टक्के कामे यंत्रणास्तरावर व ५० टक्के कामे ग्रामपंचायत स्तरावर केली जातात. नरेगाच्या कामांचे संबंधित ग्रामपंचायत व प्रशासकीय विभागांना वार्षिक उद्दिष्टही दिले जाते. सदर उद्दिष्ट गाठण्यासाठी जि.प. यंत्रणेमार्फत कार्यशाळाही राबविल्या जातात. मात्र गेल्या चार महिन्यांपासून नरेगाच्या कुशल कामांचे ५ कोटी ६८ लाख रूपये केंद्र शासनाकडून मिळाले नाहीत. याशिवाय अकुशल कामांचे जवळपास पावणेदोन कोटी रूपये प्रलंबित आहेत. त्यामुळे नरेगाचे काम करणारे अधिकारी, कर्मचारी पुरते हतबल झाले आहेत.
निधीअभावी जिल्ह्याच्या अनेक भागातील नरेगाची कामे थांबली असल्याने शासनाने दिलेले कामाचे उद्दिष्ट कसे गाठावे, असा प्रश्न साऱ्यांच यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने नरेगाचा हा गंभीर प्रश्न तत्काळ मार्गी लावून ७ कोटी ७९ लाख ८२ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
पुरवठादारांकडून साहित्य पुरवठा बंद
रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर, शौचालय व इतर बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. बरीचशी कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत, मात्र निधीअभावी बिल प्रलंबित असल्याने पुरवठादारांनी सिमेंट, लोखंडी साहित्य, रेती, गिट्टी आदी ग्रामपंचायतींना पुरविण्यास नकार दिला आहे. परिणामी ग्रामसेवकांसह सारीच यंत्रणा आता रोहयोची कामे करण्यासाठी चालढकल करीत आहे. निधी प्रलंबित असल्याने शौचालय व गांडूळ खत निर्मितीच्या कामांवर परिणाम झाला आहे.
रोजगार घटणार
शेती मशागतीचे कामे नसल्याने हजारो नोंदणीकृत मजूर रिकामे आहेत. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात रोहयोच्या कामाची मागणी अनेक असते. त्यानंतर मे पासून तेंदू हंगाम सुरू झाल्यावर तिकडे वळतात. निधीसाठी विलंब झाल्यास रोजगार घटणार आहे.

Web Title: 7.79 crore pending work of Roho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.