बायोमॅट्रीक प्रणाली ‘फेल’
By admin | Published: July 31, 2014 12:00 AM2014-07-31T00:00:42+5:302014-07-31T00:00:42+5:30
बोगस विद्यार्थी दाखवून वसतिगृहाच्या माध्यमातून शासनाकडून दरवर्षी लाखो रूपयाचे अनुदान लाटण्याचा प्रकार शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील
वर्षभरापासून : दुर्गम भागातील १५ वसतिगृहातील मशीन बंद
गडचिरोली : बोगस विद्यार्थी दाखवून वसतिगृहाच्या माध्यमातून शासनाकडून दरवर्षी लाखो रूपयाचे अनुदान लाटण्याचा प्रकार शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये बायोमॅट्रीक प्रणाली कार्यान्वित केली. मात्र जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या खासगी संस्थांच्या तब्बल १५ वसतिगृहातील बायोमॅट्रीक मशीन वर्षभरापासून बंद असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
जि.प.च्या समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त जिल्हाभरात खासगी संस्थांचे एकूण ५४ मुलामुलींचे वसतिगृह आहेत. दरवर्षी या वसतिगृहांना जि.प. समाजकल्याण विभागामार्फत प्रती विद्यार्थी ९०० रूपये याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या भोजनाचे अनुदान दिल्या जाते. या वसतिगृहाच्या कारभारात पारदर्शकपणा यावा यासाठी जिल्ह्यातील ५२ वसतिगृहांमध्ये सन २०१३ अखेर बायोमॅट्रीक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मात्र अवघ्या दोन महिन्यात १५ वसतिगृहातील बायोमॅट्रीक प्रणाली बंद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अन्य वसतिगृहातही बायोमॅट्रीक प्रणालीचा उपयोग करण्यात येत नसल्याची माहिती आहे. यामुळे या वसतिगृहातील कारभारांवर जि.प. समाजकल्याण विभागाला अपेक्षित नियंत्रण ठेवता येत नाही. खासगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या समाजकल्याणच्या वसतिगृहांमध्ये गडचिरोली तालुक्यात ७ वसतिगृह आहेत. धानोरा तालुक्यात तीन, कोरची तालुक्यात तीन, आरमोरी तालुक्यात १२, कुरखेडा तालुक्यात ९, चामोर्शी तालुक्यात ३, एटापल्ली तालुक्यात २, भामरागड येथे १, अहेरी तालुक्यात ८ व सिरोंचा तालुक्यात ६ वसतिगृह आहेत. या वसतिगृहांना विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार दरवर्षी जि.प.च्या समाजकल्याण विभागाकडून अनुदान दिल्या जाते. केवळ दोनच वसतिगृहांच्या इमारती खासगी संस्थांच्या मालकीच्या आहेत. उर्वरित सारेच वसतिगृह गेल्या २० ते २५ वर्षापासून भाड्याच्याच इमारतीत सुरू आहे. यापैकी १० वसतिगृह कवेलुच्या इमारतीत सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या वसतिगृहांच्या छतातून पाणी गळते. या वसतिगृहांमध्ये अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. जि.प. समाजकल्याण विभागामार्फत या वसतिगृहांची वर्षातून तीनदा तपासणी केली जाते. वर्षभरापासून बायोमॅट्रीक मशीन बंद असणाऱ्या वसतिगृहांमध्ये एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आदी तालुक्यातील तसेच कोरची तालुक्यातील दोन वसतिगृहांचा समावेश आहे.
गडचिरोली तालुक्यातील गोगाव व गडचिरोली हे दोन वसतिगृह वगळून सारेच वसतिगृह भाड्याच्या इमारतीत असल्याने विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहांची इमारत अपुरी पडत आहे. जि.प. समाजकल्याण विभागाकडून वसतिगृह चालविणाऱ्या खासगी संस्थांना दरवर्षी एकूण भाड्याच्या रक्कमेचे ७५ टक्के अनुदान दिल्या जाते. या वसतिगृहांना दोन दशकापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र अनेक खासगी संस्थांनी स्वत:च्या मालकीची इमारत उभारली नसल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)