आजाराने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 02:17 AM2016-09-22T02:17:50+5:302016-09-22T02:17:50+5:30
तापाने फणफणत असलेल्या एका १३ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुका
काटेपल्लीतील घटना : बोगस डॉक्टराकडे झाला होता उपचार
अहेरी : तापाने फणफणत असलेल्या एका १३ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या काटेपल्ली येथे बुधवारी घडली.
पावना शंकर मामिडपल्ली असे मृतक शाळकरी मुलीचे नाव असून ती देवलमारी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीत शिकत होती. पावना हीची प्रकृती शुक्रवारपासून बिघडली. तिला ताप येत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी देवलमारी येथे प्राथमिक आरोग्य पथकात औषधोपचारासाठी न नेता शासनाची परवानगी नसलेल्या देवलमारी येथील वासुदेव बालराजू नामक बोगस डॉक्टराकडे नेले. डॉ. बालराजू यांनी सदर मुलीवर औषधोपचार सुरू केला. मंगळवारी रात्री या डॉक्टरने पावनाला इंजेक्शन दिले. मात्र बुधवारी सकाळी पावनाची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
डॉ. वासुदेव बालराजू याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी नसल्याचे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले. बालराजू हा मूळचा तेलंगणा राज्याच्या करिमनगर जिल्ह्यातील बांगलोरू (सुराराम) येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून देवलमारी येथे दवाखाना उघडून सदर डॉक्टरने वैद्यकीय व्यवसायाची दुकानदारी सुरू केल्याची माहिती आहे. बालराजू प्रमाणेच देवलमारी गावात आणखी दोन ते तीन बोगस डॉक्टर असल्याची माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. शासनातर्फे नागरिकांच्या आरोग्य व वैद्यकीय सुविधेसाठी दरवर्षी कोठ्यवधी रूपये खर्च करण्यात येतात. औषधोपचारासाठी शासनाने अनेक ठिकाणी शासकीय रुग्णालयाची सोय केली आहे. मात्र दुर्गम भागातील अनेक अशिक्षित कुटुंब शासकीय रुग्णालयात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ घेत नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. (प्रतिनिधी)