लगाम आरोग्य केंद्रात पाण्याचा ठणठणाट
By Admin | Published: September 24, 2016 03:05 AM2016-09-24T03:05:48+5:302016-09-24T03:05:48+5:30
पाणी पुरवठा विभाग व वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यातील लगाम-बोरी येथील पाणी पुरवठा बंद असून
रूग्णवाहिकेतून आणतात पाणी : लगामबोरीची पाणी पुरवठा योजना १५ दिवसांपासून बंद
मुलचेरा : पाणी पुरवठा विभाग व वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यातील लगाम-बोरी येथील पाणी पुरवठा बंद असून याचा फटका प्राथमिक आरोग्य केंद्रालाही बसला आहे. कर्मचाऱ्यांना व रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकमेव हातपंप असून तो सुध्दा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मागील दोन वर्षांपासून बंद आहे. हातपंप पाडून सबमर्शीबल पंप बसविण्यात आला. मात्र हातपंपात आतमध्ये जुनी मोटार गेल्याने हातपंप सुरू करता आला नाही. लगामबोरीचा पाणी पुरवठा १५ दिवसांपासून बंद असल्याने रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. सध्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची गर्दी वाढलेली आहे. दोन किमी अंतरावरील शाळेतून आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेने पाणी आणावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाणी सोडण्याची वेळ बदला
पाणी पुरवठा विभागातर्फे सकाळी ७.३० ते ८ वाजतादरम्यान पाणी सोडण्यात येते. मात्र सकाळी शालेय विद्यार्थी, कर्मचारी या सर्वांना सकाळी ७ वाजता तयारी करावी लागते. नळ उशीरा सोडत असल्यामुळे विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी धावपळ होते. सध्याची वेळ बदलवून सकाळी ६.३० वाजता पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
महावितरण व पाणी पुरवठा विभागात दोषावरून कलगीतुरा
वीज वितरण कंपनीने लावलेल्या जनित्रामध्ये बिघाड असताना सुध्दा कंपनीचे कनिष्ट अभियंता मानायला तयार नव्हते. पाणी पुरवठा विभागाच्या संयंत्रामध्येच दोष आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून मशीन चेक करणे सुरू आहे. विजेचा दाब कमी असल्यामुळे मोटारपंप बंद आहेत. कमी विजेच्या दाबामुळे मशीनमधील काही पार्ट जळाले असे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता जी. डी. बारापात्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बिघाड नेमका कुठे आहे, हे शोधण्यात पाच दिवस गेले. ब्रह्मपुरीवरून मिस्त्री बोलविण्यात आले, असे ते म्हणाले. ईएलसी जळाले ते चंद्रपूरवरून आणण्यासाठी तीन दिवस लागेल. दुरूस्तीचे काम सुरू असताना पाणी पुरवठा विभागाचे एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जलशुध्दीकरण केंद्राला भेट दिलेली नाही. कधी विजेचा कमी दाब तर खंडीत वीज पुरवठा तर कधी पाईपलाईन फुटणे याबाबीमुळे लगामबोरी येथील पाणी पुरवठा दीड महिन्यांपासून अधूनमधून बंद राहत आहे. गेली १५ दिवस पाणी पुरवठा ठप्प असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोष निर्माण झाला आहे. पाणी पुरवठा विभागाचा कुणीही वाली राहिला नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा विभागाने तत्काळ बिघाड दुरूस्त न केल्यास पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.