खर्रा विक्रेत्यांची धडक
By admin | Published: July 31, 2014 12:00 AM2014-07-31T00:00:28+5:302014-07-31T00:00:28+5:30
राज्यशासनाने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर मागीलवर्षीपासून बंदी आणली आहे. या बंदीला शासनाने आणखी मुदतवाढ दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात
पानटपरीचालकाचा मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले
गडचिरोली : राज्यशासनाने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर मागीलवर्षीपासून बंदी आणली आहे. या बंदीला शासनाने आणखी मुदतवाढ दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात पानठेले विक्रेत्यांवर मुदतवाढीनंतर अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन अन्यायकारक कारवाई करीत आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी गडचिरोली येथे जिल्हाभरातील पानटपरी व्यावसायिकांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. स्थानिक इंदिरा गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ सभापती छाया कुंभारे, महिला व बालकल्याण सभापती निरांजनी चंदेल, संतोष मारगोनवार, माजी जिल्हा परिषद सदस्य वेणुताई ढवगाये, पानटपरी विक्रेता असोसीएशनचे आरमोरी अध्यक्ष वामन देविकार, नितीन खोब्रागडे, अनिल जंवजालकर, अरूण धकाते, सुभाष धकाते, पंकज खरवडे, महेंद्र शेंडे, पुष्पा वाघ आदींनी केले.
त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांची भेट घेतली. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे कुठलेही साधन नाही. ७ ते ८ हजार लोक पानठेला चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या चालवितात. शासनाने नोकरभरती बंद केली आहे. अशा परिस्थितीत पोलीस व अन्न व औषध प्रशासन पानठेला विक्रेत्यांवर अन्यायकारक कारवाई करीत आहे. त्यामुळे पानठेला विक्रेत्यांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे संबंधीत कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी लवकरच प्रत्येक तालुकास्तरावर पानठेला विक्रेत्यांना कार्यशाळेतून रोजगाराविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शासनाने बंदी केली असल्यामुळे संबंधीत कारवाईला स्थगिती देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पानठेला विक्रेत्यांवरील कारवाई स्थगित न झाल्यास ११ आॅगस्टला गडचिरोली येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांच्या नेत्यांनी दिला आहे. तत्पुर्वी सकाळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी शहरातील पानठेला विक्रेत्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना या संदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली. गडचिरोली जिल्ह्यात कोणताही उद्योग नसल्याने सुशिक्षीत बेरोजगारांचा व्यवसाय हिरावून घेतल्या जाऊ नये, कसल्याही व्यवसायावर सरसकट बंदी घालणे योग्य नसून याबाबत प्रथम प्रचार आणि प्रसार करून मनपरिवर्तनाचे काम व्हायला हवे. पर्यायी व्यवसाय उपलब्ध करून द्यावा. तसेच पोलिसांकडून कारवाईच्या नावावर त्रास होणार नाही. याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. गडचिरोली येथील विश्रामगृहात त्यांनी पानठेला विक्रेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हसनअली गिलानी, सुनिल खोब्रागडे, राकेश रत्नावार, विवेक खोब्रागडे, अमिता मडावी, मसराम, बंडू निंबोरकर, नामदेव झाडे, संतोष चिलबुले, उमाकांत बाळेकरमकर, सुनिल बाबणवाडे आदी उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. (जिल्हा प्रतिनिधी)