साडेतीन लाखांचे बिट जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:46 IST2019-05-22T23:45:39+5:302019-05-22T23:46:05+5:30
आरमोरीपासून ९ किमी अंतरावर असलेल्या सालमारा ते कराडी या जंगल परिसरात वनविकास महामंडळाने तोडून ठेवलेले जळाऊ लाकूड बिट जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये तब्बल साडेतीन लाख रुपयांचे लाकूड जळाले असून वनविकास महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे.

साडेतीन लाखांचे बिट जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरीपासून ९ किमी अंतरावर असलेल्या सालमारा ते कराडी या जंगल परिसरात वनविकास महामंडळाने तोडून ठेवलेले जळाऊ लाकूड बिट जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये तब्बल साडेतीन लाख रुपयांचे लाकूड जळाले असून वनविकास महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. सदर आग कशी व कुणी लावली, हे अद्यापही कळाले नाही.
प्राप्त माहितीनुसार, वनविकास महामंडळ ब्रह्मपुरी विभागाअंतर्गत येत असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील आरमोरी तालुक्याच्या सालमारा बिटातील कक्ष क्र.३६ मधील एकूण ७११ पैकी १५२ बिट अज्ञात इसमांनी भर दुपारी आग लावून जाळले. वनविकास महामंडळाने जानेवारी ते मार्च या कालावधीत ७११ जळाऊ बिटाची कटाई करून हे बिट जंगल आगारात ठेवले होते. सालमारा ते कराडी हा परिसर घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. या जंगल परिसरात आडजात जातीचे जळाऊ लाकूड बिट वनविकास महामंडळाने कटाई करून ठेवले होते. सदर लाकूड बिटांना अज्ञात इसमाने आग लावल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची माहिती वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आरमोरी पोलीस स्टेशनला दिली.
सदर घटना मंगळवारी घडली असली तरी या घटनेची तक्रार दुसºया दिवशी बुधवारला पोलीस ठाण्यात देण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर आरमोरी पोलीस ठाण्यात कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, सिरोंचा, आलापल्ली, वडसा, गडचिरोली हे पाच वनविभाग मिळून एकूण ७८ टक्के जंगल आहे. यापैैकी वनविभागामार्फत काही जंगल वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. वनविकास महामंडळाकडून त्यांच्या राखीव जंगलात रोपवाटिकेची निर्मिती व इतर कामे केली जातात. वनविकास महामंडळाच्या वतीने राखीव जंगलातील लाकूड बिट तोडले जाते. तोडल्यानंतर हे बिट एफडीसीएमच्या आगारात ठेवले जाते. मंगळवारच्या सदर घटनेने खळबळ माजली आहे.