८० पथदिव्यांचे बिल निघाले, खांबावर लागले ५८
By admin | Published: September 23, 2016 01:38 AM2016-09-23T01:38:41+5:302016-09-23T01:38:41+5:30
कासवी गट ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदीत लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे.
कासवी ग्रा.पं.तील प्रकार : बिघडलेल्या बंद लाईटवरही लाखो रूपयांची उधळण; चार लाईट ग्रा.पं.मध्ये पडून
जोगीसाखरा : कासवी गट ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदीत लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. बोगस बिल जोडून ग्रामसेवकांनी हा प्रकार केला असल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रा.पं. पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे.
कासवी गट ग्रामपंचायतीला चालू आर्थिक वर्षामध्ये १४ व्या वित्त आयोगातून १० लाख ६७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. १ लाख रूपयांपेक्षा अधिक किमतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा काढणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायतकडून निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच सचिव व सरपंच यांनी साहित्य खरेदी केले. गावातील विद्युत खांबांवर लावण्यासाठी ४ हजार ७९० रूपये प्रत्येकी प्रमाणे ३० वॅटचे ८० पथदिवे व ६०० रूपये प्रती पाईप प्रमाणे ८० पाईप अशी ४ लाख ३१ हजार २०० रूपयांचे साहित्य खरेदी केले. प्रत्यक्ष गावात ५४ खांबांवर पथदिवे लावण्यात आले व चार पथदिवे ग्रामपंचायत कार्यालयात ठेवून आहेत. या पथदिव्यांचा प्रकाश अत्यंत मंद असल्याचे ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पाईप व पथदिव्यासह ५ हजार ३९० रूपयाला प्रती पथदिवा पडल्याचे दर्शविण्यात आले आहे. जवळजवळ ३ लाख ५० हजार रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार यात झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. बरेचशे पथदिवे बंद असून त्यांच्यावरही लाखो रूपयांचा खर्च दुरूस्तीसाठी करण्यात आला, असे दिसून येत आहे.
या संदर्भात बोलताना कासवी ग्रा.पं.चे उपसरपंच प्रविण राहाटे म्हणाले की, ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला आम्ही कंटाळलो. त्यामुळे ग्रामविकास कार्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकाबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत चौकशी करून कार्यवाही होणे गरजेचे आहे. तर ग्रामपंचायतला पथदिवे पुरवठा करणारे कंत्राटदार हरिभाऊ सहारे म्हणाले, आम्ही बऱ्याच ग्रामपंचायतीला पथदिवे पुरविले. लाईट खराब निघाले. ३० वॅटच्या लाईटची किमत २ हजार ७५० आहे. सदर लाईट बदलून दिले जातील. (वार्ताहर)
ग्रामसेवक हे नेहमीच ग्रा.पं. कार्यालयात मासिक सभेला गैरहजर राहत होते. बाहेरची चमू ग्रा.पं.मध्ये आल्यास आम्ही माहिती देत होता. १४ व्या वित्त आयोगाच्या नियोजन त्यांनी काय केले, हे कळलेच नाही. कारण मासिक सभेमध्ये सदस्यांना कामाची किंवा निधीची तरतूद कशी करायची, कुठे योग्य करायचा यावर चर्चाही झाली नाही. ग्रामसेवकांने सर्व साहित्य आपल्या मर्जीने खरेद केले आहे.
- पुष्पलता तिवाडे, सरपंच, ग्रा.पं. कासवी
सरपंच ,सदस्यांनी सूचविलेले काम करण्यात आले. सचिवाच्या एकट्याच्या मताने काहीही होत नाही. पथदिवे व साहित्य घेताना निविदा काढली नाही. कारण जिल्ह्यात ई-टेंडरींग करणे सुट आहे. तसेच लाईट किती वॅटचे आहेत. रेकार्ड पाहून सांगावे लागेल. १४ व्या आयोगाच्या निधीमध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- भास्कर जंजालकर, ग्रामसेवक, गट ग्रामपंचायत कासवी