अहेरी जिल्ह्याच्या मागणीसाठी बंद
By admin | Published: August 3, 2014 12:06 AM2014-08-03T00:06:43+5:302014-08-03T00:06:43+5:30
अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने अहेरी जिल्हा घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी १ आॅगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी अहेरी शहर व तालुक्यात
अहेरी : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने अहेरी जिल्हा घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी १ आॅगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी अहेरी शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच मुलचेरा, भामरागड तालुक्यात बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.
मुलचेरा, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या तालुका मुख्यालयाचे अंतर गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून मोठे आहे. यामुळे या जिल्ह्याच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या चारही तालुक्यात उद्योग, सिंचन, विद्युत, शिक्षण, आरोग्य व बेरोजगारीची समस्या आहे. यामुळे या तालुक्यातील नागरिक विकासापासून तसेच शासकीय योजनांपासून वंचित आहेत. विकासासाठी अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण होणे काळाची गरज आहे, असा निर्धार करून या परिसरातील नागरिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला.
शासनाने यापूर्वी वाशिम, नंदूरबार, गोंदिया आदी जिल्ह्याची निर्मिती केली. तसेच नुकताच पालघर जिल्हा घोषित केला. त्यामुळे आता १५ आॅगस्टपर्यंत अहेरी जिल्ह्याची घोषणा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अहेरी येथे मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको करण्यात आला. आॅटो चालकांनी आॅटो रिक्षा वाहतूक बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला. तालुक्यातील देवलमरी येथेही आॅटो रिक्षा व शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. अहेरी येथील बंद आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, अतुल उईके, विलास रापर्तीवार, पवन कोसरे, अजय चौधरी, मनोज मडावी, श्रीनिवास मेश्राम, मुकेश कोसरे, सुरज कोसरे यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुलचेरा येथील बंदमध्ये बादल शहा, सुभाष दलपती, मनोज कर्मकार, रवी दुर्गे, शंकर हलदार, ओपू मुजूमदार, दीपक परचाके, गणेश बंकावार, दिनेश पेंदाम, नरेश मलिक, वीजू डोर्लीकर, कृष्णा हलदार, बुद्धी विश्वास, मांतेश पाल, बासू घरोधर, राबीन शहा, निखिल ईज्जतदार, सुभाष पाल तसेच भामरागड येथे झालेल्या आंदोलनात आशिफ सुफी, प्रदीप कर्माकार, ज्योतींदा डे, अक्रमखान पठाण, बहादूर आलाम, चित्तरंजन बाला, रहेमान शेख, संतोष बडगे, रमेश मारगोनीवार आदींसह शेकडो नागरिक उपस्थित झाले होते.
शुक्रवारी जिल्हाभरात नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला. मात्र सणाच्या दिवशीही स्वतंत्र अहेरी जिल्ह्याच्या मागणीसाठी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला अहेरी, मुलचेरा, भामरागड आदी तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)