शहरातील नाल्या गाळाने बुजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:33 AM2021-04-26T04:33:30+5:302021-04-26T04:33:30+5:30

सिरोंचा तालुक्यातील बसथांब्यांची दुर्दशा सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी ...

The city's drains were flooded | शहरातील नाल्या गाळाने बुजल्या

शहरातील नाल्या गाळाने बुजल्या

Next

सिरोंचा तालुक्यातील बसथांब्यांची दुर्दशा

सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाले आहेत. भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य आहे.

अहेरी शहरातील अतिक्रमण कायमच

अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तात्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.

अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन केव्हा हाेणार

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण भागातील हगणदारीमुक्तीवर प्रश्नचिन्ह

विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी शौचालय निकामी झाले आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हगणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक लाेटा घेऊन रस्त्याच्या कडेला जातात.

अल्पवयीन चालकांवर कारवाई नाही

आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.

ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था

कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहन शेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे स्मशानभूमीचा विकास करावा, अशी मागणी हाेत आहे.

रेपनपल्ली-कमलापूर रस्ता उखडलेलाच

एटापल्ली : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन कि.मी.च्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे, तसेच या रस्त्यावर असलेले पूलसुद्धा जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने आराखडा तयार करून रेपनपल्ली-कमलापूर मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

३३ केव्ही उपकेंद्राचे काम थंडबस्त्यात

आलापल्ली : वन कायद्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणाला ३३ व ६६ केव्ही वीज उपकेंद्र उभे करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. ही जागा घेण्यासाठी तेवढी एमपीव्ही रक्कम भरावी लागते. राज्य सरकार ती भरण्यास तयार नसल्याने काम रखडले आहे.

मातीच्या बांधाचे प्रस्ताव धूळखात

आलापल्ली : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. बंधाऱ्यांची निर्मिती झाल्यास जलसाठ्यात वाढ होऊन पातळीत सुधारणा होऊ शकते.

अहेरी बाजार परिसरात स्वच्छतेची ऐशीतैशी

अहेरी : शहरातील बाजार परिसरात अस्वच्छता पसरली आहे. नाल्यांची सफाई अनेक दिवसांपासून करण्यात आलेली नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगर पंचायत प्रशासनाने संपूर्ण वॉर्डातील नाल्यांची सफाई करावी. घाण परिसराचीही स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सातत्याने मागणी करूनही अहेरी न.पं.ने स्वच्छतेबाबत ठाेस नियाेजन केले नाही.

नळाला तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय

गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत.

शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा

अहेरी : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.

खुल्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य

गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वार्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र, काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षक भिंत नाही, तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न.प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा.

अनुदानात वाढ करण्याची मागणी

कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमाह अत्यल्प अनुदान दिले जाते. सदर अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईमुळे प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.

रस्त्याच्या बाजूला वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करा

गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

ग्रामीण भागात पेट्रोेलची अवैध विक्री

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपांवरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.

अतिक्रमणाच्या विळख्यात आरमाेरी

आरमोरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, तसेच खुल्या जागांवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम बांधले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, अपघातांची संख्या वाढली आहे. मात्र, अतिक्रमण काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

चामोर्शी तालुक्यातही गावांना रस्त्याची प्रतीक्षा

चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. प्रशासनाने याची दखल घ्यावी. पांदण रस्त्याचेही खडीकरण न झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास हाेताे.

खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी

गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून जेप्रा, दिभना, अमिर्झा, चांभार्डा, आंबेशिवणी, भिकारमौशी, राजगाटा, उसेगाव आदी गावांतील शेकडो नागरिक ये-जा करतात. मार्ग अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा होतो.

जिल्ह्यात गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा

एटापल्ली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आदी दुर्गम तालुक्यांतील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक रस्त्याच्या मुख्य मार्गावरच उघड्यावर शौचास बसत आहेत.

Web Title: The city's drains were flooded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.