सुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:33 AM2021-03-22T04:33:08+5:302021-03-22T04:33:08+5:30

गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गोकूलनगर लगत माता मंदिराच्या पलीकडे अनेक घरांची वस्ती गेल्या काही वर्षांपासून वसली ...

Provide facilities | सुविधा पुरवा

सुविधा पुरवा

Next

गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गोकूलनगर लगत माता मंदिराच्या पलीकडे अनेक घरांची वस्ती गेल्या काही वर्षांपासून वसली आहे. अनेक कुटुंब या भागात वास्तव्यास आहेत. मात्र सदर भागात पक्के रस्ते, नाली, पथदिवे आदी मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे.

तलाठी-ग्रामसेवकांच्या अनेक जागा रिक्त

एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी या पाचही तालुक्यात महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी शेतकरी व नागरिकांची कामे खोळंबत असल्याचे दिसून येत आहे.

कुंपणाअभावी पिकांचे जनावरांकडून नुकसान

गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविणे आवश्यक आहे. जनावरांच्या त्रासामुळे अनेकांनी शेती सोडली आहे.

एकेरी वाहतुकीबाबत हालचाली नाही

गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच

गडचिरोली : ब्रिटिश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे.

अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

साखरा बस थांब्यावर गतिरोधक उभारा

गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने साखरा येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.

चामोर्शीतील तलावाचे सौंदर्यीकरण करा

चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत

देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकरऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही.

रायगट्टा पुलावर कठडे उभारण्याची मागणी

अहेरी : तालुक्यातील रायगट्टा पुलावर कठडे उभारण्यात आले नाही. सदर पूल कमी उंचीचा व अरुंद आहे. कठडे नसल्याने वाहन पुलाच्या खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. कठडे नसल्याने जनावरेसुद्धा जखमी झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी कठडे उभारावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा

देसाईगंज : दिवसेंदिवस देसाईगंज शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेक वेळा नगर परिषदेकडे केली आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.

खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी

गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून अनेक गावातील शेकडो नागरिक ये-जा करतात.

मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करा

सिरोंचा : दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी होत आहे.

झिंगानुरात सिंचन सुविधेचा अभाव

सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर परिसरात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे धान पीक करपते. या क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त

एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत.

कोडसेपल्लीतील समस्या सोडविण्याची मागणी

अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.

शहरातील तलावातील अतिक्रमण वाढले

गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचाई विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून चालविला जात आहे.

पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाट वाढ

आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारल्या जाते. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या.

सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करा

सिरोंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना अजूनही जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे.

Web Title: Provide facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.